12/23/07

भातुकलीचा खेळ

आज इतक्या वर्षांनी त्याची चाहुल लागली. इतके दिवस मी हाका मारत होते. सतत प्रश्न विचारीत होते पण उत्तर तर सोडाच पण साधी हुं का चुं नाही. शेवटी मी वाट बघण सोडल. आज इतक्या कालांतराने अपराध्यासारख माझच मनं माझ्यासमोर उभ आहे. निर्जन पडलेल्या वाड्याच्या पडक्या भींती कश्या घडलेल्या घटनांची भीषणता दर्शवितात तस माझ्या मनाच्या परतणार्‍या पाउलखुणा माझ्या माझ्या भूतकाळाची दयनीयता प्रदर्शित करत होत्या. जखमांवरच्या खपल्या काढत होत्या.

मला आज लिहावसं का वाटल, कोण जाणे. डॉक्टर काका नेहमी म्हणत की जे मनात आहे ते कागदावर उतरविण्याचा प्रयत्न कर. पण ते कधी जमल नाही. हृदयात खुपलेल पात डोळ्यांना कस दिसणार? आणि ते दु:ख शब्दांमधे कस मावणार? पण मी आज प्रयत्न करणार. माझं शुष्क दु:ख शब्दांच्या तोकड्या आकृत्यांमधे माववण्याचा प्रयत्न करणार. आता खरं सांगायच तर प्रेमभंग कोणाचा कधी झाला नाही का? पण माझ प्रेम भंगल नाही. ते मेलं. अचानकपणे. घृणास्पद रित्या.

तो मला सोडुन गेल्यापासुन मी अनेकदा माझ्या आयुष्याची घडी परत घालण्याचा प्रयत्न केला. पण पैठणीची घडी एकदा उलगडली की पहिले सारखी थोडीच बसते. सुरुवातीला खुप रडले. काही काळाने सवय झाली रडण्याची. मग माझ्यावर इतक रडण्याची पाळी का आली म्हणुन अजुन रडले. शेवटी अश्रु संपुन गेलेत. पण दु:ख कायम राहिलं. कारण रडण म्हणजे दु:ख नव्हे. ती तर शरीराची एक प्रक्रिया आहे. खर दु:ख तर रडल्या नंतर सुरु होत. डोळ्यातुन खार पाणी वाहण थांबल्यावर अघटीताचं पात काळजात रुतु लागत. मग मनाचे कढत अश्रु झिरपु लागतात. त्यांना वाहुन जायला मुळी जागाच नसते. जखमेवर साचलेल्या पु सारखे ते काळजात साचु लागतात. ना धरवत, ना सोडवत. हे असलं ओझ घेउन जगासमोर जगण्याच ढोंग करावच लागत. या कठ-पुतलीच्या खेळातुन काही सुट मिळत नाही. काय चुकल आणि कोणाचं चुकल याचे कधीही न जुळणारे हिशोब करत मेलेल्या मनावर शरीराच ओझ लादुन आयुष्य ढकलावच लागत. विदुषकासारखे पाउडर लाउन जगासमोर हसायचे आणि आतल्या आत कुढायचे.

प्रेम म्हणजे नक्की काय असत याचा मी बरेचदा विचार करते. शारीरिक आकर्षणा पलिकडे प्रेमाची बहुधा सुरुवात होत असावी. त्याच्या अंतरीचे रंग मला जेंव्हा मला भावले तेंव्हा मी खरी त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या गुणांवर व दुर्गुणांना मी सारखच आपलंस केल, म्हणुनच मी त्याच्यावर खर प्रेम केल. त्यानीही बहुधा माझ्यावर असच प्रेम केल असावं. पण प्रेमाला संयोगाचा पूर्ण-विराम लागला नाही तर ते प्रेम का? मला वाटायच कि खर प्रेम असल तर कितीही वाईट परिस्थिती असली तरी ते तुटत नाही. मनाची समजुत घालुन कोणी मना विरुध्द जात नाही. जे तुटत ते प्रेम नसतच मुळी. आता वाटत की हे असं सगळ चित्रपटातच होत.

आम्ही दोघांनी एक-मेकांवर निरिताशय प्रेम केल। मग आमचं का जुळल नाही? आमच्या घरीसुध्दा पसंती होती. साखरपुडा झालेला होता आणि लग्नाची खरेदीसुध्दा सुरु झाली होती. मग त्याने मला दगा का दिला? मला असा वार्‍यावर टाकुन कसा गेला?

माझ्या आयुष्याच्या पाउलवाटा आता मी बघते तर मन भ्रमित होत। हातावरच्या 'भविष्य' रेखांसारख अगम्य आणि दारुण दिसतात त्या पाउलवाटा. गम्मतच असते, जन्मापासुन भविष्याचा नकाशा माणुस आपल्या तळहातावर घेउन, भविष्याच्याच शोधातच आयुष्यभर वणवण भटकतो. मी मात्र त्याच्या हातावरच्या रेखांवर चालायला तयार होते. पण माझ्या भविष्य रेखांनी मला बरोब्बर पकडले. विळखा घालुन गिळंकृत केले.

मला अजुनही आमचं शेवटच बोलण आठवत. रात्री अडीच वाजता त्याने फोन केला होता. जेमतेम पाच मिनिटं बोलला असेल. मी नुसतच ऐकत होती. माझं हृदय धड-धड करत होत. " ऐक मी काय बोलतोय ते. दोन तासांनी आम्ही एक मिशनला जाणार आहोत. मिशन कठीण आहे. परतण्याची खात्री नाही. मी पुर्ण प्रयत्न करीन. पण नाही आलो तर तु माझ्यात अडकुन राहु नकोस. प्लीज, लग्न कर. मला माहितीय की तु माझ्या शिवाय जगु नाही शकत. प्लीज, माझी राणी, तु पुन्हा संसार मांड. दुसर्‍या कोणाला सुखी कर. नाहीतर मी सुटणार नाही गं. काही वाईट घडल तर तू प्लीज, आपला नविन संसार मांड."

हें काय असलं अभद्र बोलण झाल? माझे लाड केले नाहीत, ना मला लाड करु दिलेत. लोक म्हणतात की बेपत्ता झाला. असा कसा बेपत्ता होईल? कुठे ना कुठे तरी सापडेलच ना. त्याला माझी आठवण येत नाही का? मग परत का येत नाहीया तो? असा, संसार सुरु व्हायच्या आधीच का तो उठुन चालला गेला?.....

12/3/07

॥ निर्वाण-षटकम् ॥

मनोबुध्यहंकार चित्तानि नाहं न च श्रोंत्रजिह्ने न च घ्राणनेत्रे।
न च व्योम भूमिर्नतेजो न वायु: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥१॥

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायु: न वा सप्तधातु: न वा पंचकोशः।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥२॥

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभाव: ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥३॥

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥४॥

न मे मृत्युशंका न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य: चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥५॥

अहं निर्विकल्पो निराकार रुपो विभुत्वाच सर्वत्र सर्वेद्रियाणाम् ।
न चासङगत नैव मुक्तिर्न मेयः चिदानंदरुपः शिवोहम् शिवोहम् ॥६॥


-- आद्य शंकराचार्य

12/2/07

संगणक जेंव्हा मरतो तेंव्हा!

पंगत रंगात आली असता अचानक वीज गेली कि कशी शांतता पसरते तसा माझा कंम्प्युटर 'बुप' आवाज करुन बंद पडल्यावर मला झाल। 'प्लग सैल होता का? बॅटरी तर खराब नाही झाली? च्यायला, अमेरिकेतही वीज जायला लागली वाटत?' अश्या प्रश्नांनी मनात क्षणभरात गर्दी केली. तस बघीतल तर मी चार वर्षापुर्वीच हा कंप्युटर विकत घेतला होता पण कंप्युटर जगातील वयोमानाच्या हिशोबाने त्याने शंभरी कधीच गाठली होती. बरं त्यावर या दरम्यान बर्‍याच शस्त्रक्रियाही उरकल्या होत्या. शेवटल्या वेळेस मला डॉक्टरांनी (कंप्युटरचा डॉक्टर!) मला स्पष्ट सांगितल कि परत काही झाल तर थेट रद्दीत टाका. अहो, पण म्हणुन काय त्याने असा अचानक जीव टाकावा? हार्ट-फेल झाल्या सारखा. अर्थात, हार्ट-फेल होण कधीच अपेक्षित नसत. पण या अनपेक्षित धक्क्याचे परिणाम माझ्या पाकीटात भुकंप आणणार होते. नवीन लॅप-टॉप काय स्वस्त असतात? खर्चाच्या विचाराने पाय लटपाटायची वेळ आली. कानात कुंय्...आवाज येऊ लागले. कसं तरी स्वतःला सांभाळुन मी परत एकदा बॅटरी, प्लग सगळ नीट तपासल. सगळ्या गोष्टी भौतीक जगात आप-आपल्या जागी स्थिर होत्या पर प्राण-पंछी उड गये थे।

'हात्तीच्या कंप्युटरची तर' अस काहीस पुटपुटत मी पुढे काय करायचं याचा विचार करत खोलीत फेर्‍या घालु लागलो। नवीन कंप्युटर घेणं म्हणजे डोक्याला एक ताप आहे. तंत्रज्ञान सश्यासारख उड्या मारत पुढे जातय आणि माझ्या सारख्या कासवाच्या बुध्दीच्या लोकांचा या शर्यतीत मुळीच तगावा लागत नाही. कुठला कंप्युटर घ्यायचा, किती पैशे मोजायचे, काय-काय तंत्रज्ञान त्यात हव याचा हिशोब पूर्ण होई पर्यंत किमान दोन आठवडे कंप्युटर येणार नव्हता. गाणी नाही, इंटरनेट नाही, चॅटिंग नाही, पिक्चर नाही, काहीही नाही. ठण ठण गोपाळा!

तो रविवार शोक मनविण्यात गेला. पण आठवडा जसा जसा जाउ लागला तस कंप्युटर नसल्याचे बरेचशे फायदे दिसु लागले. संध्याकाळची कामे भराभरा होऊ लागले. अन्न अधिक चविष्ट लागु लागल. कामा व्यतिरिक्त वाचन होउ लागले. आई फोन फर काय बोलतेय ते उमजायला लागलं रेडिओवरही गाणी लागतात आणि वर्तमानपत्रातुन ही बातम्या मिळतात याचा पुनःश्च शोध लागला. कंप्युटरच्या आठवणीने अधुन-मधुन गळा भरुन येतो पण ते तेवढच.

पण या सगळ्यात काही तरी बोचत होत। लाकडाची शिळक तळहातात गेली की मन कस बेचैन होत तस काही तरी रुतत होत. यावर विचार करायला संध्याकाळी बराच वेळ असतो त्यामुळे विचारांची भिंगरी फिरु लागली.

सकाळी ऑफिस, संध्यकाळी कंप्युटर, जेवतांना कंप्युटर, रात्री झोपायच्या आधीसुध्दा कंम्प्युटरच। दुसर्‍या दिवशी परत ऑफिस अस चक्र अव्याहत पणे चालु होत. त्यामुळे मला बहुतेक माझ्यासोबत रहाण्याची सवय राहिली नव्हती. मानवी शरीरात जरी मी वास करत असलो तरी अदृश्य वेब-जगताचा मी रहिवासी झालो होतो. कंप्युटर, इंटरनेट ही आवश्यकता तर आहेच पण त्याहुनही पुढे ते एक व्यसन होत आहे. सतत आपल इंटरनेट वायफळ संकेत-स्थळ चाळत बसायची. उपयोगी माहिती अवश्य मिळते पण त्याच्या तुलनेत फुकटचा वेळ फार जातो. हे अदृश्य वेबजगत दिसत तितक सोप नाही. या मायाजाळातही दु:खापासुन सुटका नाही. थोडा खोल विचार केला तर मला जाणवल कि हे कंप्युटरचं, इंटरनेटचं व्यसन समाजापासुन विन्मुख होण्याचे साधन तर नव्हे. किंवा दुरावत चाललेल्या समाजामुळे लोक जवळीक साधायला इंटरनेटच आधार तर घेत नाहीयात? समस्या दोन पैकी कुठलीही असो पण हा एकाकीपणा समाजाच्या विस्कटत चाललेल्या घडीची प्रतिमा नक्कीच आहे.

दोन दृष्टींनी समाज झपाट्याने बदलतो आहे. एक, जागतिकीकरणामुळे व त्यान्वये, पैश्यांच्या वाढत्या हव्यासापायी, नात्या-गोत्यांचे धागे सैल व जीर्ण होता आहेत. व दुसरं म्हणजे समाज स्वत:ला एका विशिष्ट प्रतिमेत बघण्याची स्वतःवरच बळजोरी करतो आहे. या दोन कारणांचा संक्षिप्तात विचार करुया.
नाती-गोती म्हणजे रक्ताची नाती एवढाच माझा उद्देश्य नव्हे तर शेजार-पाजार, मित्र-मंडळ व ओळखी-पाळखीतील (आणि प्राची-गच्ची!) सगळ्यांचा समावेश मी 'नाती-गोती' च्या व्याख्येत करतो आहे। मनुष्याचे व्यक्तिमत्व ही सर्व पात्रे रंगवितात. यातील चांगले कोण वाईट कोण, कोण नातेवाईक आवडतो कोण नावडतो हा मुद्दा गौण आहे. पण या सर्वांच्या बोटांचे ठशे आपल्या व्यक्तिचित्रावर उमटलेले असतात. पण व्यक्ति-स्वातंत्र्याचा विपरित अर्थ लाउन, 'मी माझ्यापुर्ताच' किंवा 'मी माझ्या कुटुंबापुर्ताच' या भावनेने आयुष्य जगणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडुन घेण्यासारख आहे. सगळ्यांसमोर आपल अगदी उत्तम चाललय हा आव आणायचा आणि इथे मुलं वाया बिघडता आहेत हे बघुन हतबद्ध् व्हायच. काही समस्या कौटुंबिक सीमा-रेषे पलिकडे असतात. तीथे समाजा व्यक्तिला वठणीवर ठेवतो. हे सामाजिक नियम आखलेले नसतात पण ते आवश्यक मात्र असतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली हे नियम धाब्यावर बसविणे धोक्याचे आहे. व्यक्ति, कुटुंब व समाज या वेग-वेगळ्या संकल्पना नव्हेत तर एक-मेकांच्या प्रतिमा आहेत. हि भावना सगळ्यांनी जपणे आवश्यक आहे.

प्रजातंत्र म्हणजे केवळ निवडणुका नव्हेत तर सुदृढ व स्वयंशासित समाज हे प्रजातंत्राचे अंतिम साध्य होय.

दुसरं म्हणजे सगळ्यांना सगळ हव याचा हव्यास. याचा अर्थ असा नव्हे की कमी साधनांमधे जगणे चांगले किंव्हा चैनीच्या वस्तु घेणे चुकिचे आहे. प्रत्येक वस्तुची, कृत्याची, विचारांची, थोडक्यात मानवी पैलुंची किंमत पैश्यात लावण्याकडे जो कल वाढत चालला आहे त्यामुळे समाज निष्प्राण व शुष्क होतो आहे. मला हे हव, ते हव, सगळ हव आणि त्यासाठी मी वाट्टेल ते करणार. त्यासाठी लागतील तर सगळी बंधन, रुढी-परंपरा, नाती-गोती मी तोडणार, या गणिताचे उत्तर कधीच बरोबर येणारं नाहीया.

या दोन्ही कारणांमुळे व्यक्ति एकटा पडतो आहे. इंटरनेटवर वेळ तर जातोच पण जे आपल्याकडे नाही किंवा जे आपण नाही ते ही वेबदुनियेत खोटं-नाटं दाखविता येत. हि परिस्थिती भितीदायक तर आहेच पण केविलवाणीसुध्दा आहे. व यावर तोडगा आपला आपल्यालाच काढायचा आहे.

11/23/07

संस्कृत रचना

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम।
तस्मात् कारुण्य भावेन् रक्ष रक्ष परमेश्वर।
रक्ष रक्ष परमेश्वर॥

मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत् पुजितं मया देव परिपूर्णं तद्स्तुमे
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्
पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर
क्षम्यतां परमेश्वर॥

कालेवर्षतुपर्जन्य पृथ्वी सश्यशालिनी
देशोयं शोभधरितो ब्राह्मणा संतु निर्भया।
अपुत्रा पुत्रीणःसन्तु पुत्रिणःसन्तु पौत्रिणा
अधना सधना सन्तु जीवन्तु शरदःशतम्॥

सर्वेजना सुदृढो भवन्तु तथास्तु
सर्वेजना सुदृढो भवन्तु तथास्तु
सर्वेजना सुदृढो भवन्तु तथास्तु ॥

ॐ शांति शांति शांति: ॥

टीप -: या रचनेचे रचनाकार कोण आहेत हे मला माहिती नाही.

10/30/07

आद्य शंकराचार्य - भाग १

गीतेतील एक श्लोकात कृष्ण अर्जुनास म्हणतो की धर्म संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात जन्म घेइन. याचा अर्थ बरीच लोकं असा घेतात की विष्णुचे ९ अवतार झाले असुन १० अवतार अपेक्षित आहे. मग गौतम बुध्दाला जरी ९ वा अवतार मानले तर याचा अर्थ असा होतो की गेल्या तीन हजार वर्षात धर्माला कधी ग्लानी आलीच नाही? अर्थात आली. बरेचदा तो मृतवत झाला व प्रत्येक वेळेस थोर-मोठ्यांनी धर्मोत्थापनेस जन्म घेतला. कोणी मुत्सद्दीपणाने तर कोणी शौर्याच्या बळावर धर्माचे रक्षण केले. हे थोर-महात्मे अवतार होते की नाही हा विवाद बाजुला ठेउनच त्यांच्या थोरवीची कल्पना येउ शकते.

ईसवी सन पूर्व पाचव्या शतकात वैदिक धर्माचा र्‍हास झालेला होता व सनातन धर्म अक्षरश: आचके देत होता. अश्या परिस्थितीत केवळ प्रगल्भ बुध्दीच्या बळावर आद्य शंकराचार्यांनी भारतवर्ष अक्षरशः पादाक्रांत करुन सनातन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी केलेल्या कार्याचे प्रतिसाद आजही सनातन धर्माच्या प्रत्येक कार्यात उमटतात. त्यामुळे भारताच्या मृत्युंजयांच्या मालिकेत आद्य शंकराचार्यांचे नाव अग्रगण्य घ्यावे लागेल.

आद्य शंकराचार्यांनी धर्म संस्थापना केली म्हणजे नेमके काय केले याचा विचार करण्याआधी धर्म म्हणजे काय याचा थोडा आढावा घेणे आवश्यक आहे. सांप्रत परिस्थितीत 'आपला धर्म कुठला?' अशी पृच्छा केली असता हिंदु-मुसलमान असल्या पैकी कुठले उत्तर द्यावे लागेल. पण भारतीय सनातन जीवनपध्दतीत धर्माची व्याख्या याहुन अधिक व्यापक आहे. धृ धातु पासुन धर्म शब्दाची उत्पत्ती होते. धृ धारयती इति धर्मः। धृ म्हणजे स्थिर. कालामानानेही जे बदलत नाही ते धृ. आणि जी जवाबदारी, जी कर्तव्य कधीही बदलत नाही व ती नेहमीच निभवावी लागते तो धर्म. मनुष्याकडुन अपेक्षित असलेले आचरण, त्याची कर्तव्य, वैयक्तिक नियम व विविध आश्रमांद्वारे अपेक्षित सामजिक नियम इत्यादी सर्व कार्यभार धर्मांतर्गत मोडते. या व्यतिरिक्त त्याचे परमार्थाविषयीच्या तत्त्वज्ञानास धर्मच म्हणतात.

यात लक्षात घेण्यायोग्य अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नियमावलीपैकी एकही नियम कोणावर लादलेला नाही. प्रत्येक मनुष्याकडुन विशिष्ट आचरणांची अपेक्षा आहे पण जोरा नाही. असे असताही समाजात या नियमांचे बर्‍यापैकी आपणहुन पालन होतांना दिसते. माझ्या मते यामागचे कारण भारतीय मनावर परमार्थाविषयीचा पगडा होय. कळत- नकळत समाजाचे विविध स्तर परमार्थाविषयीचे तत्त्वज्ञान आत्मसात करित असतात व त्यांचे प्रतिसाद भौतिक आयुष्यात सतत उमटतात.

