10/24/13

ता.क. - पेशवाईचा र्‍हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि अजुन बरेच

या लेख-मालेतील पुढला लेख प्रकाशित करायला थोडा अवकाश आहे. थोडे वाचन अजुन बाकी आहे आणि तसेच सध्या बाड-बिस्तर बांधणे चालू आहे. पुढल्या महिन्यात सहकुटुंब स्वदेशात परतण्याचा मानस आहे त्यामुळे बरीच धावपळ होतेय. पण माझ्या मागच्या लेखातील एका मुद्द्यावर अधिक स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे असे लक्षात आले.

मागल्या लेखातील तीन मुद्द्यांपैकी एक मुख्य मुद्दा असा की भारतावर अरबी-तुर्क-मध्य आशियातुन होणारी आक्रमणे पेशवाईच्या उदया पर्यंत संपूर्णपणे थांबली होती. पण पेशवाईची धाव, ध्येय आणि उठाठेव ही दिल्ली जिंकुन भारतावर राज्य करण्याची होती. दिल्ली ही भारताची राजधानी आणि मानबिंदु हे जरी खरे असले तरी परकीय आक्रमक आणि आक्रमणांच्या पध्दती यात प्रचंड बदल या काळात झाला. मध्य आशियातील मुसलमानी टोळ्यांऐवजी आता आक्रमक गोर्‍या कातडीचे आणि युरोपिय होते आणि घोडदळ आणि प्रचंड मोठाल्या तोफांच्या आधारा ऐवजी गलबते आणि समुद्री तोफांच्या आधारावर नविन आक्रमणे होणार होती. तसेच तंत्रज्ञान युरोपातील औद्योगिकीकरणामुळे एक नविनच पातळी गाठणार होत. भारत आणि पेशवाई या नविन आक्रमक आणि आक्रमणांसाठी मुळीच तयार नव्हता.

मागील लेखात मी मोघलांना सगळ्यात जास्त भिती आणि वचक तुर्की आणि साफाविद साम्राज्यांचा होत असे म्हणले आणि पुढे मी तुर्की साम्राज्याच्या बलाढ्य असल्याचेही बोललो. पण मला या विचारात/वक्तव्यात थोडा बदल करणे आवश्यक वाटते. मोघलाईच्या अंतापर्यंत तुर्की साम्राज्य बलाढ्य राहिले नव्हते. त्यांच्या 'सुर्वणकाळ' सुलेमान दि मॅग्निफिसंट च्या राजवटी नंतर म्हणजे सन १५९० च्या दरम्यान होता. (सुलेमान दि मॅग्निफिसंटचा मृत्यु सन १५६६ ला झाला) त्या नंतरचा काळात तुर्की साम्राज्य प्रसरण पावणे बंद झाले होते. त्यांच्या फौजा, युध्दशैली आणि आरमार बलाढ्य असले तरी त्यांचे राजे (सुल्तान) अत्यंत साधारण होते. त्यामुळे त्यांच्यावर आक्रमण करुन कोणाल जिंकणे अशक्य असले तरी त्यांनी इतरांवर आक्रमण करुन जिंकणेही कठिण होत गेले. तसेच तुर्की साम्राज्याचे लक्ष सदैव पूर्व युरोपावर होते. लपांटोच्या समुद्री युध्दातल्या (सन १५६६) पराभवा नंतर तुर्कीच्या वजीराचा मानस पुढली स्वारी भारतावर करण्याचा होता तसेच पुढे (१६व्या शतकात) अरबी समुद्रातील पोर्तुगिज चाचेगिरीला आळा घालायला तुर्की आरमार अरबी समुद्रात उतरवण्याची तयारीही तुर्कांनी केली होती पण य दोन्ही मनसुब्यांची परिणिती भारत आणि पर्शियात काही काळासाठी भीतीचे वातावरण पसरविण्या पलिकडे काही झाली नाही.

लपांटो हे मेडिटेरिनियन समुद्रातील एक बेट आणि तिथल्या समुद्रात झालेल्या तुर्की आणि युरोपिय साम्राज्यातील युद्धाचे स्थान. त्या काळात तुर्की साम्राज्याची सत्ता अजिंक्य होती आणि लौकरच संपूर्ण युरोप ते जिंकणार अशी चिन्ह स्पष्ट होती. त्यांचे आरमारही बलाढ्य होते. युरोपिय सत्ता (प्रामुख्याने स्पेन), पोप आणि इतर जमिनदारांनी पैसा, सैन्य आणि नाव्हा एकत्र करुन लपांटो जवळ तुर्की आरमाराला कडाक्याची टक्कर दिली. आणि आश्चर्य म्हणजे युरोपिय आरमार विजयी ठरल. हा विजय म्हणजे युरोपिय सत्तांना तुर्की साम्राज्याचा काही भूभाग जिंकला अस नव्हे पण एक, तुर्की साम्राज्याच्या मानाला हा पराजय म्हणजे काळिमा ठरला आणि दुसर, समुद्राद्वारे इटली, स्पेन इत्यादी युरोपिया राष्ट्रांना जिंकण्याच्या तुर्की अभिलाषेला आळा बसला. या युध्दानंतर मेडिटेरेनियन समुद्राचा वापर करणे युरोपियन राष्ट्रांना सोपे झाले आणि तुर्की साम्राज्याचे भय कमी झाल्यामुळे स्पेन आणि पोर्तुगल ने त्यांचे लक्ष नविन शोध लागलेल्या दक्षिण अमेरिकेकडे वळवले.

लपांटोच्या युध्दाचा वरवर बघता भारताशी काही संबंध नाही. त्या काळात अकबरी राजवट दृढ होत होती आणि शिवाजी राजांच्या जन्माला अजुन पन्नास वर्ष बाकी होती. पण सागरी युध्दातील या विजयामुळे युरोपिय राष्ट्रांमधे एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. युरोपिय गलबते हळु हळु जगभर पसरु लागल्यात आणि अवघ्या दोनशे वर्षात तीन खंडांमधे एकाच वेळेस तीन वेगवेगळी युध्द करण्याची क्षमता त्या राष्ट्रांमधे निर्माण झाली.

लपांटोच्या युद्धावर मी आधी एक ब्लॉग लिहिला होता. त्याचा दुवा हा आहे:  http://marathimauli.blogspot.com/2010/04/blog-post.html
---
Sources:
1) Empires of the Sea: The Siege of Malta, the Battle of Lepanto, and the Contest for the Center of the World by Roger Crowley

2) After Tamerlane by John Darwin

3) Empires of the Monsoon: A History of the Indian Ocean and Its Invaders by Richard Hall

10/18/13

गंगा स्तोत्र - आद्य शंकराचार्य

आदी शंकराचार्यांच्या रचना केवळ अर्थपूर्णच नव्हे तर गेय ही असतात. सुमधुर आणि रसाळ संस्कृत मधे लिहिलेल्या या रचनांपैकी मी माझ्या आवडत्या काही रचना वाचकांसमोर ठेवतो आहे.

गंगा स्तोत्र
        - आद्य शंकराचार्य 

देवि! सुरेश्वरि! भगवति! गङ्गे त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गे ।
शङ्करमौलिविहारिणि विमले मम मतिरास्तां तव पदकमले ॥ 1 ॥
भागीरथिसुखदायिनि मातस्तव जलमहिमा निगमे ख्यातः ।
नाहं जाने तव महिमानं पाहि कृपामयि मामज्ञानम् ॥ 2 ॥
हरिपदपाद्यतरङ्गिणि गङ्गे हिमविधुमुक्ताधवलतरङ्गे ।
दूरीकुरु मम दुष्कृतिभारं कुरु कृपया भवसागरपारम् ॥ 3 ॥
तव जलममलं येन निपीतं परमपदं खलु तेन गृहीतम् ।
मातर्गङ्गे त्वयि यो भक्तः किल तं द्रष्टुं न यमः शक्तः ॥ 4 ॥
पतितोद्धारिणि जाह्नवि गङ्गे खण्डित गिरिवरमण्डित भङ्गे ।
भीष्मजननि हे मुनिवरकन्ये पतितनिवारिणि त्रिभुवन धन्ये ॥ 5 ॥
कल्पलतामिव फलदां लोके प्रणमति यस्त्वां न पतति शोके ।
पारावारविहारिणि गङ्गे विमुखयुवति कृततरलापाङ्गे ॥ 6 ॥
तव चेन्मातः स्रोतः स्नातः पुनरपि जठरे सोपि न जातः ।
नरकनिवारिणि जाह्नवि गङ्गे कलुषविनाशिनि महिमोत्तुङ्गे ॥ 7 ॥
पुनरसदङ्गे पुण्यतरङ्गे जय जय जाह्नवि करुणापाङ्गे ।
इन्द्रमुकुटमणिराजितचरणे सुखदे शुभदे भृत्यशरण्ये ॥ 8 ॥
रोगं शोकं तापं पापं हर मे भगवति कुमतिकलापम् ।
त्रिभुवनसारे वसुधाहारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे ॥ 9 ॥
अलकानन्दे परमानन्दे कुरु करुणामयि कातरवन्द्ये ।
तव तटनिकटे यस्य निवासः खलु वैकुण्ठे तस्य निवासः ॥ 10 ॥
वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः ।
अथवाश्वपचो मलिनो दीनस्तव न हि दूरे नृपतिकुलीनः ॥ 11 ॥
भो भुवनेश्वरि पुण्ये धन्ये देवि द्रवमयि मुनिवरकन्ये ।
गङ्गास्तवमिमममलं नित्यं पठति नरो यः स जयति सत्यम् ॥ 12 ॥
येषां हृदये गङ्गा भक्तिस्तेषां भवति सदा सुखमुक्तिः ।
मधुराकन्ता पञ्झटिकाभिः परमानन्दकलितललिताभिः ॥ 13 ॥
गङ्गास्तोत्रमिदं भवसारं वांछितफलदं विमलं सारम् ।
शङ्करसेवक शङ्कर रचितं पठति सुखीः तव इति च समाप्तः ॥ 14 ॥


10/5/13

पेशवाईचा र्‍हास - दुष्काळ, इंग्रज-फ्रेंच युध्द आणि अजुन बरेच (भाग १)

पेशवाईवर लेखमालिका लिहायची इच्छा किंवा प्रयत्न आणि त्यान्वये होणारा थोडा बहुत अभ्यास कुठल्या विशिष्ट दिशेने होत नाही. पुढल्या लेखात मी थोरल्या बाजीरावांबद्दल लिहिन अस ठरवुन मला लिहिता येत नाही. कधी काही प्रश्न मनात येतात त्यासाठी उत्तरांचा मागोवा घेतल्या जातो. कधी काही वाचनात येत त्याने नविन दृष्टीकोनांची अचानक उत्पत्ती होते आणि मग त्याला अभ्यासाचा पाठिंबा हवा म्हणुन त्या दिशेने वाचन होत. तर कधी जुनी पुस्तके, लेख नव्या प्रकाशात वाचल्या जातात. पण हा सगळा अभ्यास इंटरनेटमुळे बर्‍या पैकी शक्य असला तरी मराठी इतिहास समजुन घेण्यासाठी आवश्यक आणि महत्त्वाची पुस्तके मला उपलब्ध नाही. एकुण हे लेख वर्-वरचे आहेत अशी शंका मला येते. असो.

गेले काही दिवस तीन महत्त्वाचे मुद्दे माझ्या डोक्यात घोळतायत. पहिला मुद्दा - सन १८०० च्या आसपास भारतात पडलेले दुष्काळ. आमचे मित्र श्री अंबरीश यांच्याशी झालेल्या संवादात मला पहिल्यांदा लक्षात आला. या लेखाच्या शेवटी अधिक माहिती असलेल्या संकेतस्थळांची यादी दिली आहे. दुसरा मुद्दा सन १७९५ ते सन १८०० च्या दरम्यान मराठा साम्राज्याच्या धुरंधर नेत्यांच्या एका पाठोपाठ झालेले मृत्यु. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सन १७५० ते सन १८०० च्या साधारण पाच दशकातली जागतिक परिस्थिती.

नशिबावर विश्वास ठेवा कि नका ठेउ, नशिबाचे ठसे ऐतिहासिक घटनांवर प्रखरतेने जाणवतात. नशिब म्हणजे नक्की काय? शिवाजी महाराजांचा पन्नासाव्या वर्षी मृत्यु तर औरगंझेबाने नव्वदी गाठणे ही नशिबाने मांडलेला क्रूर खेळ होता. अर्थात त्या घटना घडत असतांना हा नशिबाचा खेळ आहे असे लक्षात येणे कठीण असते. नशिबाचा असाच एक फटका असा सन सन १७९० ते सन १८०१० च्या दरम्यान भारतभर पडलेले दुष्काळ. गुजराथ-भुज प्रदेशापासुन ते बंगाल पर्यंत, मद्रास पासुन ते राजस्थान पर्यंत सगळा प्रदेश दुष्काळाच्या तडाख्यात एका पाठोपाठ सापडला. अर्थात पेशवाईमुळे दुष्काळ पडला नाही अस नाही. देशाच नशिब वाईट एवढच. पण या दुष्काळांनी मराठा पातशाहीची कंबर अजुन वाकली यात काही शंका नाही. आधी एक-दोन उदाहरण थोडक्यात विचारात घेउया. संत तुकाराम महाराजांच्या काळात दोन दुष्काळ एका पाठोपाठ आलेत. यातला सन १६३०-३२ चा दुष्काळ अत्यंत भीषण होता. (त्यात त्यांची पहिली बायको आणि मुलगा गेलेत) या दुष्काळात गावच्या गाव भुकेल्या पोटी मरुन गेलीत. आणि त्यात काही कमी असेल तर त्या काळात मुसलमानी पातशाह्यांच्या युध्दांचा उत आला होता. अश्या परिस्थितीत रंजली-गांजलेली लोक शिवाजी राजांच्या मागे उभी रहायला पटकन झाली असतीलही. इंग्रजांच्या राजवटीत भरपूर दुष्काळ पडलेत आणि यात इंग्रज राजवटीचा फार मोठा हात होता पण असल्या परिस्थितीतही सन १९४२-४३ चा बंगालचा दुष्काळ ह्रदय पिळवटुन टाकणारा होता. लाखो लोक इंग्रजांच्या चोरपणा मुळे हकनाक बळी गेलेत. अन्नाच्या अभावी खंगुन-झिजुन स्वतःची हाड मोजत मेलेत. भारतीय असंतोषाला हा शेवटचा धक्का म्हणायला हरकत नाही. चार-पाच वर्षातच भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले. पेशवाईच्या अंती घडलेले दुष्काळच केवळ पेशवाईच्या र्‍हासाला कारणीभूत नव्हते. पण करवसुली बंद पडणे, गाव ओसाड पडुन समाज व्यवस्था विस्कळीत होणे, लोक उपाशी मरण्याने काम करायला कमी हात आणि लढायलाही कमी हात इत्यादी अनेक कारणे पेशवाई राजवटीला डसली असणार. पेशवाई विरुद्ध उठाव जरी झाला नसला तरी या दुष्काळांचा विपरीत परिणाम नक्कीच झाले असणार.