भारतीय पुरातन इतिहासाचा आढावा घेतल्यास लक्षात येते की विविध विचारप्रणालींनी भारतीय संस्कृतीला नटविले आहे. यातील बौध्द व जैन या नास्तिक विचारधारा वगळता इतर सर्व विचारधारा वेदांशी आपले नाते दृढ करण्याचा प्रयत्न करतात. (चार्वक संहितेचा मी या विचार-प्रणालींमधे समावेश केलेला नाही.) यात सर्वात शेवटची संस्था म्हणजे वेदांत होय. आचार्यांच्या बरेच आधी वेदांत विचारप्रणालीचा उगम झालेला होता. आचार्य बद्रायण यांनी 'वेदांत सुत्र' ग्रंथात ५५० सुत्रांद्वारे वेदांतावर भाष्य केले असे मानल्या जाते. या ग्रंथातच ब्रह्मैक्यत्वाचा मुद्दा आढळुन येतो. या तत्त्वावरच पुढे आद्य शंकराचार्यांनी अद्वैत सिध्दांताची मांडणी केली. भारत वर्षात जन्मलेल्या अनेक तत्त्वज्ञानांपैकी आजच्या घटकेला अद्वैत वेदांतच जिवंत आहे यावरुन त्याचे महात्म्य सिध्द होते. याचा अर्थ असा नव्हे की आधीच्या विचारप्रणाली चूक होत्या. पण भारतीय तत्त्वज्ञानाच्या प्रगतीपथावर अद्वैत शेवटचा मुक्काम मानता येइल.
(क्रमशः)

10/19/07

गोड-लिंब

"या ताई. बसा आरामात. झालाच माझा स्वयंपाक" जोशी बाईंनी सुधा ताईंच स्वागत केलं.

"होऊ दे तुझ आरामात. मला कसली घाई नाहीया"

"यंदाच्या १०वीच्या वर्गातील विद्यार्थी कसे आहेत? किती मेरीट येणार?" जोशी बाईंनी विचारलं. सुधा ताईंनी लगेच उत्तर दिल नाही. काय उत्तर द्यावे याचा जणु त्या विचार करत होत्या.

"किती मेरीट येणार?" जोशी बाईंनी परत विचारले.

" अगं, शिकवण्या सुरु झाल्या नाहीयात. मुलांना उन्हाळ्याची सुट्टी दिली. आजकाल तर ९वी च्या परीक्षे आधीच १०वीचे वर्ग सुरु होतात. मुर्खांचा बाजार भरत चाललाय. मी मुलांना सांगितले की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे मजा करा, जुन महिन्यात १०वीचा नारळ फोडुया."

थोडं खिन्न हसुन पुढे म्हणाल्यात "तशीही यंदा फारशी मुलं नाही आलीत." सुधा ताईंच चित्त काही थार्‍यावर दिसत नव्हत.

"तुला काही मदत हवी आहे का? मी पण अगदी वेळेवर आले. लौकर येणार होते पण शेजारच्या मारवाड्याने उच्छाद घातलाय."

"मारवाडी?" जोशी बाईंनी प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.

"शेजारच्या केळकरांचा प्लॉट विकला गेल्याच कळल नाही का तुला? प्लॉट रिकामा होता तर मी तिथेही बरीच झाड लावली होती. पण नवीन मालकाने एकाच दिवसात सगळ साफ केलं." मग खिडकी बाहेर शुन्यात नज़र टाकुन त्या पुढे म्हणाल्यात " एवढच नाही तर त्याच्या प्लॉटवर डोकवणार्‍या माझ्या पेरुच्या आणि आंब्याच्या फांद्याही छाटल्या त्याने"

जोशी बाईंना काय बोलाव सुचेना. उगाचच काहीतरी बोलायच म्हणुन जोशी बाई सुधा ताईंना झाडांबद्दल माहिती विचारु लागल्यात.

तेवढ्यात अनिरुध्द जोरात दार आपटुन घरात आला. "आई....भुकेनी मरतोय मी, जेवायचं झाल का?" असं ओरडत तो दाण-दाण उड्या मारत न्हाणीघरात रवाना झाला.

" अरे, हळु. तु घरात आल्याच सगळ्या गावाला कळायला नकोय" जोशी बाई ओरडल्या.

सुधा ताई आज सवाष्ण म्हणुन जेवायला आल्या होत्या. म्हणुन जोशी बाईंची स्वयंपाकाची थोडी घाई होत होती. अनिरुध्दला आज आईला मदत करायची होती पण आज सकाळी बाहेर गेलेला तो आत्ता उगवला होता.

"अनिरुध्द, तुला येतांना गोड-लिंबाची पानं घेउन यायला सांगितली होती ना"

"मला वाटल की सुधा काकुच घेउन येणार आहे तिच्या बगिच्यातुन" अनिरुध्द उत्तरला.

आधीच घाई होत होती त्यातुन अनिरुध्द गोड-लिंब आणायचा विसरला बघुन जोशी बाईंचा पारा चढला. "एक काम सांगितल तर ते सुध्दा ढंगानी करता येत नाही. दिवसभर नुसत्या चकाट्या पिटायला हव्यात गावभर"

"अरे, एवढीशी पानं आणायची विसरलो तर एवढ रागवायला काय झाल? अनिरुध्द उगाच काहीतरी बोलायच म्हणुन बोलला.

"हे बघ, उलट उत्तर देउ नकोस. एक साध काम करता येत नाही तुला. कुठे होतास सकाळ पासुन, काय करत होतास? "

"राहु दे गं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालु आहेत ना त्याच्या"

" अहो, रागवु नाही तर काय करु. सकाळ-संध्याकाळ नुस्ता हुंडारत असतो. सकाळी उशीर उठायच मग नास्ता करुन मागल्या गल्लीतल्या मुलांसोबत चकाट्या पिटायच्या. दुपारचं जेवण झाल्यावर मस्त कुलर मधे ३ तास झोप कि संध्याकाळी परत वायफळ बडबड करायला मागल्या गल्लीत आमचे महाराज हजर" जोशी बाई फणकारल्या.

"बाप रे आई, इतकही काही चुकल नाहीया माझ" अनिरुध्द ने उलट उत्तर दिले.

" अरे, अनी अस आईला उलट उत्तर देउ नये. बरं तुझ्या मुंबई च्या शिबिराच काय झाल?" सुधा ताईंनी विषय बदलवायला म्हणुन विचारलं

" माहीती नाही. बाबांना विचारा." अनिरुद्धने गाल फुगवुन उत्तर दिले. मग हळु आवाजात स्वतःशीच पुटपुटला "एक तर इथे आई डोकं खाते सकाळ-संध्याकाळ" अनिरुध्दचे वाक्य पुर्ण केल नसेलच तेवढ्यातच जोशी बाईंनी त्याला फाडकन झापड मारली.

" लाज नाही वाटत तुला अस बोलायला. कुठुन शिकला असं बोलायला? बाबांची चूक आहे हां, का रे? त्यांना शंभर काम असतात. तुला एवढं जायच होता शिबिरात तर स्वत: नव्हता का अर्ज करता येतं. लिहिता येतं ना तुला, फॉर्म भरायला. आणि मी तुझं डोकं खाते ? अस बोलायची एवढी हिम्मत झाली तुझी?" सुधा ताई कडाडल्या. रागात त्यानी जोरात टप्पल मारली.

" लागतय ना मला" अनिरुध्द कळवळुन म्हणाला.

" अहो, जाउ द्या. लहान आहे अजुन. सुधा ताईंनी अनिरुध्द ची बाजु सांभाळायचा प्रयत्न करायला लागल्या.

"अनि, आईला सॉरी म्हण"

" काहीही सांगितल कि एकच उत्तर येतं. १०वीची परिक्षा आत्ताच संपली आहे. मला मजा करु दे. बघते आता कि काय दिवे लावतो १०वीत." जोशी बाईंचा राग काही आवरत नव्हता. त्यांनी अनिरुध्दचा कान ओढला.

"अहो, काय करताय. इतक रागवायला काय झाल" असं म्हणत सुधा ताईंनी जोशी बाईंचा हात धरला.

जोशी बाईंनी सुधा ताईंचा हात झटकला. "हे बघा सुधा ताई, तुम्ही याच्या मधे पडु नका. तुम्हाला काही माहिती नाही."

" का, मला स्वतःच मुल-बाळं नाही, म्हणुन अस म्हणताय का?" सुधा ताई फटकन उत्तरल्या.

जोशी बाईंना काय उत्तर द्यावे कळेना. त्या नुसत्या अचंबित नजरेनी बघत राहिल्या.

"कळत मला. तुमचा संसार भरलेल आणि मला मेलं एक सुध्दा पोरं नाही. म्हणुन तुम्हाला वाटत कि मला पोरं कशी मोठी करायची हे माहिती नाही. पण पोरांकडे लक्ष द्यायच सोडुन तुम्हे दिवसभर नोकरी करता आणि मग अपेक्षा करता कि मुलं शिस्तित रहावी म्हणुन. कस शक्य आहे ते?" खोलीत विचित्र शांतता पसरली. अनिरुध्दला कळेना मधुनच हे काय सुरु झालं म्हणुन.

जोशी बाईंना जणु अजुन शब्दांचा संदर्भ लागत नव्हता.

" आई, सॉरी. मी कधी परत अस बोलणार नाही" अनिरुध्द म्हणाला.

पण सुधा ताई काही थांबण्याच्या नादात नव्हत्या. खुर्चीत बसत त्या म्हणाल्या " इतकी वर्ष बघतेय मी, सोन्यासारखी मुलं आहेत. पण तुम्ही सतत त्यांची काळजी करता आणि त्यांना रागवत असता. तुम्ही त्यांच संगोपन करण्यात कमी पडत असाल तर त्याचा राग मुलांवर कशाला काढायचा" " अहो, काय बोलताय तुम्ही" जोशी बाई सुधा ताईंचा हा नवीन अवतार बघुन चकित झाल्या. सवाष्ण म्हणुन सुधा ताई जेवायला आल्य होत्या. पण आज अनिरुध्दला रागवण्याच निमित्तमात्र झालं व इतकी वर्ष साचत असलेल्या व्यथा खपली निघुन जखमेतुन रक्त वहाव्यात तश्या वाहु लागल्या.

" मी किती तरी वेळा आडुन-आडुन सांगण्याचा प्रयत्न केला की थोड मुलांच्या कलेनी घ्या म्हणुन पण मी काय बोलतेय याकडे तुमच लक्ष असेल तर शप्पत. माझ्याशी नेहमी सहानभूती वागण्याच नाटक करता. जणु काही मला पोरं नाही हे सतत दर्शवायच असत तुम्हाला. दोन पोरं आहेत हे मिरवता माझ्या समोर. तुम्हाला बागे बद्दल मुळीच आकर्षण नसत पण तरी तुम्ही मला खोटे प्रश्न विचारत असता." सुधा ताई स्वगत बोलत असल्या सारख्या बरळत होत्या.

"माझ पण नशीब किती फुटक असाव. केळकरांचा प्लॉट ज्यांनी विकत घेतला त्यांनी मी लावलेली सगळी बाग उध्वस्त केली. एवढच नव्हे तर माझ्या अंगणातल्या आंब्याच्या झाडाच्या, त्यांच्या प्लॉट मधे येणार्‍या फांद्या ही तोडुन टाकल्या. तुम्ही मुलां मधे जितका जीव लावत नसाल तितका जीव मी झाडांमधे लावते त्याच मला हे फळ मिळत. आणि तुम्ही एवढी सोन्या सारखी मुलं आहेत तर त्यांना एवढ रागवता." एवढ बोलुन सुधा ताई रडायला लागल्यात. मग एकदम आवेशात येउन त्या म्हणाल्या की 'देव पण ज्यांची लायकी नसते त्यांना भर-भरुन देतो" व तरा-तरा चालत निघुन गेल्या.

जोशी बाई आघात झाल्या सारख्या मट्कन जमिनी वर बसल्यात. त्यांचा विश्वासच होईना कि इतकी वर्ष हि बाई आपली शेजारीण आहे. मी त्यांना नेहमी मोठ्या बहिणीचा मान दिला आणि ती आपल्या बद्दल हा विचार करते. हे सगळ प्रकरण रागाच्या पलिकडे गेल होत. त्यांना धड रडु ही येइना. अनिरुध्द आईचा हात हातात घेउन तीच सांत्वन करण्याचा प्रयत्न करु लागला.

10/4/07

वामकुक्षी

आजच्या कार्यक्रमाला असलेली उपस्थिती बघता व टाळ्यांचा गजर ऐकुन या आंदोलनास एकुण बरेच महत्त्व प्राप्त झाल्याचे स्पष्ट होते. सुरुवातीस आळशी आंदोलन (आ.आ.) ईत्यादी विशेषणं जरी 'उद्योगी' लोकांनी दिली असली तरी दुपारच्या झोपेचे आवश्यकता हळु-हळु लोकांस कळु लागली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. शहरातील प्रतिष्ठित वर्तमानाचे पत्रकार चक्क आज उपस्थित आहेत. असो.
आज मी माझ्या वैयक्तिक उदाहरणाद्वारे या आंदोलनाचा आरंभ कसा झाला हे आपल्या पुढे मांडु इच्छीतो.

मला लहानपणापासुनच वामकुक्षीची फार आवड होती. वामकुक्षी म्हणजे डावा हात डोक्याखाली ठेउन उपभोगलेली दुपारची झोप. डावा हात दुखु लागला की उठायच. साधारतः २० ते २५ मिनिटांनी हात भरुन येतो. मजबुत हात असतील तर जास्त वेळ झोपता येत. बरेच लोक याच कारणासाठी व्यायाम करतात. मी मात्र व्यायामाच्या भानगडीत फारसा पडलो नाही. मला तशीच बिना-उशीची झोपायची सवय आहे. अगदी रात्रीसुध्दा मी उ(र्व)शी घेत नाही. त्यामुळे झालं काय की माझी दुपारची झोप अर्धा-पाउण तासाहुन अधिक होऊ लागली. थोडक्यात, दुपारी झोपण्याचा सराव मी बालपणापासुन करतोय.

लहानपणी कोणी काही म्हणायचे नाही. शाळेत जाउ लागल्यावर मात्र पंचाईत होऊ लागली. अहो, रात्रीची झोप परवडली पण दुपारचं जागरण नको. मागल्या बाकावर बसुन झोपणे किंवा पुस्तक वाचण्याचे नाटक करत कपाळवर हात ठेउन झोपणे इत्यादी युक्त्या मीच शाळेत रुढ केल्यात. तसाही मी फारसा हुशार नव्हतोच त्यामुले माझ्या वामकुक्षीचा प्रगतीपुस्तकावर परिणाम जाणवला नाही. शेवटी, एक तर सकाळी साडे सातला उठायचे मग आई सांगेल ती कामे करायची, थोडा अभ्यास करायचा, मग शाळेत सायकल मारत जा, संध्याकाळी परत तोच प्रकार, इतकी कष्ट करुन दिवस रेटायचा तरी कसा? दुपारी थोडी झोप मिळाली की दहा वाजे पर्यंत दिवस कसा छान जातो. पुढे माझा झोपेचा अभ्यास वाढत गेला. रात्री ११ वाजता झोपायचे असल्यास किती वामकुक्षी लागते, १२ वाजता तर किती, १ पर्यंत जागयचे तर किती वेळ, असे माझे आराखडे मी पक्के केलेत. अर्थात, एक वाजे पर्यंत जागाण्याची कोणावर नौबत येउ नये. शेवटी, दुपारची झोप परवडली, रात्रीचे जागरण नको हे सुध्दा तितकेच खरे.

माझ्या शाळेत डुलक्या काढण्याच्या युक्त्या नेहमीच यशस्वी होत नसतं त्यामुळे शिक्षकांनी बरंच छळले. पण घरचेही काही कमी नव्हते. शिस्त लावण्याच्या नावाखाली त्यांनी माझ्या वामकुक्षीवरच बंदी आणली. मला झोपण्याचा रोग झालाय असले नाना आरोप सुध्दा लावलेत. शेवटी मी तिथे जाउन निवांतपणे बसायचो. पण उकिडवे-कुक्षी फारशी कधी अंगी लागली नाही. कॉलेज मधे प्रवेश घेतल्यावर मात्र हुश्श झाल. घरच्यांचा त्रास नव्हता व कॉलेजला त्रास द्यायचा नव्हता म्हणुन कॉलेज मागच्या वनराईचे मी बरेच 'परीक्षण' केले. कॉलेज मधला मुक्काम थोडा वाढला कारण माझ्या वामकुक्षीच्या वेळेसच नेमका गणिताचा पिरेड असे. असो.

मला माहिती आहे की येन-तेन प्रकाराने आपण सर्वांनी हा त्रास भोगलाच असेल पण झाल-गेलं गंगेला मिळाल. आता मात्र अजुन त्रास सहन करायचा नाही. अहो, नाही म्हटलं तरी सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत बरच काम असत. थोडी झपकी घेतली त्या दरम्यान तर त्या साहेबाचं काय जातय? व्यक्ती-स्वातंत्र्य म्हणुन काही असतं की नाही? थोडी पुढे-मागे का होईना पण कामं तर होतायत ना. आपणास माहिती नसेल पण इटली व फ्रांस सारख्या प्रगत राष्ट्रांमधे सुद्धा दुपारच्या झोपेची खास सुट्टी असते. त्यांस 'सिएस्टा टाईम' असे म्हणतात. आता, आपण जर का इतर बाबतीत पश्चिमी राष्ट्रांची नक्कल करु पहातो तर वामकुक्षीबद्दल इतकी उदासिनता का?


अंतरीच्या या दु:खाला वाट मात्र कुठे मिळत नव्हती. बालपणी घरच्यांचा त्रास आणि आता साहेबाचा. या दरम्यान आई-वडिलांनी अलगदपणे मला बायकोच्या हवाली केल. रविवारच्या झोपेचाही बर्‍याचदा काथ्याकुट होतो. आताशा एक तर कुटुंब काम सांगत किंवा पोट्टी उच्छाद मांडतात. ऑफिसमधे माझ्या सारखी अजुन बरीच समदु:खी भेटलीत. मनं मोकळ करायला अजुन जोडीदार मिळालेत. मग आम्ही आळी-पाळीने झोपु लागलोत. पण साहेबांचा चांगलाच दरारा होता. जागरणांनी व साहेबाच्या भीतीने माझी फार तारांबळ उडु लागली. मला झोपेत जागरणाची आणि जागेपणी झोपेची स्वप्ने पडु लागलीत. एकदा तर गाडी चालवतांना मागच्याने हॉर्न वाजविला तर मी हिला विचारले की घड्याळाचा गजर असा का वाजतोय ते!

शेवटी अघटित घडलंच. आमचा हाकाट्याच नेमका झोपी गेला आणि जोशी, साहेबाच्या तावडीत सापडलेत. ऑफिसमधे दहशतीचे वातावरण पसरले. साहेबांनी, जोशींना चक्क काढुन टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणा नंतर आम्ही संघटित होण्यास सुरुवात केली व या आंदोलनाचा जन्म झाला. बिन-सरकारी कार्यालयांमधील मंडळीसुद्दा हळु-हळु या आंदोलनात सामिल होऊ लागलित. त्यांची परिस्थिती आमच्याहुन केविलवाणी आहे.

आमचं म्हणणे सरळ सोट आहे. सगळ्यांनी वामकुक्षी घ्यावी असा आमचा आग्रह नाही. पण आम्ही घेतो तर आम्हांस विरोध करणेही बरोबर नाही. आमच्या मागण्या फार कमी आहेत. निदान ३३ मिनिटांची वामकुक्षीसाठी सुट्टी व वामकुक्षी घेण्यास आरामखुर्च्या एवढेच आम्ही मागतो आहोत.

आपण सगळ्यांनी मिळुन आवाज लावला तर आपल्या मागण्या मान्य कराव्याच लागतील असा माझा विश्वास आहे. एवढे बोलुन मी माझी गाथा संपवितो. धन्यवाद.
वामकुक्षी आंदोलनाचा विजय असो.......विजय असो......


ऑ...ऑ......
"अहो, उठा. मनाची नाहीच तरी जनाची लाज बाळगा. ऑफिसात बरी झोप लागते तुम्हाला. कोण दिसतय स्वप्नात? रंभा उर्वशी का?"

"माफ करा साहेब. काल थोडं जागरण झाल म्हणुन......"

9/3/07

सावल्यांचा खेळ

गावात शुकशुकाट झाला होता. बहुतांश मंडळी झोपण्याची तयारी करत होती. अधुन-मधुन बोलण्याचा-खाकरण्याचे आवाज येत होते. वेशीपाशी भल्या मोठ्या वडाच्या झाडा खाली दोन म्हातारे गप्पा मारत बसले होते. त्यांच्या समोर काही अंतरावर गावातला डोंब्या पागल स्वता:शी गुणगुणत वेगाने येर-झारा घालत होता. "दिसतय मला सगळं" अस काहीसं तो बडबडत होता. ती दोघी म्हातारी त्याच्याकडे शुन्य भावनेने बघत होती.

"तुमचा भुतांवर विश्वास आहे का?" पहिल्याने विचारले.

दुसर्‍या म्हातार्‍याने उत्तर लगेच दिले नाही. दिर्घ सुस्कार टाकला "मगापासुन बिडी शिलगवायचा प्रयत्न करतोय पण च्या मारी तर शिलगतच नाहीया" त्याच्या तोंडातुन शब्द कडमडत बाहेर पडलेत.

पहिला म्हातारा डोंब्या पागलाकडे निरखुन बघु लागला.

"डोंब्या तुम्हाला भुत वाटतो का?" दुसर्‍याने विचारले.

"छे छे. आपण वडाच्या पारावर बसलोय म्हणुन उगाच मनात पाल चुकचुकली. "

"भाईसाहेब आज तरी येणार आहेत का?" दुसरा त्रस्तपणे उदगारला. पहिला म्हातारा काय बोलतोय याच्याकडे त्याचं लक्ष होत की नव्हत, माहिती नाही.

पोर्णिमेच्या चंद्राचा ढगांसोबत लपंडाव चालु होता. पाऊस पडण्याची चिन्हे इतक्यात दिसत नव्हती. मंद-मंद गार वारा वहात होता. दोन्ही म्हातारे आता मांड्या ठोकुन बसलेत.

"डुम डुम...डल डल..हुम हुम" डोंब्या पागलाच्या या अवकाळी अंगात आली होती. त्याने नाच करायला सुरवात केली होती.

"मला वाटत असतात" दुसर्‍याने उत्तर दिले.

"परदेशात गेला होता तेंव्हा तिथली भुत गोरी होती का?" पहिल्याने विचारले.

दुसरा म्हातारा जोरात हसला. "तिथे सगळीच लोकं भुत असतात. सुखाच्या शोधात, ती मेणाचे पुतळे दु:खी जीवन कंठत असतात"

"सगळीकडे तीच राम कहाणी" पहिला म्हणाला.

"तुम्हाला वाटत का की स्वर्ग-नरक असतो म्हणुन? आणि जन्मभर जी कामे करता त्यावर माणुस कुठे जाईल हे ठरत म्हणुन?" दुसर्‍याने प्रश्न केला.

आता उत्तर न देण्याची पहिल्याची पाळी होती. दोघे परत डोंब्या पागलाचे धिंगाणे बघु लागलेत. त्याने कचरा गोळा करुन शेकोटी पेटवली होती.

"याच्या अंगात आली वाटत." अस म्हणुन पहिला म्हातारा जोरात डोंब्या पागलावर खेकसला " ए..असा भूतासारखा काय तांडव करतोय विस्तवा समोर?"

डोंब्या पागलाने न ऐकल्यासारख केलं.

"स्वर्ग-नरक अस काही नसाव. आपली शास्त्र भुता-प्रेतांबद्दल फारस काही बोलत नाहीत. आत्मा आहे अस म्हणतात आणि त्या आत्म्याचे अंतिम लक्ष ब्रह्मांडात विलिन होणे आहे अस आपला धर्म मानितो. " मग खिन्नपणे हसुन म्हणाला "तसही या भूतलावर जगल्यावर ना स्वर्ग सुखावणार ना नरक दुखावणार. "

"मला नेहमी वाटायचं की आरश्यातील प्रतिमा आपल भुत असत म्हणुन. ही प्रतिमा आपली साथ कधीच सोडत नाही. मेल्यावर शरीर नाहीस होइल पण प्रतिमा कायम राहिल. " पहिला म्हातारा म्हणाला.

आताशा चंद्र काळ्या ढगांच्या पांघरुणात गुडुप झाला होता. ऊकाडा वाढत होता.

"पण हि प्रतिमा खरी असते की लोकांनी आपणास कस बघाव या चौकडीत बांधलेल ते एक चित्र असत?" दुसर्‍याने विचारले.

"म्हणजे?"

"म्हणजे असं की आपल्या मनातील भावनांचे रंग त्या प्रतिबिंबात उमटतात. आपण सुंदर आहोत अशी समजुत केली की आपली प्रतिमा आपणांस सुंदरच दिसते. थोडं गमतीदार वाटेल मला वाटत की आपली सावली आपलं भुत असतं. कारण, एक तर ती आपली साथ कधीच सोडत नाही आणि आपण जे खरे आहोत तश्शीच अगदी सावली पडते. जणु आपल्या कर्माची ती प्रतिमा असते. काळीभोर आणि गुढ. " दुसरा उत्तरला.

"पण आपण हे बोलतांना एक तपशील विसरलो की मेल्यावरच माणसाचं भुत होउ शकत. आरश्यातील प्रतिबिंब काय किंवा सावली काय, मेल्यावर सगळंच नाहीस होणार." पहिल्याने स्वत:चं म्हणण खोडुन काढल.

"कोण म्हणत की मेल्यावरच भुत होतं म्हणुन. मी तर म्हणतो की अर्धी दुनिया भूत आहे. जिता तर माणुस आणि मयत तर भूत ही व्याख्या मानली तरी या दोन परिस्थितीं मधे तिळमात्र फरक नाही. गेली २६ वर्षे जमिनीच्या तुकड्यावरुन माझ्या भावंडांशीच भांडतोय. ना मी सोडायला तयार ना ते माघार घ्यायला तयार. आता सांगा माझ्यात आणि भुतात काय फरक? आम्ही दोघेही अतृप्तच!" कोर्ट-कचेर्‍याच्या आठवणींनी दुसर्‍या म्हातार्‍याच्या डोळ्यात कटुता, द्वेष आणि रागाच्या विचित्रश्या छटा उमटल्यात.

तो पुढे म्हणाला "तुमचं सांगा? पोरानी आणि सुनेनी छळ-छळ, छळल तुम्हाला. पण भेसळीच्या प्रकरणात पोरगा पकडल्या गेला तर तुम्हीच गेला होतात ना धावत, मामलेदाराचे पाय धुवायला. आणि एवढ करुन, जेलातुन बाहेर येउन काय व्यवहार केला तुमच्या सोबत त्याने?"

पोराचे नाव ऐकुन पहिल्या म्हातार्‍याच्या डोळे काकुळतेने पाझरु लागलेत. " ही बाळंतपणातच गेली. आई-विना पोरं म्हणुन त्याचे खुप लाड केलेत. काय मिळालं? ती जाब विचारेल तर काय उत्तर देऊ?"

कुठे तरी पाऊस पडला असावा. आसमंतात मातीचा सुंगध दरवळत होता.

"शेवटी आपल्या संचित कर्माची फळ भोगावीच लागतात. ती सावलीत जमा होवो किंवा आरश्यात प्रतिबिंबाच्या मागुन डोकावित असतील, भोग कोणाचेही चुकायचे नाहीत. पण दु:ख भोगणे हेच जेंव्हा कर्म होते तेंव्हा मनुष्य भुत होतो. मनुष्य जिवंत असो किंवा मेला असो. " दुसरा म्हातारा दिर्घ श्वास टाकत उदगारला.

दुसरा म्हातारा हळु-हळु उभा राहिला व शत-पावली घालु लागला. पाऊस भुरट्यासारखा पडु लागला होता. डोंब्या पागलाची, पेटवलेली शेकोटी, वाचविण्याची धांदल उडाली. तो आगीला कागदाने किंवा प्लास्टिकने झाकण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता. आग मिळेल ते भस्म करित होती.

"तुम्हाला खात्री आहे का की भाईसाहेब येणार आहेत?" पहिल्याने विचारले.

"वाटत तर आहे असं. भारी चिवट आहेत ते. जाउन जाउन कुठे जाणार, इथेच येणार.
पण मी आपण बोलतोय त्या विषयाचा विचार करत होतो" दुसर उत्तरला.

थोड़ा विचार करुन तो बोलला " आपली शास्त्र भुतांबद्दल बोलत नाहीत असे तुम्ही म्हणालात. आत्म्याची ब्रह्मांडात विलिन होणे हे अंतिम लक्ष आहे हे सुध्दा खरं. पण त्यासाठी संचित कर्मांचा हिशोब करावा लागतो आणि त्या अन्वये अनेक जन्म घेणे निश्चित आहे. पण यात मला थोडा घोटाळा वाटतो. या जन्मातील इच्छा, आकांक्षा, दु:खांचा हिशोब करायला, पुढला जन्म याच घरात, याच परिसरात घ्यायला नको का? जीथे कचरा आहे तिथेचा सफाई व्हायला हवी. दुसरी कडे सफाई करुन काय उपयोग?" दुसरा म्हातार्‍याने आपली बाजु मांडली.

"तुमचं म्हणण काय की पुर्नजन्म नसतोच?" पहिल्याने आश्चर्याने विचारले.

"असतो ना. पण मला असं वाटत की जर का कोणाचं चित्त कशात फसल असेल तर त्या व्यक्तीचा पुर्नजन्म होईलच कसा?" दुसर्‍याने उत्तर दिले.

हें ऐकुन पहिला म्हातारा हसायला लागला. त्याचं हसण वाढतच गेलं.

" विनोद करत नव्हतो मी" दुसर्‍याला थोडा राग आला.

"विनोद केला अस माझ म्हणण नाही" पहिल्याने उत्तर दिले. क्षणभर थांबुन तो अडखळत म्हणाला "विनोद नाही तर काय? इथे तुमच्याने कोर्टाचे खटले झेपले नाहीत व पोराला शिस्त लावण्यात माझी हयात निघुन गेली. आणि तुम्ही मला सांगताय की पुर्नजन्म आपल्यावर अवलंबुन असतो!" एवढ म्हणुन तो परत हसु लागला.

"मला एक सांगा की आपल्या शास्त्रात आत्मशक्तिला किती महत्त्व आहे?" दुसरा म्हातारा आता पेटला होता.

"खुप" पुढुन उत्तर आले.

"मनावर विजय प्राप्त करुन माणुस आमुलाग्र बदलु शकतो. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो."

"आपण भुतांबद्दल बोलतोय" पहिला खवचटपणे बोलला.

"ऐका हो थोडं. हां तर माझा मुद्दा असा की नुसता जगण्यावर नाहीतर तर आत्मबलावर मोक्ष सुद्धा प्राप्त होऊ शकतो" आता तुम्हीच सांगा, मनात कुठलीशी तीव्र इच्छा असेल किंवा तीव्र दु:ख असेल तर मन आत्म्याला पुर्नजन्म घेऊ देइल का? मोक्ष प्राप्त होउ देइल का? ते आपल्याला आपल्या पूर्वायुष्याशी बांधुन ठेवणार नाही का? मग शरीर जीवंत असो वा नसो"

हे ऐकुन पहिला म्हातारा बराच अस्वस्थ झाला. पाउसही थांबला होता आणि गारवा परत जाणवु लागला होता. शेकोटी विझली म्हणुन डोंब्या पागल हुंदके देउन रडत होता.

तेवढ्यात अचानकपणे गावातल्या एका वाड्यात धाव-पळ सुरु झाली. काही वेळातच रडण्याचे सुर उमटु लागलेत.

दोघे म्हातारे उत्सुकतेने गावाच्या दिशेनी बघु लागलेत.

भाईसाहेब दुरुन चालत येत होते.

8/24/07

एक अमेरिकन कैफि़यत

ही व्यथा म्हणावी तर व्यथा नाही कारण मी लौकिक दृष्ट्या सुखात आहे. ही कथा म्हणावी तर कथाही नव्हे कारण याची सुरुवात कुठे झाली आणि संपणार कुठेय याचा मुळीच थांगपत्ता नाही. हा वैयक्तिक अनुभव म्हणता येईल पण मला खात्री आहे कि या भावनांचे सुर अनेकांच्या मनात उमटतात. हा चूक-बरोबर किंवा चांगल-वाईट याचा मागोवा ही नव्हे. मी काही तरी महत्त्वाच हरवलय ही भावना सारखी मनाल टोचते आहे.

हे मनोगत काय हरवलय या शोधाचं आहे.

माझ अमेरिकेत येणं सहाजिक होते. मध्यम वर्गीय मराठी कुटुंबातला मी, भारताबद्दल नको त्या कल्पना करुन आणि अमेरिकेबद्दल हव्या त्या कल्पना करुन, इंजिनिअरिंगच्या वर्गात असतांनाच परदेश गमनाची स्वप्ने बघत असे. माझ्या सोबतची बहुतांश मुले तर मनाने अमेरिकेत पोचली सुध्दा होती. इंजिनिअरिंग झाले व मी धोपट मार्गाने उच्च शिक्षणासाठी अमिरिकेत दाखल झालो. शिक्षण पुर्ण करायचे, वाणि़ज्य किंवा आर्थिक क्षेत्रात नोकरी धरायची. बस्स, मग लाल स्पोर्टस कार, बंगला, थोडक्यात नुसती ऐष. माझे सगळे आराखडे अगदी तयार होते. या सर्व गोष्टी साध्य करतांना मला किती मेहनत लागणार होती तसेच हे सगळ साध्य केल्या नंतर काय, हे असले प्रश्न मला कधी शिवलेही नाहीत. आणि असले प्रश्न पडावेत तरी का? म्हणजे, कुठल्याही तर्‍हेची मेहनत करण्याची तयारी होती. तसेच माझ्या आधी आलेली भारतीय यशस्वी होत होते. त्यामुळे माझा अपयशी होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. पण यश-अपयश याचा सबंध केवळ लक्ष-भेदाशी नसतो. खुपदा लक्ष्या पर्यंत पोचण्यच्या प्रवास माणसात आमुलाग्र बदल आणितो.

आता मी काही वर्षांपुर्वीच्या भोळ्या आणि मूर्ख अश्या माझ्याकडेच बघतो तेंव्हा संमिश्र भावनांच वादळ मनात उमटत. अनेक प्रश्नांची मनात इतकी गर्दी होते कि उत्तर शोधण्याच्या ऐवजी मी प्रश्नांची मोजदाद करण्यातच रमुन जातो. मी पाहिलेली बहुतांश स्वप्ने, थोडी उशीरा का होईना, सत्यात आली आहेत. पण प्रत्येक गोष्टीची किंमत असते. अगदी श्वास घेण्याची किंमत या दुनियेत जगुन द्यावी लागते. अमेरिकेत 'यशस्वी' होण्याची किंमत कराव्या लागणार्‍या कष्टांमधे नुसती मोजता येत नाही. स्वप्ने सत्यात आणण्यासाठी करावी लागणारे कष्ट सुध्दा मी आनंदाने केलीत. पण हे सगळं करण्यात मी स्वतः स्वता:पासुनच दुरावलो. स्वता:लाच हरवुन बसलो. मी कोण होतो आणि मला काय करायचे होते या सोबत मी काय मिळविले आणि कोण झालोय याची सांगड लागत नाही.

शिक्षण चालू असतांना बरीच कष्ट पडलीत. प्रोफेसर ढंगाचा मिळाला नाही. थिसिस वेळेवर झाला नाही त्यामुळे शिक्षण वर्षभर लांबले. आता या 'अधिक' वर्षाची फी कुठुन येणार म्हणुन कॉलेज मधल्या नोकरी व्यतिरिक्त काही हॉटेमधे भांडी धुण्यापर्यंत काम करावी लागलीत. अर्थात, याबद्दल मला मुळीच तक्रार नाही. बरीच लोक हे सगळ करतात. पण या सगळ्या भानगडीत भारतात दोन वर्षे जाता आल नाही. सगळ्यांच्या बाबतीतच अस थोडं-फार होत की फक्त माझ्यासोबतच अस झाल मला माहिती नाही. पण घरापासुन इतकं दूर राहुन आणि अनपेक्षित तर्‍हेचे कष्ट करुन मी मनातुन कोरडा पडत गेलो.

घरी राहुन बर्‍याच गोष्टी आयत्या मिळतात. आईच्या हातचं सुग्रास अन्न खायला मिळत या बद्दल मी बोलत नाहीया. पण आपलं व्यक्तिमत्व, आपण जसा विचार करतो, जसं बोलतो-चालतो, आपले वैयक्तीक दृष्टीकोण इत्यादी पैलु बर्‍याच गोष्टींवर निर्भर करत. या गोष्टींवरच मानसिक दृष्ट्या आपण अवलंबुन असतो. आई-वडिल, नातेवाईक, मित्र-मंडळ, शेजार-पाजार हे सगळे चांगल्या-वाईट दोन्ही दृष्टींनी आपल्य व्यक्तीमत्वाला रुप देत असतात. आपण जे स्वता:ला आरश्यात बघतो त्यात या सगळ्यांची प्रतिबिंबे असतात. पण अमेरिकेत गेल्यावर हे सगळे धागे-दोरे अदृश्य होतात. अचानक आरश्यात फक्त आपणच उरतो. दोर तुटलेल्या पतंगासारखी गत होते. हे सगळं मला लगेच जाणवल नाही. पण हे परिणाम हळु-हळु अंगात भिनत गेले.

तरुण वयात परदेशात जाउन मर्दुमुकी गाजवणार नाही तर कधी करणार? अस कोणी म्हटल तर ते बरोबरच आहे. तसेच त्यासाठी नविन व्यक्तिमत्व बनवाव लागत असेल तर ते ही आवश्यकच आहे. खर सांगायच तर स्वता:चा भुतकाळ विसरुन, वर्तमानात परत जन्म घेण्यास कोणी तयार असेल तर त्याने कराव पण हे फार कठीण आहे. कळत-नकळत स्वतःला देशापासुन, संस्कृतीपासुन, आप्नजनांपासुन तोडुन जर का मी केवळ लाल गाडी आणि लॉन असलेलं मोठ घर मिळवत असीन तर माझे हिशोब चुकले आहेत असं मला वाटतं. जुनी हिंदी गाणी, जी विविध भारतीवर लागायचीत, ती ऐकुन आठवणींच्या असंख्य सुया जेंव्हा टोचतात तेंव्हा अस वाटत की जे कधीही हरवु शकत त्यासाठी मी जे आता परत कधीच गवसु शकत ते हरवलं. मला माझ्याशी जोडणारी नाळ नेहमी साठी तोडल्याच्या अगतिक दु:खाची जाणीव होते.

सगळे माझ्यासारखा विचार करतात का? की मनाच्या, मनाला रुचेल अश्या, समजुती पाडुन निवांतपणे जगतात. सांगण कठीण आहे. मी चूक-बरोबर, चांगल-वाईट याबद्दल काही मतं मांडत नाहीया. पण मला इथे सुबत्तेची व श्रीमंतीची झापण बुध्दीला लाउन व सुखी असल्याचे मुखवटे बांधुन लोक हिंडतांना दिसतात. पैसा कमविणे आवश्यक आहे पण ते अंतिम लक्ष नव्हे. छान घर, गाडी, तगडा बँक बॅलेन्स असणे चांगली गोष्ट आहे पण तेच सुख आहे अस वाटण चुक आहे. हे सगळ मिळविण्या साठी जर का स्वता:ला हरविणे आवश्यक असेल तर ती दु:खी कल्पना आहे.

गंमत म्हणजे भारतात रहाणारे बहुतांश आणि अमेरिकेत रहाणारे बरीच लोकं मला हे वाचल्यावर वेड्यात काढतील. काही लोक असेही म्हणतील कि एवढ देश-प्रेम होत तर अमेरिकेत गेलाच कशाला? पण इथे मुद्दा देश-प्रेमाचा नाहीया. हि कैफियत आहे मनाची. हे तक्रारीचे सूर नव्हेत. ही कहाणी आहे मनाला बसणार्‍या डागण्यांची. मी केलेल्या कष्टांची यादी मला इथे मांडायची नाहीया पण मनातल्या धुक्यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे.

परदेशात जाउ नये अस माझ मुळीच म्हणण नाही. आर्थिक सुबत्तेचा शोध करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. किंबहुना, मला परत भूतकाळ जगायला मिळाला तर मी परत अमेरिकेत येण्याचाच निर्णय घेइन. फक्त स्वता:ला घट्ट धरुन ठेवण्याचा प्रयत्न करीन. असही शक्य आहे की मला आता इथे राहुन भारत जास्त रम्य वाटत असेल. जसं भारतात असतांना अमेरिका दिसत होत. माझ म्हणणे एवढेच आहे कि परदेशात जाण्याची किंवा तिथे स्थायिक होण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते हे माहिती असणे आवश्यक आहे. दुरुन डोंगर साजरे हेच खरं.

या धुक्यातुन बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? मला तरी काही अजुन सुचलं नाहीया. पण मी बुध्दीला झापण लावायला तयार नाही. काही लोकं याबद्दल विचारही करत नाहीत. ती लोकं खरच सुखी आहेत. फार विचार करायला लागल कि नको असलेल्या गोष्टींना हव्या त्या तत्त्वांच्या वेष्टणात बांधुन मन मान्य करत.