दुष्काळा सारखाच अजुन एक फटका म्हणजे मराठा साम्राज्याच्या कर्तबगार पिढीचा मृत्यु. छत्रपती संभाजींच्या मृत्यु (सन १६८९) नंतर मराठा साम्राज्यावर कोणा एका नेत्याच किंवा राजाच संपूर्ण प्रभुत्व कधीच नव्ह्ते. अगदी थोरल्या बाजीरावांच्या काळातही नागपूरचे भोसले आणि गुजरातेचे दाभाडे स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करु बघत होते. थोडक्यात पुढारी आणि लढवय्यांची कमतरता नव्हती. पानिपतच्या युध्दात एक कर्तबगार पिढी मारल्या गेली. विश्वासराव, सदाशिवराव भाऊ आणि पाठोपाठ नाना साहेब गेलेत. तसेच युध्द भूमीवर भावी पिढीही गेली. पण मराठी समाजाने एक नविन कर्तबगार पिढी पुन्हा उभी केली. अत्यंत कम नशिबी आणि अल्पायुषी पण अतिशय कर्तबगार सवाई माधवरावां पासून ते नाना फडणविस, अहिल्याबाई, यशवंतराव होळकर आणि महादजी शिंद्यांनी मराठा साम्राज्याची घडी पुन्हा बसवली. महादजी शिंदे यांनी उत्तर भारतात परत मराठ्यांचा जरब बसवला. तसेच बंदुका आणि तोफांचा लष्करी डावपेचात वापर करण्यासाठी फ्रेंचांचे सहाय्य घेउन बदलत्या युध्द शैलीसाठी पावले उचललीत.अहिल्याबाईंनी लोकसेवा आणि उत्तम प्रशासना द्वारे हिंदु धर्माची सेवा आणि लोकांमधे मराठा शासना बद्दल पुन्हा आदर निर्माण केला. नाना फडणविसांनी मुत्सद्देगिरीच्या गोष्टी प्रसिध्द आहेतच पण आज जे मॅनेजमेंट म्हणतो तश्याच पध्दती नानांनी अवलंबिल्या. यशवंतराव होळकर हे थोरल्या बाजीरावांच्या पठडीतले शेवटले वंशज मानायला हवेत. धर्मनिष्ठ, शूर आणि दूरद्रष्टा असा हा सरदार काही वर्ष आधी मराठ्यांना लाभायला हवा होता. हे सगळे सेनानी, राज्यकर्ते आणि व्यवस्थापक आपापल्या परीने, कष्टाने राज्यवर्धन आणि राज्य संगोपन करीत असतांना नशिबाने विचित्र फास टाअकला. पानिपत युध्दा एवढच नुकसान सन १७९४ ते सन १८०० च्या काळात पुन्हा झाल. महादजी शिंदे, अहिल्याबाई होळकर आणि नाना फडणविस यांना या सहा वर्षाच्या कालावधीतच देवाज्ञा झाली. आणि दहा वर्षातच यशवंतराव होळकरांचाही मृत्यु सन १८११ ला झाला. एवढे स्तंभ एका पाठोपाठ कोसळलेत तर सन १८१८ ला मराठा साम्राज्य लयास गेले हे काही नवल नव्हे.

याच्या अगदी विरुद्ध दिशेने इंग्रजी सत्तेने प्रवास केला. या वीस-पंचवीस वर्षांच्या कालावधीत इंग्रजी सत्ता झपाट्याने बोकाळत गेली. इंग्रजांच्या हातून अमेरिका खंड सुटला होता त्यामुळे त्यांनी सगळे लक्ष भारतावर केंद्रित केले. सेवन इयर्स वॉर मधे विजय प्राप्त करुन इंग्रजां मधे एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला होता. तसेच औद्योगिकीकरणाचे वारे तेंव्हाच वाहु लागले होते. आणि माझ्या मते सगळ्यात मुख्य म्हणजे बाष्पचलीत बोटींच्या तंत्रज्ञानाचा इंग्लंड मधे झालेल्या विकासामुळे इंग्रजांनी समुद्री दळण वळणावर आणि नौदलावर संपूर्ण प्रभुत्व प्रस्थापित केले.

इंग्रजी सत्तेचे औद्योगिकीकरण, त्यांच्या नौदलाचा विकास इत्यादी घटना नशिबाचा खेळ आहे असे माझे म्हणणे मुळीच नाही पण या घटना घडत असतांना मराठी साम्राज्याच्या पुढार्‍यांचा आणि सेना नायकांचा तेंव्हाच आणि एकत्रच मृत्यु होणे ही नशिबाची खेळी असे मला वाटते.

या अनुषंगाने आपण शेवटल्या आणि सगळ्यात मुख्य मुद्द्या कडे वळुया. सन १७५० नंतरच्या कालावधीचा विचार केला तर प्रामुख्याने दोन गोष्टी ठळकपणे दिसतील. पहिली म्हणजे सतराव्या शतकातल्या शंभर वर्षात झपाट्याने नाहीशी झालेली मध्य आशियातुन होणारी तुर्की-मुसलमानी आक्रमणे. दुसर म्हणजे इंग्रज-फ्रेंचांची युध्द - प्रामुख्याने सात वर्षाचे युध्द. (याल सेवन इयर्स वॉर म्हणतात)



आता मध्य आशियातून आक्रमणे थांबलीत म्हणजे काय? आणि ती आक्रमणे थांबलीत तर सन १७६१ च पानीपत काय होत? हे प्रश्न पडण सहाजिक आहे. या मुद्द्याचे अवलोकन करतांना इतिहासाच थोड मागे जाणे आवश्यक आहे.

मुसलमानी आक्रमणे भारतावर जरी सातव्या शतकापासून होत असली तरी सन ११४३ च्या पृथ्वीराजाच्या तराईच्या पराभवानंतर या आक्रमणांचा बांध खराखुरा फुटला. त्यांनंतर मोघलांच्या उदया पर्यंतर भारतीय उपखंडावर या आक्रमणांच्या सुनामी सतत तुटुन पडत होत्या. ही आक्रमणे अफगाणिस्तान-सिंध-पंजाब मार्गे दिल्लीत धडकत असे. हळुहळु करत या आक्रमकांनी विंध्य ओलांडला आणि रामेश्वरम पर्यंत धडक मारली आणि ठिकठिकाणे मुसलमानी शाह्य स्थापन केला. या आक्रमणांमागे लुटपाट हे महत्त्वाचे कारण असले तरी भारत पादाक्रांत करुन मुसलमान करण्याची अभिलाषा हे सगळे आक्रमक बाळगुन होते. बाबरने दिल्ली जिंकल्यावर आणि अकबराने मोघली सत्तेची पाळमुळं खोल रोवल्यावर हि आक्रमणे थांबली (अर्थात हे मोघल स्वतः आक्रमकच होते!) पण या आक्रमणांची भीती सदैव मोघली सुल्तानांना असे. उदाहरणार्थ, शिवाजींना आग्र्याला कैदेत मारण्या ऐवजी काबुल भागात सतत होणार्‍या चढाया लढायला पाठवायचे होते. पुढे नेताजी पालकर हातात लागल्यावर औरंगझेबाने त्याला काबुललाच पाठवले. मोघलांना नुसत्या मध्य आशियातल्या टोळ्यांचे भय नव्हते. या व्यतिरिक्त इराणी साफाविद आणि त्या काळातल्या सगळ्यात बलाढ्य अश्या तुर्की साम्राज्याचाही फार वचक होता. तुर्की साम्राज्य त्या काळात खरोखरच बलशाली होते. त्यांच्याकडे बलाढ्य सेना होत्या आणि अद्यावत नौदलही होते. त्यांचे सुल्तान स्वतः फार शूर होते. त्यांचे साम्राज्य इजिप्त ते इराण आणि तसेच, पूर्व युरोपातही पसरले होते. या तूर्की सुल्तानांनी स्वतः ला मुसलमानांचा खलिफा मानायला सुरु केले आणि त्यांच्या सेना युरोपच्या विएन्ना पर्यंत धडक मारीत होत्या. अर्थात या साम्राज्याला भारताची तहान लागणे स्वाभाविक होते. पण युरोप पादाक्रांत करण्याच्या अभिलाषेमुळे त्यांना भारताकडे फारसे लक्ष देता आले नाही. तुर्की आणि साफाविद वगळलेत तर मध्य आशिया किंवा अरबस्थानात अजुन कुठली मुसलमानी सत्त उरली नव्हती. या सत्तां शिवाय भारतावर आक्रमण करुन जिंकण्याची शक्ती कोणातही उरली नव्हती.