अमेरिकेत राहुन आता मला बरीच वर्ष झाली आहेत पण मी ती तत्त्वे अजुनही शोधतोय.

(काल्पनिक)

8/23/07

असाही एक खेळ

आज तो सकाळी साडे-पाच ला आपणहुन उठला. नाहीतर रोज आई साडे-सातला उठविते तरी त्याला उठायच नसत. पण आजचा दिवस विशेष होता. गेला महिनाभर तो या दिवसाची वाट बघत होता. आजच्या दिवशी तो कस आणि काय करणार आहे याची तो स्वप्न बघत होता. काल रात्री त्याल नीट झोपसुध्दा आली नाही. दोन-तीनदा त्याने उठुन घड्याळात किती वाजले आहेत ते बघितले. सरांनी सकाळी सात वाजता मैदानावर हजर रहाण्याची सक्त ताकीद दिली होती. जो उशीरा येइल त्याला खेळायला मिळणार नव्हते. लहान वयाच्या मुलांना शिस्त लावणे आवश्यक असते पण शिस्त लावणे आणि आपली मर्जी चालविणे यात फरक आहे. सरांना तो फरक कधीच लक्षात आला नाही.

सुरुवातीला त्याला बास्केटबॉल खेळण्याची फारशी आवड नव्हती. त्याचा मोठा भाऊ बास्केटबॉल खेळायला नियमित जात असे. शेजार-पाजारच्या मुलांसोबत उनाडक्या करण्यापेक्षा थोडी नियमितता आणि शिस्त लागावी म्हणुन त्याच्या आई-वडिलांनी त्याला मोठ्या भावासोबत जबरदस्ती बास्केटबॉल खेळावयास पाठवु लागले. सुरुवातीला बरीच आदळ-आपट करुन झाली पण त्याल हळु-हळु खेळाची गोडी लागली. वयाने बराच लहान असल्यमुळे त्याला सुरुवातीला कुठल्या प्रतियोगितेत भाग घेणे शक्य नव्हते. त्याला नुकतेच ११ वे लागले होते. सरांनी क्रिडा मंडळात त्या वयाच्या मुलांची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात त्याचा खेळ इतका चांगला होता की त्याला उत्तम खेळाडुचे पारितोषिक मिळाले. त्यामुले १४ वर्ष वयोगटाच्या चमूत त्याची निवड झाली होती. पण क्रिडा मंडळातील आपल्याच मित्रांसोबत खेळणे वेगळे आणि इतर क्रिडा मंडळातील मुलां विरुध्द खेळणे वेगळे. त्यामुळे तो शहर-स्तरावरील प्रतियोगितेत भाग घेण्यास उत्सुक होता. त्याला खात्री होती कि तो त्याच्या चमूला जिंकवुन देइल म्हणुन.

सकाळी उठुन त्याने कामे भराभर उरकली. आपल सोंग खेळासाठी इतकी धडपड करतय बघुन त्याच्या आईला फार कौतुक वाटत होते. निघायच्या वेळी आजीने पोटाशी धरुन आशिर्वाद दिले व हातावर दही ठेवले. सकाळी ६ वाजता एकट नको जायला म्हणुन तो सायकल वर आणि त्याच्या मोठा भाऊ पाठोपाठ स्कुटर वर, सोबत म्हणुन, अशी स्वारी निघाली. (वडिलांना त्याने सकाळीच नमस्कार केला होता. ते पहाटेच कामावर जात असत.)

सव्वा सहाला तो क्रिडांगणावर हजर झाला. बरीचशी मुले जमा झाली होती. नोव्हेंबर ची थंडी होती. सगळी मुले कुडकुडत होती. पण सरांचा पत्ता नव्हता. ते सात नंतर उगवलेत. मग सगळ्यांची वरात घेउन ते ज्या क्रिडांगणावर सामना होता तिथे त्यांनी कुच केली.

सगळ्या चमूने वॉर्म-अप केला. बास्केटबॉल च्या खेळात प्रत्येक संघाचे एका वेळेस फक्त पाच खेळाडु खेळतात. त्यातल्य कुठल्याही खेळाडु ला कधीही 'चेंज' करता येते. पण पहिले पाच मधे खेळणे विशेष मानल्या जाते. एवढी मेहनत केली असता आणि पारितोषिक मिळाले असता, त्याला खात्री होती तो पहिल्या पाच मधे नक्की खेळणार म्हणुन. पण पहिल्या पाच निवडतांना सरांनी त्याच्या कडे ढुंकुनही बघीतले नाही. वाईट वाटण्याऐवजी तो चकित झाला. कारण पाच पैकी दोन मुलांना मुळीच खेळता येत नव्हते. तो बिचार आपलं काय चुकल आणि सर का रागावलेत याचा विचार करु लागला.

सामना सुरु होउन १५ मिनिटे होउन गेली होती. (बास्केटबॉलच्या सामन्याचा कालावधी ४० मिनिटे असतो) सरांनी त्याच्या कडे साधी नज़रही टाकली नाही. तो अगदी कावुन गेला होता. सामना जिंकण्याची काहीच चिन्हे दिसत नव्हती. सर घसा खरडुन, अस खेळा-तस खेळा सांगत होते. पण दोन टायर पंक्चर झालेली गाडी कशी नीट चालणार!

"सर, मी जाऊ का आत, खेळायला" त्याने धीर करुन विचारले.

सरांनी त्याच्यावर रागाने कटाक्ष टाकला. " कोच मी आहे कि तू?"

त्याचा चेहरा अजुन पडला व नजर खाली गेली.

"परत मी खेळु का विचारल तर लक्षात ठेव" सरांनी खडसावले.

इथे सामन्यात खेळता न येणार्‍या दोन मुलांपैकी एक मुलगा संघाची अक्षरशः वाट लावित होता पण सर त्याला काहीच म्हणत नव्हते. हाफ-टाइम नंतर तरी खेळायला मिळेल अशी त्याला आशा होती. पण तस घडणे नव्हते.

३२ मिनिटे होउन गेलीत आणि समोरच्या संघ बर्‍याच अंकांनी आघाडीवर होता. आता सामना जिंकणे जवळ-जवळ अशक्य होते. तेवढ्यात सरांनी त्याचे नाव घेतले व चेंज म्हणुन त्याल खेळात घातले. त्याला एकदम स्फुरण चढले. काहीही झाल तरी सामना जिंकुन द्यायचा चंग त्याने बांधला. त्याच्याकडे बॉल आला. त्याने बघितले तर त्याच्या आणि रिंगमधे विरुध्द संघाचा एकच खेळाडु होता. त्याने सफाइने विरुध्द संघाच्या खेळाडुला चकविले आणि रिंगच्या दिशेनी झेप घेतली व शॉट कनर्वट केला. त्याच्या आयुष्यातील पहिले दोन अंक त्याने नोंदविले. गेल्या महिनाभर गाळलेल्या घामाचा मोबदला मिळाल्याच्या भावनेने त्याला हुश्श झाले. त्याची चपळता बघुन जे थोडे-फार प्रेक्षक जमा झाले होते त्यांनी टाळ्या वाजविल्यात. त्याचा उत्साह द्विगुणित झाला. पण सरांनी त्याला परत हाक मारली आणि अवघ्या दोन मिनिटांमधेच त्याला परत बोलाविले. त्याला कळेचना की अंक नोंदविले असतांना सरांनी त्याला चेंज म्हणुन सामन्यातुन बाहेर का बोलाविले. पण त्याच्या नकळत त्याने फार मोठा अपराध केला होता.

" नालायक, तुला पास नव्हता देता येत का? तो मुलगा तिथे फ्रि उभा होता ना?" सरांनी रागात विचारले आणि जोरात टप्पल मारली.

सरांची अंगठी डोक्याला चांगलीच जोरात लागली.

"पण सर त्याला चांगले खेळत येत नाही आणि तो रिंग पासुन बराच दूर उभा होता"

झाले, सरांचा तोल सुटला. कारण ज्याला पास नव्हता दिला तो सरांच्या बॉसचा मुलगा होता. आपल्या कथा-नायकाला याचा मुळीच गंध नव्हत.

"मुजोरी करतोस" अस ओरडत सरांनी त्याला झापड मारली.

त्याच्या कानात सुं आवाज येउ लागला. सर पुढे काय ओरडत होते त्याला ऐकु येइना. तो गुमान बाकावर जाउन बसला. फारस कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हता.

अपेक्षितरित्या त्याचा संघ सामना हारला.

घरी येउन तो "आम्ही हरलो" एवढच तो कसं-बसं म्हणाला व आंघोळीसाठी गायब झाला. आईला आणि आजीला वाटले कि सामना हारला म्हणुन त्याचा चेहरा रडवेला झाला असावा. पण त्याच्या गालावर दोन बोट कोणाची हे त्या दोघींना कळेना.

8/13/07

श्री गणेश खाणावळ

श्री गणेश खाणावळीत एक फाटकासा दिसणारा मनुष्य आला. वयाने जास्त नसावा पण कुठल्यातरी चिंतेने माणुस खंगुन जातो तसा तो दिसत होता. दाढी दोन्-तीन दिवस केलेली नसावी. केस थोडेसे पांढरे झाले होते. कपडे जीर्ण झालेले होते पण स्वच्छ होते. कंबरेवर पट्टा विजारेला घट्ट धरुन बसला होता. शर्टावर एक बटन गळलेला होत. तिथे पिन लावली होती. बांध्याने तो अगदी सडपातळ होता. एकुण त्याचे व्यक्तीमत्व म्हणजे तो कुठे आला काय गेला काय कोणाच्याही लक्षात फारस येणार नाही. पण तो आज विशेष आनंदात दिसत होता. विजार वर करत त्याने खाण्याची ऑर्डर दिली. तेवढ्यात त्याचे लक्ष खाणावळीतील कुटुंबाकडे गेलं. खास करुन गर्भवती मुलीकडे. तो सारखा तिच्याकडे बघु लागला.

एक जोडपं आणि त्यांच्या सोबत मुलीचे आई-वडील असावेत. मुलगी गर्भवती होती. सगळे कुटुंब तिच्या प्रत्येक हालचाली कौतुकाने बघत होते. नवरा विशेष काळजी घेत होता, किंवा तसा निदान प्रयत्न करत होता. जेवायला काय हवं नको सारख विचारित होता. मुलीची आई हे नको खायला, हे खायला हवं अश्या सुचना करत होती. एकंदर कुटुंब स्वतःतच गुंग होत. खाणावळीत फारसं कोणी नव्हत. मालक माश्या मारत बसला होता. म्हणजे खरच, अक्षरश: माश्या मारत होता.

सुरुवातीला त्या मुलीने म्हातारा बघतोय याकडे फारसे लक्ष दिले नाही पण म्हातारा आता सरळ सरळ तीच्या कडे टक लाउन बघु लागला. त्यामुळे तीची थोडी चुळबुळ सुरु झाली. तेवढ्यात वेटर अन्न घेउन आला. म्हातार्‍याचे लक्ष विचलित झाले. त्याचेही अन्न घेउन वेटर आला होता. त्याला फार भुक लागली असावी कारण त्याचे हात थरथरत होते. पण गरम गरम अन्न समोर ठेवले होते तरी तो अन्नाला हात न लावता नुसताच एकटक बघत होता. जणु अन्नाच्या सुवासाने त्याची भूक पार उडुन असावी. त्याने अन्न थोडं चिवडल आणि एक घास कसा-बसा तोंडात टाकला. त्याचा घास तोंडातच घोळत होता कारण त्या पोरीकडे परत बघुन त्याचा कंठ दाटुन आला होता. पोरीने म्हातार्‍याकडे बघितले तर म्हातारा तीच्याकडे बघुन केविलवाणा हसला. झालं, ते म्हातार्‍याच हसण म्हणजे पोरीच्या सहनशक्तीचा जणु अंत होता. तीने नवर्‍याच्य मनगटावर हात ठेउन त्याचे लक्ष म्हातार्‍याकडे वेधले. नवर्‍याने म्हातार्‍याकडे बघितले तर म्हातार्‍याची तंद्रि लागली होती. नवरा उठुन तरातरा चालत म्हातार्‍याच्या टेबल जवळ गेला.

"का हो, काही लाज-बिज नाही का तुम्हाला?"

म्हातारा थोडा भांबावला व वेड्यासारखा उगाचच परत हसला.

"कळतय का मी काय बोलतोय ते? की सकाळी सकाळी टुन्न होउन आला आहात? तरुण पोरी-बाळींकडे बघण्याचा छंद दिसतोय तुम्हाला?"

"अहो, काय बोलताय? कोणाबद्दल बोलताय?" म्हातारा जणु त्याच्या विचारांच्या दुनियेची खर्‍या दुनियेसोबत सांगड घालण्याचा घाई-घाईने प्रयत्न करत होता.

"वरुन चोराच्या उलट्या बोंबा" पोरीचे वडील टेबल जवळ येत उदगारले.

"काय झाल साहेब?" दुकानाचा शेठने पृच्छा केली.

"हा मनुष्य इथे बसुन सारखा माझ्या बायको कडे बघतोय. थोडीही सभ्यता नाही या माणसात"

आत्ता म्हातार्‍याच्या डोक्यात दिवा पेटला. " नाही नाही. मी त्या नज़रेनी कसा बघिन. मला मुलीसारखी आहे तुमची बायको. खर सांगायच तर तुमची बायको माझ्या मुलीसारखी दिसते अगदी म्हणुन मी कौतुकाने बघत होतो एवढच. चुकलं साहेब. माफ करा"

"वा वा, अरे हरामखोरा, जनाची नाही तर मनाची तर लाज बाळग. हे सालं असल्या लंपट लोकांना चौकात उल्ट टांगुन बडवायला हवं" पोरीचा बाप खवळुन बोलु लागला.

"साहेब, तुम्ही काळजी करु नका. मी हाकलतो या नालायकाला. अरे, विनायक, याला बकोट धरुन काढ बाहेर" शेठ गरजला.

म्हातार्‍याला हे सगळं असह्य होउ लागला. कॉलरच्या बटन लावण्याचा-उघडण्याचा काहीसे चाळे करत तो बोलण्याचा प्रयत्न करु लागला. पण संतापाने त्याला श्वास लागला होता. त्याची छाती भात्यासारखी वर-खाली होत होती व तोंडातुन शब्दां ऐवजी नुसताच फस-फस, सुं-सुं असले काहीसे आवाज येत होते.

"साला, नाटक बघा कसा करतोय. तुझ्या तर..." अस म्हणत नवरा म्हातार्‍यावर तुटुन पडला.

"अहो, राहु द्या" बायको घाबरुन मागुन ओरडली.

शेठने व पोरीच्या बापाने नवर्‍याला कस-बस धरुन मागे खेचले. या भानगडीत टेबलवरचे अन्न म्हातार्‍यावर सांडले व तो खुर्चीला अडखळुन मागे पडला.

"मला काय अडवताय. पोलिसांना बोलवा" नवरा खेकसला.

"बोलवितो साहेब. तुम्ही शांत व्हा" मालक म्हणाला

म्हातारा उठण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला धड उठता ही येइना. त्याचा पिन लावलेला शर्ट फाटला होता. फार केविलवाणी स्थिती झाली होती त्याची. जमिनीवरच तो गुडघ्यावर डोक ठेउन तो रडु लागला. 'किती अंत बघायचा कुणाचा' असं काहीस तो पुटपुटत होता.

त्याचं रडण बघुन नवरा अजुन पेटला. "असं पोरी-बाळींकडे बघण्याच सोडा. बोगारओळीत जायला मी पैशे देतो"

हे ऐकुन म्हातार्‍याने अजुन मान टाकली. टेबलला धरुन कस-बसं उठत तो म्हणाला "कोणाला सांगताय बोगारओळीत जायला? देवाने सुखी समृध्द आयुष्य दिलय म्हणुन एवढ माजायच!"

"कसा वटावटा बोलतोय बघा" पोरीच्या आईने भांडणात आपल योगदान दिलं.

म्हातार्‍याचं त्याकडे लक्ष नव्हत. "माझी लेक अगदि अशीच दिसायची" म्हातार्‍याने काकुळतेने परत पोरीकडे बघितल. "सहा महिन्याची पोटुशी होती जेंव्हा तीच्या सासरच्यांनी तीला जाळल"

जाळल या शब्दाचा परिणाम खोलीभर जाणवला. नवराही थोडा चपापला.

"लग्नानंतर दिड वर्ष झाल तरी हुंडा पोचला नव्हता आणि गर्भ चाचणीत पोटात मुलगी आहे हे कळले. ही दोन कारणं पुरेशी होती."

"बरं बरं उगाच थापा मारण बंद करा" पोरीचा बाप बोलला. " गोष्टी तर तयारच असतात."

म्हातार्‍याने फाटक्या शर्टाच्या खिशातुन कागदाचा जुना तुकडा काढुन नवर्‍यासमोर ठेवला.
' हुंडा-बळीची अजुन एक दारुण घटना. गर्भवती सुनेला जाळल्याचा सासु-सासर्‍यांवर आरोप'
ते वर्तमान पत्राच कात्रण जणु किंचाळत होते.

"तीला मारण्याच्या एक आठवडा आधी भेटलो होतो. 'मला इथुन घेउन चला' अशी गयावया करत होती बिचारी. मी विचार केला बाळंतपणाला महिन्याभरात घेउन जाईनच घरी"
म्हातारा खिन्नपणे हसला. "तुमचं बरोबर आहे. मी नालायकच आहे. पोटच्या पोरीला आगीत ढकलुन आलो"

हे सगळ अनपेक्षित होत. नवरा चांगलाच ओशाळला. " माफ करा साहेब. पण तुम्हाला कल्पना आहे की जमा़ना किती खराब आहे आज काल"

"तुमचं काही चुकल नाही. माझं नशिबंच फुटक आहे त्याला तुम्ही काय करणार?"

"मग पोलिसांनी अटक केली का ?" नवर्‍याने विचारले.

"केली ना आणि लगेच सोडुनही दिले. पुरावा नाही म्हणे. माझ्या पोरीचा कोळश्यासारख झालेला देह पुरेसा पुरावा नव्हता त्यांच्यासाठी. मी कोर्टात गेलो. गेली ५ वर्षे कोर्टाच्या पायर्‍या घासुन ही परिस्थिती झालीय. आज शेवटी निकाल लागला व त्या सगळ्यांना शिक्षा झाली. म्हणुन मी जेवायला ईथे आलो. "

मग पोरीकडे बघुन तो म्हणाला "पण यांच्याकडे बघुन मला माझ्या पोरीची इतकी आठवण येत होती कि घशाखाली घास जाईना. पण मी माझ्या पोरीची आठवण काढलेली सुध्दा देवाला मंजुर नाही."

खाणावळीत कोणाला काय बोलावे सुचेना. म्हातारा रडत रडत आपला शर्ट विजारी खोचण्याचा प्रयत्न करत बाहेर निघुन गेला. नवरा जागेवर थिजल्या सारख स्तब्ध होता. म्हातार्‍याला थांबवण्याच सुध्दा कोणाला सुचल नाही.

7/31/07

शिव महिमा

आज गुरुपोर्णिमा, त्या प्रित्यर्थ माझ्या अराध्य दैवताबद्दल थोडं लिहावस वाटलं. खर तर शिवाजींबद्दल जेष्ठ-श्रेष्ठांनी अगणित गौरवास्पद शब्द उधळले आहेत. पण आजच्या समाजात या स्तुती-सुमनांच निर्माल्य व्हायला मुळीच वेळ लागत नाही. खरतर या व्यक्तीची केवळ गाथा गाउन आपण तीचा अपमानच करतोय. शिवाजी हे मुर्तीमंत कर्मयोगी होते पण त्यांच्या कार्यापासुन शिकण्या ऐवजी आपण त्यांना देवघरात बसवुन मोकळे झालेलो आहोत. आणि एकदा का कोणाला देवघरात बसवल कि आपण वाट्टेल ते करायला आपण मोकळं.

पण शिवाजी थोर का होते? मराठी घरा-घरात तरी प्रत्येक पोरं त्यांच्या गोष्टी ऐकत मोठ होतं. अफझलखान वध, शाइस्तेखानाच पराभव, आग्र्यातुन सुटका या शिव-लीला प्रत्येक मराठी माणसाला कंठस्थ आहेत. पण केवळ या त्यांच्या शौर्यामुळे त्यांचा थोरपणा सिध्द होत नाही. अत्यंत धाडसी होते अस म्हणु शकतो. मग काय शिवाजींनी इस्लामी सत्तेच्या ऐन मध्यरात्री हिंदवी स्वराज्याच्या सुर्यास आमंत्रण दिले म्हणुन का ते थोर आहेत? एखाद वेळेस यात थोडं तथ्य आहे पण त्यांची थोरवी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यापूर्तीच मर्यादित नाही. 'हा परिसर माझा आहे आणि येथे आता मुसलमानी सत्ता चालणार नाही' असे त्यांनी म्हटले नाही तर सामान्य नागरिकाला - जो मुसलमानी सत्ते अंतर्गत भरडला जात होता - त्यांनी स्वराज्याचे महत्त्व पटवुन दिले. समाजाला त्यांनी जो आत्मविश्वास दिला त्यामुळेच ते खरे युग-पुरुष आहेत.

ते जरी स्वराज्याचे शिल्पकार असले तरी त्यांनी या लढ्यास केवळ स्वत:वर केंद्रित केला नाही. स्वराज्य निर्मिती हे श्रींचे कार्य आहे असे म्हणुन स्वराज्य निर्मिती ही केवळ आवश्यकता नसुन कर्तव्य आहे हे सामान्य नागरिकाच्या मनात बिंबविले. याचा परिणाम असा झाला कि शिवाजींच्या अकाली व अनपेक्षित मृत्यु नंतरही लढा केवळ चालू न रहाता अजुन फोफावत गेला.


त्यांनी स्वातंत्र-मंत्राचा जणु खो समाजाला दिला. त्यामुळे शिवाजींच्या मृत्यु नंतर औरंगझेब जरी २७ वर्ष दख्खनात तळ ठोकुन बसला होता तरी तो हिंदुपातशाही नष्ट करण्यात यशस्वी झाला नाही. शेवटी मराठ्यांनीच त्याची कबर खोदली आणि त्याच्या मृत्युनंतर २० वर्षातच थोरले बाजीराव दिल्लीत दाखल झालेत.

शिवाजींनी जेंव्हा स्वराज्याचा लढा पुकारला तेंव्हा खर सांगायच तर फारसा कोणाला तो ऐकु आला नाही. त्याचे प्रतिसाद उमटण्यास अजुन काही वर्षे जायची होती. ज्यांना त्यांच्या लक्षाची कल्पना होती त्या पैकी बहुतांश लोकांनी त्यांना वेड्यात काढले असणार. कारण मुघली सत्ता तेंव्हा जवळपास ३ ते ४ लाख सैन्य उभे करु शकत होते. दख्खनी सत्ता - आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही- १ ते २ लाख सैन्य उभे करु शकत होते. मुख्य म्हणजे या सर्व मुसलमानी सत्तांना हिंदु पातशाहीची कल्पना बिल्कुल सहन होणारी नव्हती. या सर्व मुसलमानी सत्तांनी पूर्ण हिंदुस्थानाला दार्-उल्-इस्लाम करण्याचा चंग बांधला होता. अश्या परिस्थितीत मुठभर मावळ्यांना पाठीशी घेउन शिवाजींनी बंड करण्याची धाडस केलच कस?

त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आढावा घेतला तर लक्षात येइल कि अवाजवी धाडस दाखवण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. प्रत्येक युध्द, प्रत्येक चढाई दिर्घ व विस्तृत विचार करुनच त्यांनी आरंभिले. अश्या परिस्थितीत स्वराज्याचा नारळ नासका न निघण्यासाठी त्यांनी काय काळजी घेतली असेल?

सर्व प्रथम म्हणजे त्यांनी शत्रुची संपूर्ण ओळख होती. त्यांनी इतिहासाचा चांगलाच अभ्यास केला असणार. इतिहासात हिंदु लोकांनी मुसलमानी सत्तांशी लढतांना ज्या चूका केल्यात त्या पुन्हा न करण्याची त्यांनी आरंभापासुन काळजी घेतली. त्यांनी सगळ्यांशी भांडण एकाच वेळेस घेतले नाही. जो पर्यंत शक्य होते तो पर्यंत एका वेळेस एकाच शत्रुशी त्यांनी झुंज केली. सन १६५० पर्यंत निजामशाही बरीच खिळखिळी झाली होती. त्यामुळे त्यांनी आधी फक्त आदिलशाहीशी भांडण सुरु केले. या दरम्यान त्यांनी मुघली सत्तेशी गोडी-गुलाबीचे संबध ठेवले. आता हा पोरगा काय करण्याचा प्रयत्न करतोय हे न कळायला मुघल मूर्ख नव्हते पण शिवाजींनी या मुसलमानी सत्तांच्या आपापसातील भांडणांचा पूरेपुर फायदा घेतला. या दरम्यान बारा मावळ व कोंकण परिसरातील सरदार व देशमुखांना त्यांनी आपलस करण्याची मोहिम जोरात चालू ठेवली. जे ऐकत नव्हते त्यांना जावळीच्या मोहिमेद्वारे स्पष्ट संदेश दिला. पण जावळीच्या मोहिमेमुळे आदिलशाही खवळली आणि शिवाजींची कारगिर्द सुरु झाली.

त्यांना लढाईतुन पळुन जाण्यात मुळीच हशील नव्हते. कारण उगाच 'जोहार' करुन काही साध्य होणार नव्हते हे राजपूतांच्या इतिहासातुन स्पष्ट होते. पण याचा अर्थ ते पळपुटे होते असा नाही. जेंव्हा अफझलखानाशी झुंज घेण्याचा प्रसंग आला तेंव्हा त्यांनी अफझलखानास छातीवर घेतला पण परत उगाच मर्दुमुकी दाखवण्याच्या भानगडीत पडले नाहीत. दिलेल्या शब्दास मुसलमान मुकतात व दगाबाजी करतात हे लक्षात घेउन त्यांच्याशी वागतांना शिवाजींनी हेच धोरण पत्कारले. अफझलखानास मुळीच धोका नाही असे वचन देउन त्यांनी त्या राक्षसाला जावळीत दाखल केला व त्याचा निकाल लावला.

त्या काळात हिंदु लोकच एक-मेकास दगा करण्यास मागेपुढे बघत नसत. शिवाजींचे गुप्तहेर खाते शक्तिशाली व प्रभावी होते। या गुप्तहेर खात्यामुळेच शिवाजींना कधीही दगा-फटका झाला नाही. अगदी आग्र्याहुन सुध्दा ते सुखरुप परतु शकले. तसेच केवळ शत्रु सैन्याच्या हालचालीच नव्हे तर सुल्तानी दरबारात काय चालल आहे याची बित्त-बातमी त्यांना लगेच कळे.

त्यांनी सैन्याच्या बांधणीत सुल्तानी सैन्याच्या तुलनेत आमुलाग्र बदल आणला.शिवाजींनी सैन्यातुन हत्ती व तोफांचे वजन कमी करुन टाकले. त्यामुळे त्यांचे सैन्य कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर पार करु शकत. शिवाजींच्या सैन्याच्या चपळतेचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ते सुरतेची लुट पाठीवर घेउन सुध्दा ते स्वराज्याच्या हद्दीत सुल्तानी सैन्याचा सामना न करता सुखरुप परत आले. वतन व जमिनी वाटण्याच्या प्रथेस त्यांनी बराच आळा घातला. सैन्यातील शिपायांना पगार मिळत असे. तसेच तलवार व घोडे पुरविले जात. यामुळे चढाईच्या वेळेस लुट-पाट करण्याची आवश्यकता पडत नसे आणि शिपाई-गडी स्वराज्यास निष्ठावंत राही.


सध्य परिस्थितीत भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणांतर्गत जो सावळा गोंधळ चालतो तो बघता शिवाजींनी खेळलेल्या राजकीय तसेच सैनिकी चालींचे महत्त्व अजुन पटते. पण दु:खाची गोष्ट ही आहे की शिवाजींनी आसेतु-हिमाचल आपला मानला व हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले पण सध्याच्या हिंदुस्थानात शिवाजी हे व्यक्तीमत्व केवळ प्रांतीय बनुन राहिले आहे. मराठा साम्राज्याच्या सन १७६० ची सीमा-रेषाच आजच्या हिंदुस्थानाची सीमा-रेषा आहे. यावरुन शिवाजींनी आरंभिलेल्या कार्याचे महात्म्य लक्षात येते. पण राजकीय पक्षांनी प्रत्येक तत्त्व जणु बाजारात विकायला काढले आहे. त्यामुळे शिवाजींपासुन काही शिकण्या ऐवजी ते सांप्रत राजकारणाचे केवळ प्यादे बनले आहेत. १९४७ सालच्या फाळणीचा नर-संहार काय किंवा चीन युध्दात सपशेल पराभव काय किंवा कारगिल युध्द काय, प्रत्येक वेळेस आपले नेते मूर्ख बनलेत.

दूरदृष्टीचा संपूर्ण अभाव, धडाडी नेतृत्वाचा दुष्काळ, इतिहासातुन काहीही शिकण्यास नकार, सत्तांधळी व कुपमंडुक प्रवृत्ती असलेल्या आजच्या नेत्यांनी शिवाजींना गुरु मानले तरच भारताचे भविष्य उज्वल ठरेल नाही तर परिस्थिती कठीण आहे.

7/16/07

सन १६४६

वाड्यासमोर एकदम पंचवीस घोडी उभी राहिल्यावर वाड्यात धावपळ सुरु झाली. अचानक आज हा पाच-हजारी सरदार कसा काय उगावला याचं सगळ्यांनाच कोडं पडल होत. पण इतका विचार करायला कोणाला फुरसतं नव्हती. तबेलेदार घोड्यांच्या निगराणीची सोय करु लागला तर घोडेस्वारांच्या खाण्या-पिण्याच्या सोयी साठी वाड्यातील माणसांची धांदल उडाली. वाड्याचा मालक स्वतः घाई-घाईने तयार होउन पाहुण्यांच्या स्वागतास उंबरठ्यापर्यंत गेला.

"या या राजे. अलभ्य लाभ कि आपले पाय या गरीबाच्या ओसरीस लागलेत" घर मालकाने स्वागत केले.

"या परिसरातुन गुजरत होतो म्हटल की चौकशी करावी थोडी. त्रास तर देत नाहीया ना जास्त?"

"असं बोलुन शरमिंदे करताय राजे तुम्ही. त्रास कसला आला त्यातं. आधी निरोप पाठवला असता तर वेशी पर्यंत आलो असतो की." घर मालक स्वतः बुचकळ्यात पडला होता.

पाच-हजारी सरदार असा दोन-हजारी सरदाराकडे 'डोकावत' नाही. प्रकरण बहुधा गंभीर असणार. पावसाळा नुकताच आटपलाय आणि पेरणी पण व्यवस्थित झाली होती. घोडी फुरफुरायला लागली होती. कुठल्यातरी स्वारीचा बेतं असेल असे घर मालकास वाटले. पण सध्या सगळ्या बादशाह्या शांत होत्या. औरंगझेब दख्खनी बसला होता खरा. बहुधा त्याच्या संबधीतच काही तरी असेल.

सरदारासोबत एक १५-१६ वर्षाचा पोरगा होता. त्याच्या हालचाली कुलीन होत्या व नजरेत भलतीच धार होती. सरदारासोबतीची शिपाई त्या पोरासमोर अदबीने वागत होती. हा पोरगा कोण हा प्रश्न घरमालकाला पडला पण त्या बद्दल तो काही बोलला नाही.

सरदाराला तो आतल्या खोलीत घेउन गेला. "कान्होजींचा निरोप घेउन आलोय" सरदार खोलीत जाता जाताच म्हणाला.

"कान्होजींचा निरोप? राजे, कान्होजींनी हुकुम केला असता तरी त्यांच्या पायाशी दाखल झालो असतो आम्ही. मला ते तीर्थरुपी आहेत. आपण तुकडा मोडा, थोडा आराम करा मग आपण बोलुया"

घरमालक सोबत आलेल्या मुलाकडे बघुन म्हणाला " शिपाई-गड्यांची सोय परसात केलीय."

"त्यांना राहुद्या आमच्यासोबतच" सरदार म्हणाला.

हा पोरगा कोण आहे हे घरमालक विचारणारच होता तेवढ्यात सरदार म्हणाला "राजे. निरोप महत्त्वाचा आणि तातडीचा आहे. किल्ले तोरण्याबद्दल ऐकलच असेल तुम्ही?" सरदारने प्रश्न विचारला.

आता घरमालकाच्या डोक्यात लख्खा प्रकाश पडला. तो एकदम गहन विचारात पडला. त्याच्या चेहर्‍यावर आठ्यांचे जाळे पसरले. त्याला काय बोलावे सुचेना. तोरण्यावर झालेले प्रकरण बुध्दीच्या पलिकडे होते. कोकण पट्टीपासुन ते खानदेशा पर्यंतचे सगळे देशमुख आणि सावंत बुचकळ्यात पडले होते. आणि काही कमी असेल तर चक्क कान्होजी यात सामिल होते.

"एवढा काय झालं विचार करायला? मला वाटलं कि तुम्ही एका पायावर तयार व्हाल." सरदार बोलला.

"म्हणजे? निरोप काय आहे ते तर सांगा" घर मालकाने विचारले. खरतर निरोप काय आहे हे घरमालकाला कळले होते.

सरदार उभा राहिला. खोलीत येर-झारा घालु लागला. कान्होजींची सक्त ताकीद होती कि गोडे-गुलाबीनेच माणसं आपली करायची म्हणुन. त्यामुळे विषयासं कसं तोंड फोडावे याचा विचार करु लागला. गोष्ट कठीण होती. सोपी नव्हती. पण या कार्यातील यशावर पुढल्या बर्‍याच गोष्टी निर्भर होत्या. म्हणुनच कान्होजींनी खास या सरदारास गाठी-भेटींच्या मोहीमेस पाठवले होते. त्याने त्या पोराकडे नज़र टाकली. पोरगा शांतपणे सरदार व घरमालकास न्याहाळित होता.

"निरोप? राजे, न कळायला खुळे का तुम्ही. सह्यांद्रीच्या दर्‍या-खोर्‍यात काय वारं वहातय हे का कळतं नाहीया तुम्हाला? एवढ्या लढाया तुम्ही झेलल्यात छातीवर. आता या छातीची आणि समशेरीची गरज श्रींच्या कामासं आहे. बोला, कधी दाखल होताय या कार्यात?" सरदाराने विषयात हात घातला.

"राजे, तुम्ही वयाने व मानाने मोठे आहात तरी थोडं स्पष्ट बोललेल चालेल का? घरमालकाने विचारले.

"तुम्हांस आमचे भाऊ मानतो. मन-मोकळेपणाने बोला. तुमचं ऐकायलाच आलोय अस समजा." सरदार उत्तरला.

"अहो, सोळा वर्षाचं पोरगं ते. काय कळतंय त्याला. उनाड मुलांसोबत फिरुन वारं गेलय त्याच्या कानात. या पुंडाईस स्वराज्य म्हणतोय तो. बादशाहची नज़र पडली की कोणात उभी रहायची छाती आहे ते सांगा मला. पण तुम्ही या पोर-खेळात का सामिल होताय? बादशाही वरंवटा काय असतो नेमकं ठाउक आहे तुम्हांस. शेवटी तो वरंवटा आपल्या घरावरुनच फिरणार. त्याचा बा जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्यांस कोणी हात लावित नाही. पण आमच्या सारख्यांचा कोण वाली?" घर मालकाने आपली बाजु मांडली.

"तुम्हांस वाटत तसा काही बच्चा नाहीया तो. छावा आहे तो. वय शौर्याचे माप-दंड नसते. या पोरात चांगलाच दम आहे. चांगल्या-वाईटाची जाण आहे आणि आपल्या माणसांसाठी वाट्टेल ते करण्याची हिंमत आहे. ज्या उनाड मुलांची गोष्ट करताय ती पोरे त्याच्यासाठी प्राण द्यायला मागे-पुढे बघणार नाहीत. वरंवटा फिरला तर सगळ्यांच्या घरावर एकत्रच फिरेल. शेवटी कान्होजी राजे पाठीशी आहेत की त्या पोराच्या. आता कान्होजीस रुचलय तर आपली काय बिशाद नाही म्हणायची. आणि असं बघा शहाजी राजांचा फायदाच आहे आपल्याला. जो पर्यंत शहाजी राजांची ढाल आहे तो पर्यंत स्वराज्याच्या बाजु बळकट करायच्या आणि मग हरं हरं महादेव. तुम्ही लढलात की शहाजींच्या पदरी. त्यांच्या मुत्सद्दीपणाची पहेचान तुम्हास करुन द्यायची काही गरज नाही. " सरदाराने प्रत्यक्ष न बोलता मीठाची जाणीव करुन दिली.

"कान्होजींचे तर अनंत उपकार आहेत आमच्यावर. त्यांच्यामुळे शहाजी राजांच्या पदरी नोकरी लागली. त्यांच्याच पदरी राहुन ही पाच गांवे आणि जमिन देण्याची बादशाहने मेहेरबानी केली. पण नाही म्हटल तरी त्यांचा संसाराची संध्याकाळ होतेय आणि माझा ऐन मध्यात आहे. त्यांच्या म्हातारचळीसाठी मी का सर्वस्वाचे बेल-पात्र चढवु?" घरमालक बोलुन गेला.

खोलीत शांतता पसरली. कान्होजींच्या बाबतीत इतरवेळी असले उदगार कोणी काढले असते तर समशेरी आत्तापर्यंत म्यानात नसत्या राहिल्या. पण आज परिस्थिती वेगळी होती. सरदाराने आपला राग काबुत ठेवला.

"राजे, तुमच्याकडुन ही अपेक्षा नव्हती आम्हास. अहो, किती वर्ष बादशाची चाकरी करायची? काय मिळवायचं यातुन? आज कृपा आहे तर उद्या नाही. तुम्ही आमची साथ द्या किंवा नका देउ पण तुमच्या घरावरुन वरंवट फिरायचा असेल तर फिरेलच. आणि कृपा करणारा बादशहा कोण? हे यवहुन-तुरकी लोक, आपल्या भूमीवर राज्य करता आहेत आणि आपण त्यांच्या मीठाची आण आपण कुत्र्यासारखी खातोय. आधी गांधार गेला, मग सिंधु गेली. आता तीर्थक्षेत्रेही सुरक्षित नाहीत यांच्यापासुन. सोमनाथाच काय झाल? अयोध्येचं काय झाल? दूर कशाला जायचं, पुण्याच्या जमिनीवरुन गाढवाच नांगर फिरल तेंव्हा कुठे होता तुम्ही? किती वर्ष या नाही तर त्या नाहीतर अजुन कुठल्या बादशाहची सेवा करत जगायच? सत्कार्यी ठेविली ती निष्ठा नाही तर ती नुसती चाकरी होते" सरदार म्हणाला

"कसलं स्वराज्य? कसला बंड, कोण बादशहा आणि कोणाची भूमी. हे प्रश्न निरर्थक होउन आज ५०० वर्ष झालीत. स्वतःला 'सिंह' म्हणवून घेणारे राजपुत जातीचे भ्याड, आपल्या पोरी-बाळी निसंकोच पणे मुसलमानी घरात पाठवतायत. त्यांनासुध्दा हे मुसनमान नाही झेपले. या राजपुतांची पेंढा भरलेली ही मढी दिल्लीच्या दरबारात भिंतीला खिळे लाउन ठोकली आहेत आणि तुम्ही मला सांगताय की हे सोळ वर्षाचं पोरग हिंदवी राज्य स्थापन करेल म्हणुन. अख्या हिंदुस्थानात आपणच देव-धर्माबद्दल विचार करण्याची गरज का आहे? " घरमालक उभा राहुन खिडकीजवळ गेला.

"तीर्थक्षेत्रे वाचवुन काय उपयोग आता? हि खालच्या रक्ताची मुसलमानी लोकांनी जेंव्हा सिंधु ओलांडली आलीत तेंव्हाच भ्रष्ट झाल सगळ तीर्थ. आता ही स्थाने सोवळी करण्याची ना कोणाची छाती आहे ना कोणाच्या समशेरीत दम आहे. आणि ज्याने ज्याने बंड केला तो हर एक जण, राजा हरपाल देवासारखा कातडं सोलुन वेशीवर टांगल्या गेला. एवढ इतिहासात कशाला जाताय, इथे आपल्या जवळ दक्षिणेला तालीकोटाच्या युध्दात काय झाल विसरलात का? एक माणुस जिवंत ठेवला नाही या सुल्तानांनी. एक-एक इमारत, एक एक मंदिर जमिनदोस्त केली आणि हर एक बाई बाजारात विकली." घर मालक जणु स्वगत बोलत होता.