थोरल्या बाजीरावांनी दिल्ली गाठे पर्यंत मोघली सत्ता खिळखिळी झाली होती. त्यामुळे अफगाणीस्तानातल्या आक्रमकांनी पुन्हा भारतावर डोळे रोखले. पण केवळ दिल्ली पूर्तीच ती नजर सिमित होती. ते पण स्वत;ला दिल्लीच बादशाह बनवायला नव्हे तर दिल्लीचा जो कोणी बादशहा असेल त्याच्या कडून कर वसुल करायला मिळावा एवढेच. नादिर शहा आणि पुढे अहमदशहा अब्दालीची आक्रमणे एवढ्यापूर्तीच सिमित होती. उत्तरेत मराठा सरदारांनी आपापसातल्या भांडणात पंजाब-सिंध भागात भक्कम शासन निर्माण केले नाही त्यामुळे हा भाग एकदा जिंकुनही सन १७६० ला अहमदशहा अब्दाली सर्रास दिल्ली पर्यंत पोचला. अगदी पानिपताचे युद्ध जिंकुनही अब्दाली मागेच परतला. अब्दाली नंतर भारतावरची परकीय मुसलमानी आक्रमणे खर्‍या अर्थाने थांबली होती. पण मराठी सत्ताधीशांचा रोख अजुनही उत्तर भारत, दिल्ली, या दिशेने होता आणि समुद्राकडे त्यांनी संपूर्ण दूर्लक्ष केले. अब्दाली ला छातीवर झेलुन परकीत आक्रमणे मराट्यांनी थांबवली खरी, पण पुढले शतक नौदलाच्या अनुषंगाने लढल्या जाणार होते, समुद्र हा आत नविन 'मध्य आशिया' ठरणार होता आणि समुद्राला अंकित करणारेच नविन सत्ताधीश बनणारे होते या बदलत्या वार्‍याचा गंध मराठी सेना नायकांना मूळीच आला नाही.

आपण कालमानात थोडे पुढे जातोय. परत जर का सन १७५० च्या आस पास उभे राहिलोत तर केवळ नौदलावर भारत जिंकणे इंग्रजांना शक्य नव्हते. त्या काळात भारतात इंग्रजांचा थोडा-बहुत वावर होता आणि त्यांचे जगात इतरत्र जो पसारा होता त्याचा विचार करता इंग्रजांना मराठी साम्राज्याशी टक्कर देणे अशक्य होते.

पण मग इंग्रज-फ्रेंचांमधे सात वर्षाचे युध्द झाले. जगात तिन खंडावर लढल्या गेलेले हे चुरशीच्या युध्दाचे पडसाद भारतावर लौकरच दिसुन आलेत.


(क्रमशः) 

------

दुष्काळावर अधिक माहिती/अभ्यासासाठी दुवे

1) "An Explanatory note on the famines in India" ( http://jambudveep.wordpress.com/2011/01/08/an-explanatory-note-on-the-famines-in-india/ )

2) Indian Famines: Their causes and Remedies by Prithiws Chandra Ray. Puslished January 1, 1901

3) The End of Hunger by David Riff ( http://www.newrepublic.com/article/world/the-end-hunger)

4) On Famine Crimes and Tragidies by Alex de Waal (http://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(08)61641-4/fulltext)

9/7/13

ता.क. - परदेशातील स्वातंत्र्यदिनी झालेले अंतर्मुख मन

मागच्या लेखाच्या निमित्ताने एक अनुभव सांगावासा वाट. मी कॉलेज मधे असतांना कॉलेजच्या ग्रंथालयात काम करीत असे. तिथे माझ्या सोबत एक 'डेव' म्हणुन माझ्या सारखाच विद्यार्थी काम करत असे. तो दिसायला भारतीय दिसत असे पण बाकी रहाणीमाना वरुन तो कुठल्याच दृष्टीने भारतीय नव्हता. एक दिवस त्याच्या गळ्यात मला हनुमानाचे ताईत दिसले. मला आश्चर्य वाटले. आता अमेरिकेत हिंदु धर्म स्विकारलेले बरेचसे लोक आहेत. त्यापैकी तर हा एक नाही असा मला प्रश्न पडला. दुसर्‍या दिवशी मी त्याला विचारले तर मला आश्चर्याचे अजुन धक्के बसले. त्याचे नाव डेव होते पण खरे नाव देवेंद्र साव्हने होते. त्याचे कुटुंब मूळ वेस्ट इंडिज चे आणि त्या आधि मूळ भारतीयच. डेव ला भारताच मूळीच गंध नाही तसेच सणावारांचाही त्याला फारसा गंध नव्हता. त्याच्यावर वेस्ट-इंडिज आणि अमेरिकेचे संमिश्र संस्कार झालेले होते. थोडक्यात संस्कार आणि इतिहासाच्या बाबतीत तो गोंधळलेला होता. पण त्याच्या वडिलांची हनुमानावर भक्ती होती आणि त्यांनीच त्याला हनुमानाचे ताईत घालायला दिले. तो मला म्हणाला की ते ताईत तो कधीच काढत नाही आणि त्याच्या मुला-बाळांनाही तसलच ताईत पुढे देणार.  

9/4/13

परदेशातील स्वातंत्र्यदिनी झालेले अंतर्मुख मन

आदल्या दिवशी फोन आला की चिन्मय, उद्या स्वातंत्र्यदिवस उत्सवात मदत हवी आहे, येतोस का? मी विचार केला की जाउया. काही तरी बदल आणि गंमत. मिरवणुकीत एका कार वर गणपतीची मूर्ती चढवली होती आणि मिरवणुकीच्या आघाडीवर मला ती कार चालवण्याची कामगिरी होती. थोडक्यात परदेशात होण्यार्‍या या उत्सवाच्या गणपतीचा मी उंदीर! भारता पासून हजारो मैल दूर भारत स्वांतत्र्य दिवस दिमाखाने साजरी होत होता. गणपतीच्या मूर्तीला समोर ठेउन लोक ढोल-ताशे वाजवत, नाचत, मिठाई खात आनंदाने वंदे मातरम् चा जल्लोष करीत होते. सगळ दृश्य थोड विस्मयकारक होते. मिरवणुकीत सामील झालेल्यांपैकी बहुतांश जन अमेरिकन नागरीक होती आणि जी लोक नव्हती ती नागरीकत्व प्राप्त करण्यासाठी रांगेत उभी होती. थोडक्यात, या पैकी कोणीचीहे कधीही भारतात परतण्याची इच्छा ठेउन नव्हत. मिरवणुक मुंगीच्या गतीने सरकत होती आणि माझ्या डोक्यात विचारांची चक्र भरधाव फिरू लागलीत. भारतातून तडफडत निघुन परदेशी आल्यावरही ही लोक उत्साहाने स्वातंत्र्य दिवस का साजरी करतात? भारताचा दु:स्वास म्हणुन हि लोक पळालेली नाहीत हे मान्य. पण स्वातंत्र्य दिवस साजरी करण्या मागचा हेतु तरी काय?