"होतो ना मी तिथेचजेंव्हा पुण्यावरुन गाढवाच नांगर फिरल तेंव्हा. शहाजी राजांच्या पाठीशी पाठ लाउन मी सुध्दा लढलोय की. त्यांनी बरीच स्वप्ने दावली आम्हास. त्या बादशाही पोरास गादीवर बसवुन आपणच राज्य करु म्हणालेत ते. सगळे उपाय शेवटी थकल्यावर, शहाजी राजे गुमान आदिलशहाच्या पायाशी दाखल झालेत आणि दक्षिणेस निघुन गेलेत. पण जी शेकडो लोक त्यांच्या स्वप्नांसाठी मेलीत त्यांच काय? कोण विचारतय आता त्यांच्या मढ्यांना?" घरमालकाने आपली व्यथा प्रकट केली.

या बोलण्याचा त्या पोरावर परिणाम झाला होता. त्याच्या करारी नज़रेत आश्चर्य व दयेच्या काहिश्या विचित्र छटा दिसत होत्या. एवढा इतिहास माहिती असुन हा इसम आपली तलवार बादशाहीसाठी कसा लढवतो हे त्याला कळेना. तो काही तरी बोलणार होता पण त्याने स्वतःला रोकले. आज फक्त सरदारच बोलणार असे ठरले होते.

"ज्या अपमानांची गोष्ट करताय ना त्यानी गांगारुन जायच कि स्फुरण चढुन परत लढायला तयार व्हायच? राजपुतांचा कशाला विचार करता, तुमच्या आईच दुध तुम्ही प्यायला आहात का नाही? काही देणं आहे का त्या दुधाच कि बादशाहीची पाय चाटायला दुध पाजलं तुमच्या मायनी? अवघ सोळा वर्षाचा पोरा-टोरांनी स्वराज्याची आणं वाहिली आणि तुम्हा-आम्हा सारखे अनुभवी लढवय्ये सरदार भ्याडासारखे हातात बांगड्या घालुन ५ गावांच्या तुकड्यावर जगत राहिलो तर तुळजापुरची माय हसणार नाही का? इतिहास काय म्हणेल आपल्याला?" सरदार उत्तरला

"फार प्रभावित केलेल दिसतय त्या पोरानी. मी ऐकलय की माणसांना आपलसं करण्यात पटाईत आहे. पण इतिहासाच्या मोठ्या-मोठ्या बाता करण्यात काही हशील नाही. तराईच्या युध्दानंतर गेल्या ५०० वर्षात इतिहासाकडे रडण्या पलिकडे काहीही उरलेल नाही. या ५०० वर्षांच्या जखमांवर मलम्-पट्टी करणे आता शक्य नाही. त्याचा बदला घेणे शक्य नाही आणि फारसा अर्थही नाही. सगळ विसरुन मुकाटपणे जगण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य संपूर्ण कंठण्याची थोडी शक्यता आहे. आजच्या जमान्यात ज्यानी-त्यानी आपली काळजी घ्यायची असते. तसेही या स्वराज्य वगैरे प्रकरणात जरी आम्ही शामिल झालो तर आम्हास काय फायदा आहे? विचारा त्यांस आणि कळवा आम्हाला" घर मालकाने हे बोलुन या विषयावर जणु पाणी सोडले.

पाहुण्या सरदाराने हताशपणे त्या पोरा़कडे बघितले. तो काहीतरी बोलेल अशी सरदाराची इच्छा होती पण तसली काही चिन्हे दिसत नव्हती.

"राजे, फार अपेक्षा होत्या आपल्याकडुन कारण तुमच्या संगे आम्ही सुध्दा शहाजी राजांसोबत लढलो होतो. आम्हास वाटले कि या कार्यात तुम्ही एका पायावर तयार व्हाल म्हणुन कान्होजींनी सोपवलेल्या कामाचा नारळ तुमच्या उंबरठ्यावर फोडायच ठरवल. पण नारळ नेमका नासका निघाला. राजे, मरण शेवटी सगळ्यांच्याच नशिबी असत. पण तुम्ही कशासाठी मरता यावर जगण्याच यश अवलंबुन असत. अपयशाची असंख्य कारणे असतात पण यशस्वी होण्यास फक्त एकच गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे आत्मविश्वास. शिवबा आम्हास तो आत्मविश्वास देतो. इतिहासातील पराजयाचे मुडदे खांद्यावर घेउन कधीच भविष्य बनवु शकत नाही. हे मुडदे खाली टाका आणि आजु-बाजुला काय चालल आहे हे डोळे उघडुन बघा. ही तीर्थक्षेत्रे आपली आहेत आणि ती आपल्यालाच सोवळी करायची आहेत. ही भुमी आपली आहे आणि यवनां पासुन आपणच तीला मुक्त करायचे आहे. हे आपल कर्तव्य आहे. हे कार्य शिवबाच नव्हे, हे कार्य श्रींच आहे. या कार्यातील यश-अपयश आपल्या हाती नाही, ती तुळजाभवानीची इच्छा. पण या कार्यात सहभागी होण न होण तुमच्या हातात आहे"

या बोलण्याचा थोडा परिणाम घरमालकावर झाला. तो गहन विचारात गढुन गेला. सरदारांस आशेचे किरण दिसु लागले.

" एवढा नकोय विचार करायला. राजे, स्वप्न भंगली म्हणुन काय स्वप्न बघायची थांबतो का आपण? आज तर ही स्वप्ने सत्यात आणायची सुवर्ण संधी मिळतेय. एक होउन शिवबाच्या पाठी उभे राहिलो तर आपला सामना करण्याची अख्ख्या दख्खनात कोणाची हिंमत आहे सांगा बरे? सरदाराने शेवटचा खडा टाकला.

"राजे, या कार्यात सामिल व्हायला काही हरकत नाही मल पण पुर्वजांच्या अनुभवांवरुन शिकण हे सुध्दा आपलच कर्तव्य आहे व त्यातच शहाणपणा आहे" घरमालक लगेच उत्तरला. वतनाची आस, सत्कार्याच्या निष्ठेपेक्षा वरचढ ठरली.

काहिसा विचार करत त्याने विचारले, "अजुन किती लोक सामिल झाले आहेत?"

सरदाराने नावे सांगितली आणि म्हणाला" बारा मावळातील बरेचसे सरदार सामिल झाले आहेत. काही सरदार आपणहुन सामोरे आले. काहींना कान्होजींचा निरोपच पुरेसा होता." सरदाराने घसा खाकरला आणि शेवटचे विचारले " मग कान्होजींस तुमचं काय उत्तर सांगायचे?"

घरमालकाला काय उत्तर द्यावे ते सुचेना. "आपण केलेली चर्चा खास़गीच राहिल अशी अपेक्षा करतो" एवढच तो म्हणाला.

कान्होजींबाबत काहीतरी पायरी सोडुन बोललो याची त्याला आठवण झाली. "तुम्ही ती चिंता करु नका" अस म्हणत सरदार उभा राहुन निघण्याची तयारी करु लागला.

"राजे, निघालात? जेवणाची पानं वाढली आहेत. न जेवता गेलात तर आम्हास बरे नाही वाटणार. " घर मालक म्हणाला.

"सवड नाही राजे. स्वराज्यप्राप्तीची आणं भवानीच्या पायाशी वाहिली आहे. दिवस वैर्‍याचे आहेत. जिंकलेला प्रदेश टिकवण्यसाठी बरीच कष्ट आहेत."

सगळी लोक घोड्यांवर स्वार झालीत. सरदार व घरमालकाने मिठ्या मारल्या.

" हा पोरगा कोण?" न राहवुन घर मालकाने विचारले.

"कान्होजींच्या पदरीचा आहे. हुशार आहे." एवढेच सरदार म्हणाला व घोड्यावर स्वार झाला. मग काहीसा विचार करुन म्हणाला " याची तुमच्याशी ओळख करुन देण्याची फार इच्छा होती पण तसे होणे नव्हते." व त्याने घोड्याला लगाम दिला. धुराळा उडाला व घोडी वेगाने दिसेनाशी झाली.

सरदाराचे शेवटचे वाक्य घरमालकाच्या डोक्यात घोळत होते. त्या बद्दल विचार करत तो घरात येत होता तेवढ्यात तो मुलगा कोण हे त्यांस उमगले. "म्हणजे चक्क ...?" त्याचा जीव घाबरा झाला. " नुसते कान्होजीच नाही तर शहाजी राजांच्या बाबतीत काय काय बोललो" असे काहीतरी पुटपुटत त्याने नोकरांना घोडी तयार ठेवण्याचा हुकुम केला. घाई-घाईने घोड्यांवर स्वार होउन सरदाराला गाठण्यासाठी त्याने घोडी पिटाळली.
००००००
(हि कथा काल्पनिक असली तरी शिव-कालीन इतिहासाशी निगडित आहे. )

टीप -:
सन १६४६ ला शिवजींनी स्वराज्याची स्थापना केली.

तराईचे युध्द, सन ११९२ - या युध्दात पृथ्वीराज चौहाणचा पराभव झाला व भारतात सुल्तानी अंमलाची सुरुवात झाली.

तालिकोटचे युध्द, सन १५६५ - या युध्दात पाच सुल्तानांनी एकत्र येउन विजयनगर साम्राज्य धुळीस मिळविले.

राजा हरपालदेव हा देवगिरीच्या राजा रामदेवाचा जावई. अल्लाउद्दीन खिलजी देवगिरी जिंकुन परत दिल्लीला गेल्यावर हरपालदेवाने बंड पुकारला. तेंव्हा राजा रामदेवरायाने खिलजीला बंड शमवायला आमंत्रण दिले. खिलजीने तातडीने येउन बंड शमविला व राजा हरपालदेवाला जिवंत सोलुन देवगिरी (म्हणजे औरंगाबादेजवळ) च्या वेशीवर टांगले.

कान्होजी जेधे हे शहाजी राजांचे अत्यंत विश्वासु पाईक. त्यांचे बारा मावळात बरेच वजन होते. ते वयाने शिवाजींपेक्षा बरेच मोठे होते. पण स्वराज्याच्या आरंभापासुन ते शिवाजींच्या पाठीशी ठामपणे उभे होते.

7/8/07

मोमिनपुरा

माझा एक चांगला मित्र मोमिनपुर्‍यात रहात असे. त्याच्या घरी पहिल्यांदा गेलो तेंव्हा संपुर्णतः मुस्लिम भागात जायचा माझा हा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे मी थोडा मनातुन घाबरलेलो होतो. इतका गजबजलेला परिसर मी आधी कधी बघितला नव्हता. पोद्दारेश्वर राम मंदिरच्या थोड पुढे गेल्यावर सेंट्रल ऍव्युनु वर डाव वळण घेतल्यावर मोमिनपुर्‍याची हद्द सुरु होते. त्या रस्त्याचे नाव बहुदा मोहम्मद अली रोड आहे. रस्त्याच्या डाव्या बाजुला भली मोठ्ठी मशीद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला बाजार भरतो. रस्त्यावर वेग-वेगळ्या आकाराच्या गाड्या हॉर्न वाजवित वेगाने जायचा वायफळ प्रयत्न करत होते. दुकानांमधील सामान दुकानाबाहेर अधिक होतं. माझा मैतर मला उजवीकडच्या बोळीत घेउन गेला. हा परिसर गरिब, झोपडपट्टी अश्यातला वाटत नव्हता कारण तरुण मुले व पुरुष बर्‍याच चांगल्या दर्जाचे अफगाणी पध्दतीचे झब्बे-पायजमे घालुन हिंडत होते. लहान मुले रस्त्यावर खेळत होती. बायका मात्र जास्त दिसत नव्हत्या. बहुधा संध्याकाळची वेळ असेल म्हणुन दिसत नसाव्यात. पण ज्या थोड्या फार बायका दिसत होत्या त्या बुरख्यातच दिसत होत्या. अगदी लहानश्या गल्लीतुन आम्ही सायकलने दोघे जात होतो. मी हिंदु आहे म्हणुन माझ्या कडे लोकं बघतायत असं मला उगीच वाटतं होतं. पण गल्लीत ये-जा करणारे सगळेच लोक एका-मेकाला असंच बघत असावेत.

त्याचे घर ज्या गल्लीत होते ती बोळ अजुन लहान होती. दोन स्कुटर एकाच वेळेस त्या गल्लीत मावणे अशक्य होत. त्याचं घर चार मजली होतं. ब्रेड च्या पाकीटासारख एकावर एक मजले बांधले होते. समोर वर्‍हांडा मग एक लहानशी खोली, त्यामागे स्वयंपाक घर आणि तिथेच न्हाणीघर. एवढ्या भागावर तीन मजले आणि त्यावर गच्ची. अश्या या अंधार्‍या घरात माझा मित्र त्याची एकुण नऊ भावंडे, त्याचे आई-वडिल, त्याचे काका-काकु व त्या काकाची चार मुले असे सगळे रहात होते. माझा मित्र वयाने भांवडांमधे दुसर्‍या क्रमांकाचा होता. सगळ्यात मोठा भाऊ याच्याहुन ३-४ वर्षांनी मोठा तर सगळ्यात लहान बहीण याच्यापेक्षा १०-१२ वर्षांनी लहान असावी.
" अब, क्या है की मेरा घर तेरे घर समान बडा नही है । छोटा है और काफी लोग़ रहते है।"
माझं घर मोठं होत अश्यातील प्रकार मुळीच नव्हता पण आमच्या घरात फक्त चारच लोकं होते.
" ऐसी कोई बात़ नही है यार। घर आखिर घर होता है। जैसा हो पर अपना तो होता है।"
" हां, ये बात तो सही है। चल सबसे उपरवाली मंजील़ पर जाते है। वहाँसे काफी़ अच्छा नज़ारा है।"

आम्ही गच्चीवर गेलो. गच्चीवरुन सगळं मोमिनपुरा दिसत होत. अस्ताव्यस्त पसरलेल. ज्याला हव तस आणि हवं तेवढ्या उंचीची घरे, जिथे जागा मिळेल तीथे इमारती बांधलेल्या होत्या. घराच्या नैॠत्येला मशीद दिसत होती. सगळ्या घरांवर हिरवे झेंडे लावले होते. बर्‍याच घरांवर काळे झेंडे लावले होते. काळे झेंडे काय दर्शवितात हे मला त्याला विचारायच होतं.
तेवढ्यात तो म्हणाला " चलं, हमारी छोटी फॅक्टरी दिखाता हुं।"
"कहां है? यहीं पास़ मे ही है?"
"हां" गच्चीवरुन खालती कुठल्यातरी इमारती कडे बोट दाखवित तो म्हणाला. "वो है।"
खालती पसरलेल्या बोळींच्या व लहान लहान घरांच्या अगम्य जंजाळात नेमकी कुठली इमारत तो मला दाखवत होता याचा मुळीच गंध लागला नाही.

त्याच्या वडिलांचा हातमागावर लुंग्या बनविण्याचा लहानसा धंदा आहे. ज्या रंगाच्या लुंग्या मी तिथे बनतांना बघितल्या त्यावरुन त्यांची विक्री फक्त मोमिनापुरा किंवा तत्सम परिसरातच होत असावी. ही हातमागाची जागा दोन घर सोडुन लगेच होती. गरम, दमट आणि अंधार्‍या जागेत हा उद्योग चालू होता. या व्यतिरिक्त या कुटुंबाच्या दोन ट्रक भाड्यानी देण्याचाही उद्योग होता. " हमारी एक जमाने मे दसं-दसं ट्रके रस्ते पर दौडती थी। पर दो गाडीयोंका एकसाथ ऍक्सिडेंट हो गया। वो चक्कर मे पुरा का पुरा धंदा बैठ गया। अभी धीरे-धीरे धंदा फिरसे रस्ते पर आ रहा है।"
गेली काही वर्षे या कुटुंबानी बर्‍याच खस्ता खाल्या असाव्यात.

घरी आईने जेवणाची तयारी केली आहे अस कुठल्यातरी भावंडाने निरोप आणला. पण रात्रीचे आठ वाजायला आले होते. त्यामुळे मला घरी जाण भाग होत.

नाही म्हटल तरी हा सगळा प्रकार थोडा अंगावर येण्याजोगाच होता. इतकी भावंडे, इतक लहान घर व पैसा कमविण्याची एक तळहातावर खाउन जगण्यासारखा सिमित उद्योग हे सगळं थोडं भीतीदायक होत. तसं घर खाउन-पिउन सुखी होत. पण एकुण मोमिनपुर्‍यात सगळीकडे हीच परिस्थिती आहे असं माझ्या मित्राच्या बोलण्यावरुन वाटले. याचा अर्थ असा नव्हे की हिंदु समाज अप्रगत नाही. तसेच एका उदाहरणावरुन कुठलं मत ठामपणे मांडणेही उचित नव्हे. (पुढे मी मुंबईच्या भेंडी बाजार भागात गेलो तिथेही असलीच परिस्थिती होती.) पण सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे भारत आज एवढी प्रगती करत असतांना या भागात भविष्याबद्दल फारशी उत्सुकता कोणाला नाही. कारण एकंदर शिक्षणाबद्दल उदासिनता, त्याअन्वये, तंत्रज्ञानाशी संबधीत असलेल्या उपलब्ध संधींचा फायदा उठविण्याची असमर्थता तसेच स्त्री-शिक्षण व कुटुंब नियोजनाच्या नावानी शंख. या कारणांमुळे १९९० नंतर उदयास आलेल्या अर्थशास्त्राच्या नविन गणितात या समाजाला जागा मिळण कठिण जातय.

अश्या परिस्थितीत धर्मांधता वाढणे सहाजिकच आहे. आणि जर का कोणी तरुण या परिस्थितुन बाहेर पडु इच्छित असेल तर राजकीय पक्ष प्रगतीची दारं अडवितात. हे सगळं प्रकरण कसं आणि कधी बदलणार, माहिती नाही. पण लौकरात लौकर काहीतरी करणं आवश्यक आहे नाही तर फक्त त्यांचेच नव्हे तर इतरांचे भविष्यही धोक्यात आहे.

7/3/07

प्रतिभाताईंनी उठवलेले राष्ट्र-वादळ

प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती होणार माझ्या मनात पहिला प्रश्न हा आला कि ही व्यक्ती कोण? आता, मी उत्तर प्रदेशी असतो किंवा तामिळ असतो तर हा प्रश्न पडणे सहाजिक आहे पण मी मराठी असुन सुध्दा ही व्यक्ती कोण याचा गंध मला नव्हता. अजुनही नाहीया. भारतीय राष्ट्रपती पद हे नामधारी मानाचे स्थान आहे. आपल्य देशातील लोकतांत्रिक व्यवस्थेत या पदाला गणतंत्रदिनी भाषण देण्या पलिकडे फारसे महत्त्व आत्ता पर्यंत नव्हते. फाशीच्या शिक्षेचा अंतिम निर्णय राष्ट्रपतींच्या हाती असतो खरा पण हा निर्णय घेण्याची परिस्थिती दुर्मिळ येते. अश्या परिस्थितीत प्रतिभाताईंच्या राष्ट्रपती होणार या मुद्द्याने एवढे वादळ का निर्माण केले?

राष्ट्रपतीपदाची निवडणुक पंतप्रधान पदाच्या निवडणुकी पेक्षा निराळी असते व या पध्दतीचे विश्लेषण येथे करण्याचा माझा विचार नाही. थोडक्यात, जो राजकीय पक्ष सत्तेवर असतो त्याच्या आवडीचा व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी निवडुन येतो. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाची अनिभिषिक्त सत्ता बरीच वर्षे चालल्यामुळे कॉंग्रेसी व्यक्तीच राष्ट्रपती म्हणुन निवडुण येतं असे. आणि काँग्रेस पक्ष म्हणजे गांधी-नेहरु घरण्याचा पाणपोई असल्यामुळे सन १९७० नंतरच्या काळात या 'राज-घराण्याचे' जो निष्ठावंत पाईक असेल तो राष्ट्रपती म्हणुन नेमल्या जाईल. याचा अर्थ असा नव्हे कि या काळातील राष्ट्रपती कर्तबगार किंव्हा हुशार नव्हते पण गांधी-नेहरु घराण्याशी निष्ठा असणे याचा बुध्दी असण्याशी काहीसुध्द्दा संबध नाही.