सन १९४७ ला इंग्रजांच्या मगरमिठीतून भारत कसाबसा सुटला तेंव्हा जगात भारत आणि भारतीयांना स्थान दुय्यम होते. पुढील साठ वर्षात हे चित्र झपाट्याने बदलले. मनमोहन सिंग सारख्या तत्सम घृणास्पद नेत्यांच्या अथक मूर्खपणा, शंढपणा आणि भ्रष्टपणाचा गेले साठ वर्ष सामना करत देशाने भरपूर प्रगती केली. परदेशस्थ भारतीयांनी मात्र प्रगतीचे आणि भरभराटीचे नविन विश्व निर्माण केले. केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर वैद्यकीय आणि व्यापार क्षेत्रातही भारतीयांनी यशाच्या उत्तुंग शिखरे गाठलीत आणि रग्गड पैसा कमविला. पाच-सात वर्षांपूर्वी एका विख्यात कंपनीच्या अनुमते परदेशी भारतीयांकडे तीनशी बिलियन डॉलर्स हुन अधिक संपत्ती आहे. आज अमेरिकेत भारतीय सगळ्यात श्रीमंत समुदाय आहे. आणि हे यश स्वातंत्र्योत्सव थाटात साजरी करुण्यात ठळक पणे दिसुन येत.
गेल्या दोन दशकात अमेरिकेत जाण्याचे प्रमाण अधिक असले तरी इंग्रजांची सत्ता सुरु झाल्यापासुन भारतीय बर्‍याच देशांमधे पसरले आहेत. वेगवेगळ्या देशात वसलेल्या भारतीयांचा इतिहास आणि अनुभवांवर एका लेखात लिहिणे अशक्य आणि अनुचित ठरेल. पण अमेरिकेतल्या असो कि इंग्लंडमधल्या, ऑस्ट्रेलिया असो की वेस्ट-इंडिज, एक साधारण गोष्ट अशी की भारत सोडूनच ही लोक यशस्वी ठरलीत किंवा यशाच्या आणि पैश्याच्या शोधातच या भारतीयांनी मेहनत करुन भारत सोडला. पण भारताबाहेर राहुनही ही लोक देशभक्त आणि देशप्रेमी राहिलीत ही आश्चर्याची गोष्ट आहे. विशेषतः अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयां बद्दल असे म्हणायला हरकत नाही.

या देशभक्तीचे बाराकाईने निरिक्षण केले तर त्यातील घड्या हळु हळु उलगडायला लागतात. असे ध्यानात येत की भारतातून नुकतीच आलेली लोक सुरुवातीला देशभक्त असतात आणि कालांतराने त्याचे रुपांतर भारत समाज भक्तीत होते. कारण भारतीय समाज आणि भारत देश या नाण्याच्या दोन बाजू नसुन दोन वेगळी नाणी आहेत हे लक्षात घ्यायला हवे. पण भारत देश हा भारतीय समाजापेक्षा वेगळा कसा? आपण इथे दोन उदाहरणांचा विचारात घेऊ. वेस्ट इंडिज मधे दिडशे वर्षांपूर्वी स्थलांतर केलेला भारतीय आणि गेल्या पंचवीस वर्षात मोठ्या संख्येने अमेरिकेत (संयुक्त राज्य अमेरिका) स्थायिक झालेला भारतीय यांना आपण उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या पायर्‍यांवर बघु शकतो. एक भारतीया भारतापासुन दिडशे वर्षांहुन अधिक तुटलेला आण तरीही भारतीय समाजाल घट्ट धरुन ठेवण्यात धडपड करणारा तर दुसरा भारतीय केवळ पंचवीस वर्ष परदेशस्थ असल्यामुळे अजुन भारताशी नाळ टिकवुन ठेवलेला. माझ म्हणण हे की हा अमेरिकेतला भारतीयाची आज-उद्यात ही नाळ तुटणारच आणि तो नविन स्वरूप धारण करणार.

भारतीय समाज अत्यंत पुरातन आणि सनातन आहे. (अस म्हणल्या बरोब्बर 'सर्व-धर्म-समभावी झोलेवाले' हिंदुत्ववादी, हिंदुत्ववादी चा आरोप लावतील. पण त्या शंख लोकांना सध्या अडगळीत रवाना करुया.) भारतीय उपखंडात जन्मलेल्या या संस्कृतीचा विस्तार पाकिस्तान पासुन ते म्यानमार पर्यंत मानायला हरकत नाही. हा समाज परकीय आक्रमणे आणि आंतरिक बदलाच्या छिन्नी हतोडीने घडलेला आहे. हजारो वर्षांच्या इतिहास मंथनाचे पडसाद आणि प्रतिसाद प्रत्येक भारतीयाच्या घडण-मोडणीतून ठळकपणे दिसतात. आपल्या चाली-रीती, रुढी परंपरांमधुन या संस्कृतीच्या पाउलखुणा उमटतात. आणि याचा रंग इतका गाढा आहे कि भारतीय व्यक्ती जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात गेला तरी तो या संस्कृतीची चौकडी उभारतो आणि वैयक्तिक आयुष्य त्यात कंठण्याचा प्रयत्न करतो. प्रसिध्द इंग्रजी भाषेतील लेखक विद्याधर नायपॉल त्यांच्या लहानपणीच्या आठवणींमधुन हे प्रकर्षाने जाणवत. त्यांचे पणजोबा (नायपॉल स्वतः ऐंशी च्या घरात आहेत) बिहार सोडुन ब्रिटिश नावेतून वेस्ट इंडिज मधे दाखल झालेत. म्हणजे साधारण सन १८५० च्या कालावधीत. ब्रिटिश साम्राज्याला तेंव्हा ऊसाच्या लागवडीत मजदूर लागत म्हणुन ते भारतीयांना तिथे घेउन जाउ लागलेत. सौदा असा की पाच वर्ष ऊसाच्या लागवडीवर पगारी मजदूरी करायची. पाच वर्षांनंतर एकतर परतीचे तिकिट मोफत मिळेल किंवा वेस्ट इंडिज मधेच जमिनीचा तुकडा मिळेल. बहुतांश गेलेले लोक तिथेच स्थायिक झालेत. भारतात तेंव्हा आर्थिक परिस्थिती नामुष्कीच होती त्यापेक्षा भारत सदृश्य हवामान असलेल्या पृथ्वीच्या दुसर्‍या टोकाला स्थायिक होणे सुसह्य होते. नायपॉलांनुसार या नव स्थायिकांनी भारतीय समाजाची पुनारावृत्ती वेस्ट इंडिज मधे केली. तिथल्या नद्यांना गंगा नाव देण्या पासुन ते भारतातले सणवार उपलब्ध सामुग्रीने साजरी करण्या पर्यंत सगळ आठवणींमधुन अगदी जातीभेदही या लोकांनी कायम ठेवलेत. हे उदाहरण देण्यामागचा उद्देश असा की परदेशात स्थायिक होण्यार्‍या सगळ्या भारतीयांनी भारतीय समाजाशी निष्ठा बाळगली आणि त्याच्या मागे एक महत्वाचे कारण आहे. सन १८५० च्या जमान्यात वेस्ट इंडिज ला जाणार्‍या भारतीयांचा भारत देश आपल्या भारत देशापेक्षा वेगळा होता (पाकिस्तान, बांग्लादेश भारतातच गणल्या जात होते) आणि भारत देशाची व्याख्या जरी पुढल्या शंभर वर्षात झपाट्याने बदलत गेली तरी वेस्ट इंडिज मधील भारतीय समाजाशी नात जोडल्यामुळे या लोकांना स्वतःची ओळख कायम ठेवता आली. भारत स्वातंत्र्याचा लढा, भारत या भौगोलिक प्रदेशाचा सन १९४७ साली झालेला उदय इत्यादी घटनांशी परदेशस्थ भारतीयांचा तिळमात्र संबंध नाही आणि संबंध ठेवायचा म्हटला तरी कसा ठेवणार?


माझा क्रिकेटशी संबंध फक्त क्रीक-इंन्फो वरील लेख वाचण्यापूर्तीच आहे. मी शेवटली पूर्ण मॅच सन २००३ च्य वल्ड कप ची बघितली असणार. भारत २०१२ विश्व चषक जिंकल्याच मला माहिती होत (मी फक्त तेंडुलकरची बॅटिंग बघितली आणि तो बाद झाल्यावर रागाने रिमोट फेकुन झोपायला गेलो!) पण त्या दिवशी बायको सोबत जेवायला गेलो होतो तर दुकानाच्या मालकाने जिलब्या आणुन दिल्यात, भारत विजयी ठरला म्हणुन. जणु काही त्याच्या घरच लग्न आहे या थाटात तो येणार्‍यांना जिलब्या वाटत होता. अमेरिकतल्या मोठ्या शहरांमधे तर जल्लोषाने हा क्षण मनविल्या गेला. हा वि़जय मनविणार्‍यामधली बहुतांश जन नुकतेच भारतातून अमेरिकेत दाखल झालेली आहेत. या लोकांच अजुनही भारतात जाण-येण होत असत, बहुतांशांची लग्नहि भारतातलीच. पण जी लोक साधारण २५-३० वर्षांपूर्वी अमेरिकेत आलीत त्यांचा आता भारताशी संबंध कमी होत गेल्याच दिसत. हि लोक दिवाळी जोरात साजरी करतात पण आता भारतातील घडामोडींशी त्यांचा फारसा संबंध नसतो. क्रिकेट, राजकारण इत्यादी विषयांवर खुप वर्ष अमेरिकेत राहिलेल्या भारतीयांना फारसा जिव्हाळा नसतो. आणि का असावा? आपण आता कायमचे अमेरिकेतच रहाणार आणि आपल्या पुढल्या पिढ्या सुध्दा अमेरिकेन असणार हि सत्याची जाणीव झाल्यावर भारत देशाशी संबंध तुटतो. मग मंदिर बांधुन, धार्मिक संस्था टाकुन परंपरा जपण्याचा आणि पुढल्या पिढीवर संस्कार बिंबविण्याचा प्रयत्न सतत केल्या जातो.


स्वातंत्र्य उत्सवाची मिरवणुक निघाली तर त्यात भारताचा झेंडा अग्रगण्य होता पण त्या सोबत गणपतीची आवश्यकता होती. जन-गण-मन सगळ्यांनी ताठ उभ राहुन गायल पण गणपती बाप्पा मोरया चा गजर त्याच्या मागोमाग झाला. स्वातंत्र्य उत्सव साजरी करणे म्हणजे भारत देश आणि भारतीय समाज याचा संगम होय. कालनीय उत्क्रांतीच्या पायर्‍या चढतांना परदेशी भारतीय हा सोनेरी दोराचा आधार घेतो एवढच.


भारत ही एक सतत बदलणारी व्याख्या आहे. कालचा भारत वेगळा होता आणि उद्याचा भारत फार वेगळा असणार पण भारताची एक प्रतिमा मनात बंद करुन नविन किनारे गाठणार भारतीय माणुस या समाजनिष्ठे मुळे सदैव भारतीयच रहाणार ही आनंदाची गोष्ट नाही का? 










8/15/13

चुक-भूल देणे घेणे

सध्या लिहित असलेला एक लेख चुकुन प्रकाशित झाला. ते लक्षात येउन आणि लेख ब्लॉगवर अप्रकाशित करण्या आधीच मराठीब्लॉगस. नेट च्या बॉट ने तो लेख त्यांच्या संकेतस्थळावर जाहिर केला. बरीच लोक तो लेख वाचायला रुद्र शक्ति वर येतांना दिसतायत. क्षमा करा पण लेख अजुन पूर्ण झालेला नाही. लौकरच तो प्रकाशित करण्याचा प्रयत्न करेन.

आशा करतो की रुद्र शक्ति वरचे इतर साहित्य वाचण्याजोगे असेल.  

धन्यवाद

8/6/13

पेशवाई आणि शिवशाही - एक संक्षिप्त आढावा (भाग १)

पेशवाईवर वाचतांना एक माझ्या लक्षात आले की पेशवाईबद्दल एकलच बोलण म्हणजे त्या राज्यसत्तेला नीट मान न देण्यासारख आहे. नुसती पेशवाईच नाही तर शिवशाहीला ही त्या काळातल्या भारतातील सत्ता आणि भारतेत्तर सत्तांच्या तुलनेत बघण आवश्यक आहे. तुलनेशिवाय थोरवी ध्यानात येत नाही. ही कल्पना डोक्यात घेउन पेशवाई, छत्रपतींचा राज्यकारभार आणि सांप्रत जागतिक परिस्थिती या तीन सुयांनी वेगळ कापड विणण्याच धाडस करतो आहे. यातील पेशवाई आणि छत्रपतींच्या राजकारभारावर ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत आणि अजुनही या विषयांवर बरच काही लिहिल्या जात. पण या दोन कालखंडांवर तुलनात्मक अभ्यास केल्याच माझ्या वाचनात आलेल नाही. या व्यतिरिक्त १७व्या आणि १८व्या शतकात भारत खंडात या आमुलाग्र बदल होत असतांना भारतेत्तर जगात, प्रामुख्याने युरोपिय, तुर्की साम्राज्य आणि अमेरिका खंडातही महत्त्वाचे बदल झालेत. त्याचे परिणाम आज आपल्य आयुष्यावर प्रकर्षाने जाणवतात. उदाहरणार्थ संयुक्त राज्य अमेरिकेची स्थापना. पण आज भारतात ४ जुलै ला अमेरिकेची स्थापना झाली हे माहिती असेल पण थोरल्या बाजीरावांनी दिल्ली कधी पादाक्रांत केली तर थोरले बाजीराव कोण असा प्रश्न पडेल. जर आपण काल्पनिक दुनियेत स्वतःला सन १७५० मधे उभ केलत वर उधृत केलेले बदल समानात्मक होते. म्हणजे त्या काळातले मराठी साम्राज्य जगातील इतर कुठल्याही सत्तेला काट्याची झुंज देण्याची ऐपत बाळगत होत. पण आपल्या दुर्दैवाने मराठा साम्राज्य झपाट्याने लयाला गेल तर युरोपिय सत्ता तेवढ्याच झपाट्याने बलशाली झाल्यात आणि आज आपला देश मराठी बोलायच्या ऐवजी इंग्रजी बोलतो.

अर्थात, या ऐतिहासिक घटना इतक्या सोप्या तर्‍हेने समजणे चुकीचे ठरेल. यातले बारकावे लक्षात घेतलेत तर खर चित्र स्पष्ट दिसत. सध्य परिस्थितीत तर प्रत्येक घटना - ऐतिहासिक असो की सांप्रत, जातीय दृष्टीकोणातूनच बघण्याची हौसच जणु आपल्या समाजाला लागली आहे. त्या ऐवजी मराठी कालखंडाचा अभ्यास त्या काळातील इतर जागतिक घटनांच्या अनुषंगाने केला, व त्या कालखंडावर तटस्थ दृष्टीक्षेप टाकला तरच मराठा वैभवाची आणि सामर्थ्याची खरी कल्पना येउन त्यातुन काही शिकण्यायोग्य मिळेल. आपल दुर्दैव अस की इतिहासातील घटना विसरणे, त्यातुन काहीही न शिकणे, स्वतःच्या पूर्वजांना नाव ठेउन पायावर धोंडा मारुन घेण्यातच आपला समाज पटाईत आहे. असो.