नरसिंम्हाराव सरकार नंतर जो गठ-बंधनाचा काळ आला त्यात राष्ट्रपतीपदाचे महत्त्व वाढले. कारण जेंव्हा लोकसभेत त्रिशंकु परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस राष्ट्रपतीस जो पक्ष बहुमत सिध्द करु शकेल अशी आशा असते त्या पक्षास सत्ता स्थापन करण्यास आमंत्रित करण्यात येते. उदाहरणार्थ, १९९७ सालच्या त्रिशंकु निवडणुकीत तेंव्हाच्या राष्ट्रपतींनी सत्ता स्थापन करण्यास सोनिया गांधी यांना आमंत्रण देण्यास राजी होते. पण त्याआधीच समाजवादी पक्षाने काँग्रेसला पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे गाडं फारस पुढे गेल नाही. पण सत्ता स्थापन करण्यास आवश्यक आकडे सुरुवाती पासुनच नसतांना के.आर. नारायण सोनिया गांधींना निमंत्रण देण्यास एवढे उतावळे का होते? कारण एकतर ते पूर्वी काँग्रेसचे सदस्य होते व दुसरं म्हणजे जवाहरलाल नेहरुंच्या काळापासुन ते गांधी घराण्याचे निष्ठावंत पाईक होते.

जवळच्या भविष्यात तरी त्रिशंकु लोकसभचे चित्र त्रिशंकुच असण्याची शकत्या अधिक असल्यामुळे राष्ट्रपतीपदावर 'आपला' माणुस असणे आता आवश्यक झाले.

भा.ज.प. ने मात्र सत्तेत आल्यावर या परंपरेस तडा दिला. श्री अब्दुल कलाम या एका अत्यंत हुशार, कर्तबगार, राजकारणी नसलेल्या व तरुण पिढीच्या आवडत्या व्यक्तीला राष्ट्रपती बनवुन, श्री राजेंद्रप्रसाद किंवा श्री राधाकृष्णन या सारख्या मेधावी पुरुषांना राष्ट्रपती नेमण्याच्या परंपरेचे पुनरुत्थान केले. तसेच हिंदुत्ववादी पक्ष ही ख्याती असलेल्या भा.ज.प. ने एक मुस्लीम व्यक्तीला राष्ट्रपती बनवुन, हे पद राजकारणापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे हे पण सिध्द केले.

पण आता परत काँग्रेस सत्तेवर आहे. लांगुललाचन परत जोरात सुरु असतांना एका अज्ञात व्यक्तीला- जीची आत्तापर्यंतची कामगिरी म्हणजे एक सहकारी पतपेढी बुडीत काढणे ही आहे, जी व्यक्ती आपल्या स्वर्गवासी गुरुला अजुनहे 'भेटते' आणि जीचे आयुष्याचे व्रत म्हणजे गांधी घराण्याची सेवा करणे हे होय - राष्ट्रपती पदासाठी नियुक्त करणे म्हणजे सुशिक्षित व कष्टीक भारतीय नागरिकाचा अपमान नव्हे का? तसेच ज्या तर्‍हेने कम्युनिस्ट पक्ष आपल्या ४० लोकसभा सदस्यांच्या 'बळावर' श्री अब्दुल कलाम यांना दुसर्‍यांदा राष्ट्रपती पदावर येउ न देण्याची देशावर जी जबरदस्ती करतोय, तो प्रकार संतापजनक नव्हे का?

अगदी काँग्रेसी व्यक्तीच राष्ट्रपती करायचा असला तरी काँग्रेस मधे काय कर्तबगार व्यक्तींचा दुष्काळ पडलाय का? राजा करणसिंग अधिक उत्तम उमेदवार नाही का? पण अर्जुन सिंग सारखा व्यक्ती ज्याची सत्तापिपासुता पुढल्या पिढीचा बळी घेणार आहे किंवा शिवराज पाटील ज्यांची आत्ता पर्यंतची कामगिरी म्हणजे पाय चाटणे हीच आहे, त्या पेक्षा प्रतिभाताई बर्‍या. कर्तबगार नसल्या तरी निदान सत्तापिपासु किंवा फारश्या भ्रष्ट नाहीत.

आपण भारतीयांना दुय्यम दर्जाच्या वस्तु स्विकारायची सवय आहे. जे मिळेल ते गोड मानुन आपण टाळ्या वाजवायला तयार असतो. आपणच काँग्रेस पक्षाला निवडुण दिले आहे. शेवटी जसा राजा तशी प्रजा. किंवा प्रजातंत्रात, जशी प्रजा तसा राजा !

7/1/07

इतिहासाची तासिका

'ब' वर्गाला इतिहासाचा विषय शाळेच्या मुख्याध्यापिका स्वतः शिकवित असत. त्या सेवा निवृत्तीच्या अगदी जवळ आल्या होत्या. ठेंगण्या व आजी सारख्या दिसणार्‍या बाईंचा विद्यार्थ्यांवर मुळीच म्हणजे मुळीच वचक नव्हता. त्यातुन 'ब' वर्ग शिक्षकांना त्रास देण्याचा बराच अनुभवी होता. मराठीच्या व इंग्रजीच्या शिक्षिकां व्यतिरिक्त 'ब' वर्ग कोणालाच जुमानत नसे. त्यातुन मुख्याध्यापिका बाईंना त्रास देण्याची काही औरच न्यारी होती. शेवटी मुख्याध्यापिकेला सळो की पळो करुन सोडलं म्हणजे विशेष शौर्याची गोष्ट होती.

बाई पहिल्या बाकावर पुस्तक ठेउन शिकवत असत. त्यांना थोड कमी ऐकु येत असे. त्यामुळे मुले मागल्या बाकावर बसुन सारख्या 'कॉमेंट्स' करत असतं. "शांत रहा. आजकालच्या मुलांना काहीच लाज वाटत नाही" बाई म्हणाल्या. त्यांची जबडा समांतर हलवित बोलण्याची थोडी विचित्र पध्दती होती. त्यामुळे त्यांचे उच्चार अधिक ठळक होत असत. "पुस्तकं बंद करा" या वाक्यात 'क', 'द' या शब्दांवर जास्त भार त्या देत असत. मुलांना हसायला एवढ कारण पुरेसे होते. बाईंनी शिकवायल सुरुवात केली व मुलांनी मस्ती करायला. जी अभ्यासु मुलं होती त्यांची मात्र पंचाईत होत असे. त्यांना बाई काय शिकवतायत हे ऐकायच असे पण वर्गातील मस्तीखोर मुलांपुढे ते शरण होते.

पहिल्या बाकावर बसलेला मंदार आज विशेष 'फॉर्म' मधे होता. बाई जे काही बोलतील त्यातील एखादा शब्द तो त्याच्या घोगर्‍या आवाजात परत जोरात उच्चारत असे. त्याचा आवाज म्हणजे माईक अगदी तोंडाशी घेउन बोलल की जसा आवाज येइल तसा होता. त्यामुळे अगदी मागल्या बाकावर सुध्दा तो काय बोलतोय ते ऐकु येत असे. एकतर बाईंना मंदारचा वात्रट पणा ऐकु येत नव्हता किंव्हा त्या थकल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करीत होत्या.

"चिन्मय, हसायला काय झाल तुला? हसणं बंद कर" बाई चिन्मय वर ओरडल्या.
"मस्तीखोर चिन्मय" मंदारने आपले मत स्पष्ट केले.
"हो मॅडम सॉरी" चिन्मय.

"पुस्तक बंद करा व मी काय बोलतेय त्या कडे लक्ष द्या" बाई म्हणाल्यात.
"आता कुठे कुठे लक्ष देउ. मॅडम कडे कि पुस्तका कडे" मंदार उवाच.
पहिल्या बाकावर बसुन असलं काही बोलण म्हणजे मंदारच्या धीटाईची सीमा होती. इतर मुलांवर आता हसुन हसुन पोट दुखण्याची पाळी आली होती.

"चिन्मय, तुला हसायचं असेल तर मागल्या बाकावर जा"
"हो मॅडम, सॉरी मॅडम" अस म्हणत चिन्मय धावत धावत सरळ मागल्या बाकावर दाखल झाला.
"काही लाजच नाही या मुलाला. अगदी लगबगीने मागल्या बाकावर गेला"
"निर्लज्ज चिन्मय" मंदार.

पण मंदार आज एवढ्यावर थांबणार नव्हता. बाईंनी वर बघितलं की तो कागदाचे लहान्-लहान तुकडे पुस्तकावर टाकायचा. शिकविण्याच्या तंद्रीत बाई ते तुकडे बाजुला करायच्या. काही वेळा हे करुन झाल्यावर मंदारने पुस्तकाची पानं बदलवायला सुरुवात केली. पण बाईंच्या काहीच लक्षात कसं येतं नव्हत ही थोडी नवलाईची गोष्ट होती. तेवढ्यात मागल्या बाकावरुन पाय जोर-जोरात जमिनीवर घासण्याचा आवाज येउ लागलेत. बाई तरातरा मागल्या बाकांकडे चालत गेल्या. "कोण मस्ती करतय" म्हणत जो दिसेल त्याला चापट्या मारु लागल्यात. वर्गात 'हॉ..हॉ...' चा गजर झाला. पाय घासण्याचे आवाज मात्र थांबलेत. (तेजसनेच बहुतांश चापट्या खाल्ल्यात.)

या दरम्यात मंदारने कहर केला. त्याने इतिहासाचे पुस्तक बदलवुन त्या जागी गणिताचे पुस्तक ठेवले. बाई शिकवायला परत सुरुवात करणार तेच त्यांच्या हा वाह्यातपणा लक्षात आला. "नालायक" म्हणत त्यांनी मंदारला चापट्या मारायला सुरुवात केली. "आई ग..." मंदार खोटा कळवळला.
पूर्ण वर्ग आता हसुन हसुन लोळायला लागला होता. "तू, तू आणि तू आणि तुझ नाव काय आहे? तू पण वर्गाबाहेर जा" जी मुलं दृष्टीक्षेपात असतील त्यांना बाईंनी वर्गाबाहेर हाकलले.

" मी काय केलं. मी तर काहीच नाही केलं. मार खाउनही वर्गाबाहेरचं जावं लागतं" असली काही वाक्य ऐकु येउ लागलीत. मग उगाच खोटा-नाटा चेहरा पाडुन, फार वाईट वाटतय आणि चुकुन असला गोंधळ झाला इत्यादी भाव तोंडावर दाखवण्याचा प्रयत्न करत वर्गातील मधली ओळ वर्गाबाहेर गेली.

बाईंना शिकवायला जेमतेम १० मिनीटे मिळालीत. तासिकेची घंटा झाल्यावर त्या वर्गाबाहेर आल्यावर त्यांची अपेक्षा होती कि मुले कान धरुन वर्गाबाहेर उभी असतील म्हणुन पण वर्गाबाहेर सामसुम होतं. मुख्याध्यापिका असल्यामुळे त्यांच्याकडे फार काम असे. वर्गाबाहेर चपराशी कोणीतरी आलय हा निरोप घेउन हजर होताच. त्यामुळे त्या घाई-घाईत कार्यालया कडे निघुन गेल्यात. बाहेर काढलेली मुले थोड्याच वेळात जणु काही झालच नाहीया अश्या भावात साळसुद पणे परत वर्गात दाखल झाली.

6/28/07

रुद्र शक्ति

या ब्लॉगचे शीर्षक रुद्र शक्ति का आहे याचे मी कधीच विश्लेषण केले नाही. पण मी ज्या हेतुने मराठी ब्लॉग लिहिण्यास आरंभ केला होता त्याचे स्वरुप बर्‍‍याच प्रमाणात बदलेलय. त्यामुळे आता मी नक्की कुठल्या कारणांसाठी मराठीत ब्लॉग लिहितो, याचा मला पुनश्च एकदा विचार करावा लागणार आहे. या विषया बद्दल विचार करतांना अनेक नविन गोष्टी माझ्या ध्यानात आल्यात. त्या विचारांबद्दलचे हे स्फुट लेखन.

माझ्या ब्लॉगला 'रुद्र शक्ति' देण्या मागचा मूळ उद्देश किंवा विचार धारणा अशी की आजची तरुण पिढी अनेक क्षतींनी ग्रस्त आहे. आर्थिक विकास हे सामाजिक विकासासाठी आवश्यक असलेले साधन आहे, अंतिम लक्ष नव्हे. पण बरोबर काय आणि चूक काय हेच कळेनास झालय. बरेच लोकं आजकाल ब्लॉगस द्वारे मत-प्रदर्शन करीत असतात. तरुण पिढीच्या आकांक्षांचे प्रतिबिंब जणु या ब्लॉगसद्वारे दिसते. पण हे प्रतिबिंब भीषण आहे. सत्ता-पिपासु राजकारणी आपल्या वैयक्तिक फायद्याच्या बेड्या तरुण पिढीच्या पायात बांधत असतांना, या ब्लॉगस च्या विश्वात तरुण सुशिक्षित पिढीने एकत्रित होउन विचार मंथना द्वारे आवश्यक रुद्र शक्तिची निर्मिती केली तरच उज्वल भविष्याची वाट अडवु बघणार्‍या राहु-केतुंवर मात करता येणे शक्य आहे असले खुळे विचार मी करतो. त्यामुळे उज्वल भविष्या कडे जाणार्‍या सेतु-निर्मितीस माझे खारीचे योगदान मी माझ्या मराठी ब्लॉगद्वारे द्वारे व्हावे अशी माझी सुप्त इच्छा होती.

या पार्श्वभूमी वर माझे मराठी ब्लॉगस ही सामाजिक प्रश्नांशी निगडीत असण सहाजिक होते. सुरुवात तरी तशीच झाली पण पुढे नाव थोड्या वेगळ्या दिशेस जाउ लागली.

मी इंग्रजीत जवळ जवळ दोन वर्षे नित्य्-नेमाने ब्लॉग लेखन करतो आहे. मला मुळातच राजकारण, सामाजिक घडमोडी, इतिहास व अर्थ-शास्त्र असल्या विषयांबद्दल प्रचंड आवड होती. अमेरिकेत शिकण्यास आल्यावर माझ्या विद्यापिठाच्या अवाढव्य वाचनालयां मुळे या विषयांबद्दलचे वाचन अधिक वाढले. तसेच राजकीय चर्चेसाठी मी विविध विद्यार्थि संघटनांचा सदस्य झालो. याच काळात अमेरिकेत ब्लॉगसचा सुळसुळाट वाढत होता त्यामुळे मी सुध्दा माझ्या मतांची पिंक टाकायला इंग्रजी ब्लॉगची सुरुवात केली.

तेंव्हाच खर मी मराठीत ब्लॉग लिहिण्याच खटाटोप केला होता पण इंटरनेट वर मराठी सुलभतेने लिहिण्याची सोय तेंव्हा उपलब्ध नव्ह्ती. काही महिन्यांपूर्वी मराठी सोप्या पध्दतीने लिहिण्याचे मार्ग ध्यानी आले व मी लगेच मराठीत ब्लॉगस लिहिण्याचा श्रीगणेश केला.

माझ्य लक्षात आले की गेल्या ५ वर्षात माझे राजकारण किंवा तत्सम विषयांबद्दलचे वाचन केवळ इंग्रजीतच आहे. त्यामुळे आंतर-राष्ट्रीय राजकारण किंवा अर्थशास्त्रा बद्दल मराठीत लिहिणे मला फार अवघड जाते. कारण, या बाबतीत माझे विचार मनात इंग्रजीतच चालू असतात. भारतीय राजकारणा बद्दल मला मराठीत लिहिणे थोडे कठिण असले तरी शक्य आहे. या उलट मी ज्या कथा लिहिल्या आहेत त्या संबधित अनुभव भारतातील असल्यामुळे, त्या कथा मराठीतच लिहिणे सोपे आहे. त्या कथा इंग्रजीत जवळ जवळ अशक्य आहेत. थोडक्यात, भारतातील अनुभव मला मराठीत (किंवा हिंदीत) लिहिणे सोपे आहे तर अमेरिकेतील अनुभव मला इंग्रजीत लिहिणे सोपे आहे.

त्यामुळे माझ्या ब्लॉग वर सामाजिक प्रश्नांशी निगडीत लेखांच्या तुलनेत कथा/गोष्टींची संख्या वाढतेय. (या कथा किती वाचनीय आहेत, हा मुद्दा वेगळा!) तसेच बहुंताश कथा सामान्य जीवनाशी निगडीत असल्यामुळे ब्लॉगचे शीर्षक 'रुद्र शक्ति' थोडे विपरीत वाटते. पण सध्या तरी मला हे शीर्षक बदलवायची इच्छा नाही.

पण पुढे माझे सामजिक प्रश्नांबद्दलच्या लेखांची संख्या वाढावी यासाठी माझे प्रयत्न चालले आहेत. बघुया, यात किती यश मिळतय ते.

6/27/07

डॉक्टर, तुम्ही सुद्धा ?

"हां, काय झालं हे नीट सांगा मला?"
"सकाळपासुन जीव घाबरतोय म्हणत होते. गॅसेस झाले आहेत म्हणालेत म्हणुन फारस लक्ष दिलं नाही. नेहमी सारख दुपारचं जेवले सुद्दा नाहीत. दुपारचा चहा घ्यायला बोलावलं तर खोलीतच धाडकन कोसळलेत. खुप जोराची धाप लागली होती. ताबडतोब घेउन आलो आपल्या दवाखान्यात. "
"आपण कोण यांचे? "
"मी यांचा मुलगा."
"ह्रदय रोगाची काही पूर्व तक्रार. आधीच्या डॉक्टरांनी लिहुन दिलेली काही कागद पत्र? "
"आज सकाळ पर्यंत चांगले ठणठणीत होते. आज पर्यंत कधी डॉक्टरांकडे वारी झाली नाही यांची."
"अच्छा. हार्ट-अटॅक आहे. नशीबच आहे कि एवढ्या अटॅकने सुद्धा वाचलेत ते. तुम्ही काळजी करु नका. अन्गीओप्लास्टी करावी लागेल. बहुतांश वेळा रुग्ण या प्रक्रिये नंतर बरा होतो"
"बरं." पण साहेब तुम्ही तर अजुन त्यांना नीट तपासले सुद्दा नाहीया. टेस्ट सुध्दा झाल्या नाहीयात"
"भिंतीवर जे प्रमाण पत्रक दिसतय त्यावर कोणाचे नाव आहे?"
" आपले"
"मग, ऐका मी काय उपचार सांगतोय ते. आज संध्याकाळी करु शकतो मी शस्त्रक्रिया. पन्नास हजार खर्च येइल."
"पण साहेब, लौकरात लौकर शस्त्रक्रिया केलेली बरी नाही का?"
"आत्ता टेबलवर पन्नास हजार ठेवा. मी ताबडतोब करतो शस्त्रक्रिया"
"एवढे पैसे कुठुन आणु मी एकदम".
"तुमची पैशांची सोय झाली की कळवा. आणि पन्नास हजार फक्त शस्त्रक्रियेचे लागतील. त्यांतर ई.क.उ. मधे ठेवण्याचे वेगळे व औषधांचे ही वेगळे"
"तरी साधारण खर्च किती येइल"
"एकुण खर्च एक ते दिड लाखाच्य घरात जाईल"
"साहेब, स्वतःला विकायला काढल तरी एवढे पैसे मिळणार नाही"
"अहो, शासकीय रुग्णालयात सुद्दा उपचार होतात. तिथे दाखल केले तरी चालेल"
"अस नका म्हणु. आपले फार नाव ऐकलय. हे २२००० ठेवा व लौकरात लौकर शस्त्रक्रिया करा. मी संध्याकाळ पर्यंत उरलेल्या पैशांची सोय नक्की करतो"
-- -- -- -- -- -- --

"डॉक्टर साहेब, कशी झाली शस्त्रक्रिया?"

"यशस्वी झाली. पण पुढले २४ तास थोडी काळजी आहे. हे २४ तास गेलेत म्हणजे झाले."

"म्हणजे पुढल्या २४ तासात जीव जाउ शकतो"

"शस्त्रक्रिया जरी मी करित असलो तरी कर्ता-करविता वरचा आहे"

"बरोबर आहे तुमचं. सकाळपासुनच घरचा गणपती पाण्यात कुडकुडतोय."

"बरं, उरलेले पैसे भरुन टाका लौकर."

"पैसे कुठे पळुन जातायत साहेब. बसा शांतपणे. थोडं खाजगी बोलायच होत"

"म्हणजे" डॉक्टर साहेब बुचकळयात पडलेत. " अहो, अजुन बरीच रुग्ण आहेत या दवाखान्यात" ते थोड खवचट पणे म्हणालेत.

"माहितीय साहेब. पण हा कागद वाचता का जरा?"

कागद वाचुन डॉक्टर साहेबांचा चेहरा पांढरा फटक पडला.

"पाणी मागवु का साहेब?"

"आं....म्हणजे...."