छत्रपतींचा काळ आणि पेशवाईत जवळ-जवळ ४० वर्षांचा प्रचंड घडमोडींचा काळ होता. मी पेशवाईची खरी सुरुवात थोरले बाजीराव पेशवे झाल्यापासुन मानतो. (यापुढे मी छत्रपतींचा उल्लेख राजे असा करेन. लिहायल सोप जात आणि खरा राजा तोच!) राजांच्या मृत्युसमयी मराठी राज्य पश्चिम महाराष्ट्र, कोंकण कर्नाटक आणि तमिळ भूमीत तंजावर पर्यंत पसरल होत. सन १६८० ला राज्याची घडी व्यवस्थित बसलेली होती. सैनिक-सरदार आपापल्या जागांवर दृढ आणि सजग होते. राज्य चालवायला लागणार्‍या पैश्यांची सोय नीट केल्या गेली होती. किल्ले भक्कमपणे रक्षित होते आणि आरमारावर राजे लक्ष केंद्रित करत होते. राजांना युरोपिय सत्तांची कितपत माहिती होती, अमेरिक इत्यादी खंडांबद्दल कितपत ज्ञान होते हे सांगणे कठिण आहे. पण या सत्तांना टक्कर द्यायची तर आरमार सशस्त्र हवे हे त्यांनी हेरले होते. आणि पुढे-मागे मोघलांना आटोक्यात आणल्यावर युरोपिय सत्तांशी संघर्ष निश्चित होता याची जाणीव त्यांना नक्कीच होती. पण आरमार आणि इंग्रजांशी व्यवहार या दोन्ही बाबतीत पेशव्यांनी फार मोठ्या चुका केल्यात. आपली सत्ता मजबुत करण्यामागे त्यांनी महाराजांनी अत्यंत कष्टाने रुपास आणलेल्या आरमाराचा नाश केला. इंग्रजांशी शेवटी झुंज समुद्रावर न होता जमिनीवर झाली पण आरमार सशक्त असते तर पुढील काळात पेशव्यांनाच त्याचा उपयोग झाला असता. तसच इंग्रजाचा मुघलांसारखाच नाश पेशव्यांनी करायला हवा होता. बहुधा त्यांना (सवाई माधवराव पर्यंतच्या पेशवाईला) इंग्रजांची खरी ओळख झाली नाही किंवा इतर युध्दापायी इंग्रजांच्या हालचालींचा फारसा विचार केल्या गेला नाही. यात एक बाब लक्षात घेण्याजोगी अशी की मूळ इंग्रज मुंबई किनारपट्टीवर १६व्या शतकात लागलेत. त्यांचे सुरतेत आणि मुंबईत वखारी होत्या. पण मराठ्यांचा वचक त्या भागात इतका वाढत गेला की शेवटी इंग्रजांना भारतात शिरायाला जाग कलकत्त्यातूनच मिळाली. नागपूरच्या भोसल्यांना कलकत्ता जिंकायची संधी होती पण मोक्याच्या वेळी शंखपणा केल्यामुळे हा भाग अनायसे इंग्रजांना मिळाला. पुढे नागपूरच्या भोसल्यांनी पेशवाईच्या विरोधात पहिले निजामची साथ देण्याचा प्रयत्न केला आणि मग पुढे इंग्रजांची. पेशवाईच्या उत्तरार्धात होळकरांसोबत नागपूरच्या भोसल्यांनी करारीची झुंज दिली पण तो पर्यंत उशिर झाला होता आणि त्याची परिणिती मराठी साम्राज्याच्या अस्ताने झाला.

आढाव्याची सुरुवात चुकांनी करायचा मानस नव्हता पण इंग्रज आणि आरमार या दोन्ही बाबतीत झालेल्या चुकांच मला फार वाईट वाटत.

मागे म्हटल तस पेशवाई आणि शिवशाहीत ४० वर्षांच अंतर होत. साधारण काळातही ४० वर्षात तफावत जाणवते तर सन १६८० ते सन १७२० मधला काळ तर प्रचंड घडामोडींचा काळ होता. राजांच्या मृत्युनंतर दोन घटनांची या ४० वर्षांवर फार मोठी सावली होती. एक म्हणजे औरंगझेबाची सन १६८२ ची दख्खनी स्वारी आणि दुसर म्हणजे छत्रपती संभाजींचा सन १६८९ चा अवेळी आणि बिभत्स मृत्यु. या दोन्ही घटना एका पाठोपाठ घडल्यात अस म्हणायला हरकत नाही. या दोन्ही अघटीतांनी मराठा राज्यावर प्रचंड तणाव पडला. संभाजी राजांनंतर शूर आणि मुत्सद्दी छत्रपती परत काही राज्याला मिळाला नाही. (शाहु महाराज नक्कीच मुत्सद्दी होते.) त्यामुळे संभाजी राजांच्या मृत्युनंतर नेतृत्वाची कमतरता जाणवायला लागली. या काळात औरंगझेबाच बळ वाढतच गेल. पहाता-पहाता मराठी राज्य केवळ कोकण पट्टी पर्यंतच सिमित राहिल. यात काही कमी असेल तर राजघराण्यातला कलह. मराठी राज्य या परिस्थितीतून तगल हा चमत्कारच मानावा लागेल. मला वाटत की या सगळ्या घटनांनी पेशवाई आणि शिवशाहीतला धागा तुटला. राजांच्या दरबारतला कोणीही मातब्बर सन १६९० नंतर दिसत नाही. त्यामुळे बाळाजी विश्वनाठ जेंव्हा दिल्लीला मुघलांशी करार करायला गेलेत तेंव्हाचे डावपेंच, राजकारण इत्यादी घटनांवर शिवशाही विचारधारांचा कितीसा प्रभाव होता हे सांगणे कठीण आहे. मराठा राज्यविस्तार आणि मुघलांचा नायनाटा करणे ही दोन ध्येय फक्त एक जिवंत धागा होता. हे राज्य श्रींची इच्छा आहे असले विचार पेशवाई पर्यंत काळापर्यंत टिकले होते अस म्हणता येणार नाही.

या सगळ्या उहपोहाचा उद्देश असा की पेशवाईचा जमाना शिवशाहीपेक्षा फार वेगळा होता. सह्यांद्रिच्या आडोश्याची गरज उरली नव्हती आणि किल्ल्यंचे महत्त्व राहिले नव्हते. उत्तर हिंदुस्तानातील सपाट मैदानावर लढण्यासाठी नविन तर्‍हेची युध्दसंस्थेची आणि कौशल्याची आवश्यकता होती.गेली साठ वर्ष डोंगर-कपार्‍यात लढा देण्यात निपुण असलेली मराठी पोरं अचानक दिल्लीपर्यंत कशी पोचलीत हे देवालाच माहिती. खुद्द राजांनाही इतक्या लौकर दिल्ली गाठण्याची स्वप्न बघितली नसणार. मी या लेखात आणि बाकीच्या लेखांमधेही दिल्ली गाठली, दिल्ली गाठली असा सारखा घोष करतो आहे. दिल्ली भारताची राजधानी आहे आणि तेंव्हा मोघलाईचीही राजधानी होती हे खर पण दिल्लीवर स्वारी करण्याच्या मनसुब्या मागे फार मोठा इतिहास दडला आहे. मला त्यावर थोड लिहायला आवडेल. पण सध्या हा लेख हाताबाहेर जातो आहे अशी शंकेची पाल मनात चुकचुकते आहे. म्हणुन इथेच पूर्णविराम द्यायला हवा. शेवटच म्हणुन एक मागे ऐकलेली गाथा सांगतो आणि लेख संपवतो.

थोरल्या बाजीराव नुकतेच पेशवा झाले होते. ते जेंव्ह पेशवा झालेत तेंव्हा ते अवघे वीसचे होते. छत्रपती शाहुंच्या दरबारात सगळी सरदार मंडळी आणि तरुण पेशवा पुढल्या कामगिर्‍या, मनसुबे इत्यादींवर चर्चा करीत होते. सगळ्यांच म्हणण अस होत की पुढली कामगिरी दक्षिणेवर व्हावी. तिथल्या प्रदेशावर परत सत्ता दृढ करावी आणि उत्तरेला जशी परिस्थिती निर्माण होईल तशी कार्यवाही करावी. असले विचार ऐकुन भर दरबारात तेंव्हा बाजीराव कडाडला की दिल्ली गाठायची सोडुन आपण दक्षिणेला का जातो आहे. तो पर्यंत दिल्ली गाठण्याच मानसिक बळ कोणातही निर्माण झाल नव्हत. तरुण बाजीरावाचा असला धाडसी पण बघुन शाहु महाराज खुश झालेत आणि त्यांनी बाजीरावांना उत्तरेला जाण्याची मुभा दिली.

ही गाथा किती आणि सत्य किती हे सांगण कठिण आहे. पण वीस वर्षात थोरले बाजीराव दिल्लीत दाखल झाले होते. महाराजांच स्वप्न शेवटी सन १७३९ ल अंशतः का होईना साकार झाले.

(क्रमशः)


ता.क. - या तुलनात्मक अभ्यासाचा अवाका फार मोठा आहे. महत्त्वाची पुस्तक मला उपलब्ध सध्या तरी उपलब्ध नाहीत. त्यामुळे 'आढावा' या शब्दाचा अर्थ थोडा मोकळेपणाने घ्यायला हवा. ऐतिहासिक घटनांच्या, नोंदींच्या आणि तारखांच्या सांगाड्याला मी मूर्त रुप देण्याचा हा एक प्रयत्न आहे. तारखा आणि घटनांमधे काही चूका असतील तर कृपया कळवाव, मी लगेच बदल करेन. 

7/28/13

पेशवाईच्या सांन्निध्यात

पेशवाईचा अभ्यास मी फार अलिकडेच सुरु केला. मला इतिहास वाचनाची फार लहानपणा पासुन आवड आहे. भारतीय इतिहासाबद्दल वाचन मुख्यतः मुसलमानी आक्रमण, त्यामगची कारण (यावर फारस काही उपलब्ध नाही) आणि शिवशाही एवढेच सिमित होते. अर्थात हे विषय भारताच्या गेल्या हजार वर्षांच्या इतिहासातील फार मोठा कालावधी व्यापतात. पण सन १७०० ते १८०० च्या दरम्यान भारताचा चेहरा-मोहरा बदवुन टाकणारी आणि रणधुरंधर अश्या पेशवाई सत्तेवर मी काहीच फारस वाचल नव्हत. शालेय इतिहासात तर पेशव्यांचा उल्लेख पण नव्हता. आता भारतीय सरकार मुसलमानी मुघलाईला भारताचा सुवर्ण काळ मानत असेल तर हिंदू मराठेशाही आणि पेशवाई बद्दल कस शिकवणार? हा मुद्दा एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरेल.

पेशवाई नावारुपास जरी थोरल्या बाजीरावांच्या काळात आली तरी या पदाची मूळ खुद्द शिवाजींच्या दरबारात रोवली होती. महाराजांच्या मंत्री मंडळात नेहमीच पंत-प्रतिनिधी असे. मोरोपंत पिंगळे हे नाव साधारणतः सगळ्यांना महिती असते. राज्याभिषेका नंतर त्यांच्या अष्टप्रधानां पैकी मानाची पहिली जाग पंत-प्रतिनिधींना होती. जरी तो काळ तलवारीचा होता तरी राजांनी प्रधानमंत्रीला सेनापतीच्या आधी मान दिला ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. महराजांच्या काळात या पदाला पंत-प्रतिनिधी अस म्हणल्या जात असे त्याच रुपांतर पुढे पेशवा हे कसे झाले याची माहिती मला कुठे वाचायला मिळाली नाही. पण माझ्या मते पेशवा हा शब्द फारसी आहे. इराणी दरबारात पंत-प्रतिनिधीला पेशवा म्हणल्या जात असे. माझ्या मते दख्खनी मुसलमानी दरबारांमधे असली पदवी मूळरुपी आली असणार आणि पुढे मराठी दरबारात ती पोचली असणार. साधारणतः सर्व पेशव्यांना श्रीमंत याच आदरार्थी नावाने संबोधित केल्या जात असे.

मराठी दरबारात महाराजांनी कुठलेही पद वांशिक केले नव्हते. म्हणजे पंत-प्रतिनिधींचा वंशज त्याच पदावर बसेल असे नाही. हि प्रथा सर्वप्रथम छत्रपती शाहु महाराजांनी सन १७१२-१३ ला रूढ केली. बाळाजी विश्वनाथ भट या हुन्नरी, शूर आणि तल्लख डोक्याच्या माणसाला त्यांनी पेशवा बनविले. बाळाजी विश्वनाथ यांच्या पूर्वायुष्याची फारशी माहिती उपलब्ध नाही. पण मराठी राजकारणात आणि मुख्यतः मुघली सत्तेशी चाललेल्या संघर्षात त्यांनी तलवार आणि बुद्धी दोहोंचे पाणी दाखवले. सन १७१२ (१८?) चा दिल्लीचा तह ज्यात मुघल मराठ्यांचे मांडलिक झाले त्यात बाळाजी विश्वनाथांनीच मराठी दरबाराचे नेतॄत्व केल. सन १७२० ला त्यांच्या मृत्यु नंतर शाहु महाराजांनी त्यांच्या मोठ्या मुलाला - बाजीराव विश्वनाथ भट, पेशवेपद बहाल केल. या पेशव्याला आपण थोरले बाजीराव नावाने ओळखतो. पेशवाईची खरी सुरुवात थोरल्या बाजीरावांच्या काळात झाली अस म्हणायल हरकत नाही. मुत्सद्दीपण, अलौकीक शौर्य, माणस जोडण्याचा जन्मजात गुण आणि अविरत कष्ट करुन राज्य जोडण्याची वृत्ती बघता छत्रपती शिवजींचे खरे वंशज थोरले बाजीरावच. मराठा दरबाराची भरभराट, राज्यवर्धन, राज्याचा जरब आणि उत्कृष्ट प्रतीचे पुढल्या पिढीचे सरदार हे सगळ थोरल्या बाजीरावांच्या जमान्यतच घडल.

या लेखात पेशवाईचा इतिहास लिहिण्याचा मानस नाही. त्यासाठी लेखमालिकाच लिहावी लागेल. प्रत्येक पेशवा - थोरल्या बाजीरावांपासुन ते राघोबा दादांपर्यंत सगळेच्या सगळे अव्वल दर्ज्याचे लढवय्ये आणि मुत्सद्दी होते. नुसते पेशवेच नाहीत तर मराठी दरबारातील सरदार - होळकर, शिंदे, गायकवाड, भोसले (नागपूर) तत्सम घराणीही स्वतंत्र लेखमालिकेच्या लायकीचे होते. या काळातील एक-एक पेशवा किंवा सरदार वेगळ्य काळात जन्मला असता तर त्याने तो काळ एकट्यानेच गाजवला असता. विशीच्या पोरांनी पूर्ण हिंदुस्तात पादाक्रांत केला. थोरले बाजीराव विसाव्या वर्षी पेशवे झालेत आणि तडाक्याने त्यांए दिल्ली गाठली. सदाशिवरावभाउ पानिपताच्या युद्धात अवघे तिशीचे होते तर विश्वासराव सोळा! महादजी शिंद्यांची पहिली स्वारी बाराव्या वर्षीची होती अस म्हणतात. सवाई माधवरावांच्या काळात म्हणजे पानिपत पराभवोत्तर काळात मराठी सत्ता दिल्ली ते चेन्नई आणि कोंकण ते बंगाल पर्यंत पसरली होती. हैद्राबादचा निजाम ते दिल्लीचा नाममात्र मुघल पुण्याचे मांडलिक होते. सन १७०० मधे केवळ थोडीशी कोंकणपट्टीत उरलेल मराठी साम्राज्य पेशवाईत चारही दिशांत फोफावल. पण आपल दुर्दैव अस की या एका पेक्षा एका सरदारांपैकी कोणालाही फारशी आयुष्यरेखा लाभली नाही. सगळे पटापट मेलेत. भट घराण्यातल्या सहा पिढ्या शंभर वर्षात आटपल्यात. तिच दशा होळकर, शिंदे इत्यादी घराण्यातली. म्हणजे छत्रपतींच्या काळापासुनचा पन्नाशी न गाठण्याची दुर्दैवी कहाणी पेशवाईतही अखंडीत राहिली. 

अर्थात या काळात चुका झाल्या नाहीत अश्यातला भाग नाही. राज्यकारभार आणि राज्यविस्तार यात चुका होणारच आणि झाल्यात. काही चुका तर बुद्धी चरायला जाण्याची ज्वलंत उदाहरण आहेत. महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जे निर्णय घेतलेत आणि कामगिर्‍या निभावल्यात तसाच कित्ता गिरवला असता तर यातल्या काही चुका टाळता आल्या असत्या पण मला हे सगळ तीनशे वर्षांनी लिहिण सोप आहे. त्याकाळात प्राप्त परिस्थितीत जे काही पेशवा मराठी दरबारात मिळवल ते बघता हा काळ भारताच्या वैभवशाली इतिहासात गणायला हवा.

१७ व्या शतकातल्या मराठी रक्ताची रग अंशतः या काळात उतरली तर भारत खरच विश्वसत्ता बनेल.

पेशवाईतील काही घटनांवर विस्तृत लेखन करण्याचा मानस आहे. संधी मिळताच या कामाचा श्री करीन.