"एक काळ होता की लोकं डॉक्टरांना देव मानित असतं. पण आता स्मशानातला जल्लाद बरा. पैश्यांसाठी मागे लागतो पण मुडदा तरी नीट जाळतो. वडीलांचा सकाळी घरीच मृत्यु झाला. शासकिय रुग्णालयात घेउन गेलो होतो तरी पण तेथे डॉक्टरांनी मृत्यु-पत्रक दिले. पण वडिलांच्या आजारपणात डॉक्टर या जमातीने आम्हाल इतके लुटले कि म्हटल कि हि लोकं अजुन कुठल्या थरा पर्यंत जाउ शकतात हे तरी बघु. पण खरच सांगतो कि तुम्ही माझ्या अपेक्षेपेक्षा ही वरचढ ठरलात. मेलेल्या व्यक्तिला तुम्ही केवळ दाखल नाही केल तर त्या मढ्यावर शस्त्रक्रिया करण्याच ढोंग ही केलत. "
भिंतीवरच प्रमाण पत्रक शेवटच वाचुन घ्या. कारण आता ते लौकरच जप्त होणार आहे."

"अहो असं नका करु. इतक मोठं रुग्णालय चालविणे म्हणजे गंमत नाही. तसच मी बर्‍याच रुग्णांना विनामुल्या उपचार देतो. मग पैशांची चणचण भागवायला असलं काही करावं लागत. कृपया पोलिस कडे जाउ नका. आपण यातुन काही तरी मार्ग नक्कीच काढु शकतो."
"दहा लाख रुपये नगद तुम्ही टेबलवर ठेवलेत कि माझे वडिल अंतिम संस्कारास मोकळे" क्षणार्धात समोरुन उत्तर आले.
डॉक्टर साहेब चकितच झाले. काय चाललय हे डॉक्टर साहेबांना कळेनासे झाले. पण त्यांनी बँकेला घाईने फोन फिरवण्यास सुरुवात केली.

(अंशतः सत्य घटनेवर आधारित.)

6/20/07

अग्निवस्त्र

चर्रर्र !! कातड जळण्याचा आवाज येतोय. कातड जळण्याचा असा वास येतो हे माहिती नव्हत. बहुधा माझ दु:खपुर्ण व निराशाजन जीवन जळण्याचा हा वास असेल. पण मी इतकी पेटलीय तरी मला मुळीच चटके बसत नाहीया. जणु मी कातडीपासुन वेगळी झालीय. पण कातड जळत असल तरी मनातल्या पीडा तश्याच्या तश्याच आहेत. यांच्या पासुन दूर पळण्यासाठीच एक लीटर किटकनाशक प्यायले मी सात वाजता पण दहा वाजलेत तरी ढिम्म काही झाल नाही. शेवटी ओतल रॉकेल स्वतःवर आणि नेसलं हे अग्निवस्त्र.

मनाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात आशेचे किरण डोकवतायत. मेल्यानंतरचे नवीन जग कस असेल? लग्नाचा शालु नेसल्यानंतर असल्याच काहीतरी भावना मनात दाटल्याच अंधुकसं आठवत. पण मेलं औषधापुर्ती सुध्दा सुख लाभल नाही. लग्नानंतर माझी सारखी तब्येत खराब आणि जेंव्हा थोडी बरी असायची तेंव्हा हे दौर्‍यावर असायचे. मला माहिती आहे कि लोक यांच्या पाठीमागे यांनाच नाव ठेवतात पण शेवटी पुरुष माणसाची तरी काय चूक? दोन पोर झालीत आणि मी परत स्वप्न बघायला लागली की निदान ही तरी सुख देतील.

आत्ता दोघांपैकी कोणी पाणी टाकायला आलं नाही म्हणजे पावल.

हा देह जळायला इतका वेळ लागतोय तर माझ मन जळायला किती वेळ लागेल? पण मी यंदा ठरवलय कि आशेचे किरण मनाच्या कोठडीत शिरुच द्यायचे नाहीत म्हणुन. थोडी उब तरी मिळेल. थोडी जरी आशा वाटली तरी चटके बसतील आणि कोणी तरी पाणी टाकायला येइल.

इतकी वर्ष झाली हे अंगण बघतेय पण आज मोठ लख्ख दिसतय. मोठ्याच्या लग्नाच्या वेळी आठवत मला की मी स्वतः सारवल होत. तांदुळ ओलांडुन आत सुन तर इतकी गोड दिसत होती कि मलाच गलबलुन आल. मला मुलीची हौस पूर्ण नाही झाली तर सुन ती भरुन काढेल अशी आशा मनात पालवली. पण खोलीतुन वास येतोय अशी तक्रार करत तीने जेंव्हा खोलीत दोन बादल्या पाणी आमच्या खोलीत फेकले तेंव्हा मनात पालवलेला आशेचा अंकुर विष वृक्षाचे आहेत हे कळले. हे झाड फोफावायला एक महिनाही नाही लागणार अस नाही वाटल. वर्षभरात घर मुलाच्या नावे करुन झाले व वृध्दाश्रमाचा मार्ग धरायच ठरवल पण तेही नशिबात नव्हते. 'हविषा कृष्ण वर्तमेव भूय एवभिवर्धते' हेच खर कारण यांच पेंशन मिळत रहाव म्हणुन आम्ही आमच्याच घरात कैद झालो. यांना शेवटल्या दोन वर्षात साधा गरम वरण-भात खायला मिळाला नाही. हे गेल्यावर मी ठरवलं कि माझ्या लाकडांचा खर्च हि मुलावर पडु द्यायचा नाही.

आत्महत्या करणे पाप असते अस आपला धर्म म्हणतो. सत्य असेल ते एखाद वेळेस. पण पाप आहे तर मला चटके कसे बसत नाहीयात ? या जन्माने मला इतके होरपळले आहे कि हा अग्नी अजुन काय बिघडवणारय माझ. पाप असेल तर असो पण मी मात्र माझ्य जन्मभराच्या तपश्र्चर्येचे फळ मानिते.

अरे, कोणीतरी दार उघडतय. नका दार उघडु. जळु द्या मला निवांतपणी. सुनेचे डोळे तर पांढरे पडले आहेत. पोलीस केस होउ शकते तसेच मला मिळत असलेल अर्ध पेंशन आत मिळण बंद होणार असले असंख्य विचार मी तीच्या डोळ्यात वाचु शकतेय. अरे, पाणी नको टाकुस माझ्यावर. मातृऋण फेडण्याची तुला सुवर्ण संधी मिळतेय तुला. ओतलच त्याने पाणी. आता मात्र आंग भाजतय. कोण बघतय खिडकितुन ? फार गोड आहे लहाना नातू. त्यालाच शेवटच बघायला बहुतेक अडकला होता जीव.

आता छान वाटतय अचानक. हलकं हलकं वाटतय. जणु मी हवा भरलेल्या फुग्या सारखी आकाशात भरकटते आहे. माझाच देह दिसतोय मला. मी मलाच मुळीच ओळखु येत नाहीया. बर आहे एक दृष्टीने. कोणीच ओळखायला नको ओळखायला नको मला. जशी आली तशीच गेलेली बरी.

6/15/07

नाईकच्या म्हशी

नामजोशी बाईं त्यांच्या शिकवणसाठी निवडक विद्यार्थ्यांनाच घेत असत. शिकवणीतील सर्व विद्यार्थी हे पहिल्या ईयत्तेपासुनच मराठी माध्यमातुन शिकलेले होते पण नामजोशी बाईंची मराठी विषयावर इतकी जबरदस्त पकड होती की मराठी म्हणजे नक्की काय याचा गंध वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांना १०वीच्या वर्गाता पहिल्यांदा लागत होता. नागपूरातील प्रतिष्ठित सोमलवार शाळेत त्यांनी तीस वर्षे शिकविले होते. तसेच सोमलवार शाळेच्या रामदासपेठ शाखेच्या त्या मुख्याध्यापिका पण होत्या. स्पष्ट-वक्त्या आणी शिस्तबध्द या साठी प्रसिध्द असलेल्या मॅडमच्या करारी स्वभावाला शाळेतली अत्यंत नाठाळ आणी उनाड मुल ही घाबरायची. पण त्या जेंव्हा मुख्याध्यापिका होत्या तेंव्हा सध्याच्या शिकवणीतील विद्यार्थि प्रार्थमिक शाळेत शिकत असतील. त्यामुळे नामजोशी बाईंचा दरारा त्यांनी केवळ ऐकला होता, अनुभवला नव्हता. बाईंच वय सत्तरीच्या घरात होत पण शिकविण्याची उर्मी अजुन गेली नव्हती. म्हणुन त्या अजुनही शिकवणी घेत असत.

शिकवणी कधी घरातील बाहेरच्या खोलीत व्हायची तर कधी दुसर्‍या माळ्यावरी गच्चीच्या शेजारच्या खोलीत होत असे. आज दुसर्‍या माळ्यावर वर्ग भरला होता. त्या गच्चीच्या कडे जाणार्‍या दरवाज्या जवळ बसायल्या होत्या व विद्यार्थी त्यांच्या समोर खुर्च्या टाकुन बसले होते. त्यांचे घर वर्धा रोडला तोंड करुन होते. त्यामुळे त्या जीथे खुर्ची टाकुन बसल्या होत्या, त्याच्या मागे दरवाज्यातुन रस्त्यावरची वर्दळ व्यवस्थित दिसत होती. त्या दिवशी बाई थोड्या तापल्या होत्या. काही घरगुती कारणांनी तापल्या असतील. शिकवणीच्या आरंभीच खोलीत मागे बसणार्‍या व इतर विद्यार्थ्यांच्या पाठी मागे लपणार्‍या थत्ते ला रागवुन झालेल होतं. त्यामुळे खोली चिडिचुप होती.

बाईंच्या अगदी समोर आज नाईक बसला होत. 'अ' तुकडीत शिकणारा नाईक हा हुशार विद्यार्थी होता. आज बाई एक कठीण धडा शिकवित होत्या. या धड्यावर निदान एक प्रश्न तरी बोर्डाच्या परिक्षेत येत असे पण पाच पैकी तीन प्रश्नच सोडवायचे असल्यामुळे या कठीण धड्यावरील प्रश्न सोडला तरी चालत असे. धडा कळण्यास कठीण जात असेल तर उगाच त्याचे प्रश्न सोडवण्याचा उपद्व्याप करु नका असे बाईंनी आधीच सांगितले होते. नाईकच्या कानात हे एवढच वाक्य फसल कि पोटभर जेवल्यामुळे त्याला सुस्ती आली होती कि त्याला खरच धडा कळत नव्हता हे कळण्यास मार्ग नाही पण तो बाईंच्या अगदी समोर बसुन दरवाज्यातुन बाहेरची वर्दळ मोठ्या तन्मयतेने बघत होता. बाईंनी एक-दोनदा नाईक कडे रोखुन बघितले पण नाईक रस्त्यावरुन जाणार्‍या म्हशींचा कळपात 'रमला' होता. बाई खुर्चीवर पाय वर घेउन बसत असत. त्यांनी पाय खाली सोडलेत व थोड्या समोर वाकुन त्या शांतपणे म्हणाल्या "नाईक, किती म्हशी आहेत रे कळपात?"

ज्यांना धडा कळत नव्हता त्यांना वाटायला लागले कि 'अच्छा धड्यात म्हशी पण आहेत!'। ज्यांना धडा कळतो आहे अस वाटत होते, ती मुले धड्यामधे म्हशी शोधायला लागलीत पण नाईक मात्र बर्फासारखा गार पडला. "अरे, इतक लक्ष देउन बाहेर बघत होतास तर म्हशी तरी मोजायच्या होत्या" आता वर्गातील मुलांना काय चाललय हे लक्षात आले. "नाही मॅडम, मी बाहेर बघत नव्हतो" नाईकने आपली बाजु मांडायचा बुळबुळीत प्रयत्न केला. "नाईक, तीस वर्ष झाली मी शिकवतेय. माझ लक्ष होत तुझ्याकडे आणि त्यातुन तू मुर्खासारखा माझ्या नाका समोर बसुन बाहेर बघत होतास" बोली भाषेत सांगायच तर नाईकची आता चांगलीच 'सटारली' होती. " तु तुझ नशीब मान की मी वयाची सत्तरी ओलांडलेली आहे आणी तु माझ्या हाताच्या लांबी पासुन दूर बसला आहेस ते. नाही तर माझ्या हाताची पाचही बोटे तुझ्या गालावर आत्ता पर्यंत उमटली असती" हे ऐकुन खर सांगायच तर वर्गातल्या प्रत्येक मुलाचीच आता सटारली होती.

जणु काही घडलच नाही अश्या भावात बाईंनी शांतपणे पाय खुर्चीवर घेतलेत व परत धडा शिकवायला सुरुवात केली. ज्यांना धडा कळत नव्हता ती मुले आता अगदी सगळं कळतय असा आव आणुन माना डोलवायला लागलीत. नाईकला बराच घाम आला होता. रस्त्यावरच्या म्हशी हि कधीच पुढे निघुन गेल्या होत्या.

त्या दिवसानंतर नाईक कधीही बाईं समोरच्या खुर्चीवर बसला नाही.

6/8/07

'ब' तुकडीतील एक सामान्य दिवस

"रहाळकर, काय चाललय तिकडे?" काटे बाईंनी विचारले. रहाळकरला ताबडतोब त्याची चूक लक्षात आली. तो आज चूकुन तिसर्‍या बाकावर बसला होता. खर तर 'ब' तुकडीत 'रोटेशन' चा नियम होता. म्हणजे, दररोज एक एक बाक पुढे सरकत जायचे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यातुन एकदा तरी पहिल्या बाकावर बसावेच लागायचे. रहाळकर, चांदे व सांबरे मात्र नेहमी शेवटच्याच बाकावर बसायचे. वर्गातील नियम जणु त्यांना लागु होत नसत. नियम हे उल्लंघन करण्यासाठीच असतात यावर रहाळकर व त्याच्या 'गॅंग' चा ठाम विश्वास होता.

त्या दिवशी कोण जाणे पण रहाळकरला तिसर्‍या बाकावर बसावे लागले.

काटे बाई आठवीच्या 'ब' तुकडीला नुकत्याच मराठी शिकवायला आल्या होत्या. त्यांची उंची पाच फुटही नव्हती व त्यांची वेश-भूषा इतर शिक्षिकेंपेक्षा थोडी निराळी होती. त्या दोन्ही नाकपुड्यांमधे नथी घालत. गळ्यात मंगळसुत्रा सोबत सोन्याच्या माळा होत्या व लांब वेणी होती. तसेच त्या थोड्या भारी साड्या नेसत असत. नवीन असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांवर जरब बसवायची होती. आता ८वीच्या विद्यार्थ्यांच्या, प्रामुख्याने मुलांच्या, कानात वार गेलेलं असत. एका सीमे पलीकडे त्यांना शिस्त लावणे शक्य नसते. शाळेतील अनुभवी शिक्षकांना याची जाणीव होती. काटे बाई चांगल्या शिकवत, पण चांगल शिकविणे आणि विद्यार्थ्यांना शिस्तित ठेवण या दोन फार निराळ्या गोष्टी आहेत. नुकताच शिक्षण क्षेत्रात प्रवेश केलेल्या काटे बाईंच्या विद्यार्थ्यांना हाताळायच्या काही पुस्तकी कल्पना होत्या. अर्थातच, 'ब' तुकडीतील वाह्यात विद्यार्थ्यांपुढे हे पुस्तकी ज्ञान फारसे उपयोगी येत नव्हते. त्यातुन त्या रागवल्या की त्यांच्या नाकपुड्या फुगायच्या व डोळे मोठे करुन त्या जोरात ओरडायच्या. अस झाल की मुलांना अजुन मजा यायची.

एवढी पार्श्वभुमी सांगण्य़ा मागचा हेतु असा की मुलांनी या नविन शिक्षिकेस जेरीस आणायचा बांध घातला होता. त्या दिवशी त्यानी नवीन धडा शिकविण्यास सुरुवात केली व रहाळकरने शांतपणे आपले उद्योग आरंभिले. समोरच्याला पेन टोच, बाजुश्याशी बोल, उगाच पाय आपट, खोटी शिंका दे, असले निरर्थक चाळे तो साळसुद पणे करत होता. पण त्याची मस्ती फक्त त्याच्या पुर्तीच सिमित नव्हती. 'डॉमिनो' परिणामानुसार, त्याने शिंका दिली की त्याच्या मित्र मंडळींपैकी अजुन तीघे खोटी शिंका द्यायचे. त्याने खाकरल की परत तेच. कधी कधी मागच्या बाकावरच्या पत्थरकिने आधी शिंका देत असत. पण या सगळ्या वात्रट उद्योगाचा उगम तिसर्‍या बाकापासुन होतोय हे कळायला शेरलॉक होम्सची आवश्यकता नव्हती.

"रहाळकर, उभा रहा" काटे बाईंनी हुकुम केला. तो निमुटपणे उभा झाला. बाईंनी जवळ येउन त्याचा कान पकडुन जोरात हलवण्याच्या प्रयत्न केला. "काय चाललय इथे? तुला 'प्रिन्सिपलकडे पाठवायला हव. मला काय माहिती नाही कि सगळी मस्ती तु आधी सुरु करतोस म्हणुन" पण कान पकडण्याचा फारसा फायदा होत नव्हता कारण बरीचशी मुले फिदी-फिदी हसायला लागली होती. व रहाळकर हसण्यात आघाडीवर होता. बाईंचा पारा अजुन चढला. त्यांनी रहाळकरला झापड मारण्याचा प्रयत्न केला. रहाळकरने नकळत खांद्याने चेहरा झाकला. त्यात खांद्याला लागुन बाईंची एक बांगडी फुटली व रहाळरने ती 'सुवर्ण' संधी हेरली. त्याने आपल्या चेहर्‍यावर हात धरुन आपल्या डोळ्यावर लागल्याच नाटक करायला सुरुवात केली. "मॅडम, तुमची फुटलेली बांगडी माझ्या डोळ्याला लागली बहुतेक. आह्ह्...दिसत नाहीया मला उजव्या डोळ्याने" रहाळकर कण्हला. बाजुला बसलेल्या चांदे नी ताबडतोब आपली भूमिका वठवायला सुरुवात केली. "मॅडम, काय केलत तुम्ही. रहाळकरच डोळा गेला बहुतेक. खुप दुखतय का रे? रक्त आल का बघु" वर्गातल्या बहुतांश मुलांना हे सगळ्या नाटकाची कल्पना होती. पण एक तर या गोंधळात बराच वेळ जात होता व दुसरं म्हणजे बाल-भारतीतल्या धड्या ऐवजी त्यांना वर्गात रंगत असलेला या 'धड्यात' अधिक रस होता. त्यामुळे वर्गातल्या मुलांनी 'हॉ...हॉ' चा गजर लावला.

बाई थोड्या चपापल्या. त्यांना रहाळकरला बांगडी न लागल्याची खात्री होती पण वर्गातील गोंगाटाचा त्यांच्यावर थोडा परिणाम झाला. "कुठे लागलय रहाळकर तुला? बघु तर" त्या म्हणाल्या. रहाळकर आपल्या चेहर्‍यावरचा हात काढायला तयार नव्हता. आणि रहाळकर जणु युध्दातच जखमी झालाय या भावनेने चांदे त्याचे सांत्वन करत होता. शेवटी काटे बाईंनी रहाळकरला डोळे धुउन यायला सांगीतले. तो व त्याला सोबत म्हणुन चांदे, सांबरे अशी सगळी वरात वर्गाबाहेर गेली. या सगळ्या गोंधळात मराठीची तासिका संपल्याची घंटा झाली. काटे बाईंनी आपली पुस्तके गोळा केलीत व हताशपणे पुढल्या वर्गाकडे चालू लागल्या. बाई वर्गाबाहेर जाताच वर्गात एकच कल्लोळ सुरु झाला. पुढल्या तासिकेत शिक्षकांना कसा त्रास द्यायचा याचे 'कट' वर्गातील मुलांच्या मनात शिजु लागलेत. अश्या प्रकारे 'ब' तुकडीच्या एक अजुन सामान्य दिवसाचा आरंभ झाला.

6/2/07

कविता, ऑक्टोपस व माझे वायफळ तत्वज्ञान

मला कविता वाचण्याची फारशी आवड नव्हती. आवड म्हणण्यापेक्षा कुठल्या कविता वाचाव्यात व कवितांचा रस कसा घ्यावा हे सांगायला कोणी नव्हत. थोडक्यात बाल-भारतीच्या पाठ्य-पुस्तका पलिकडे फारस कविता वाचन नव्हत. परिस्थितीत थोडा फरक १०वी च्या इयत्तेत पडला. मराठीच्या नामजोशी बाईंनी कविता कश्या वाचाव्यात हे शिकविले. त्यांनी कुसुमाग्रजांची कविता 'कोलंबसाचे गर्वगीत' इतकी सुंदर शिकवली की मराठी कवितांच खजिनाच जणु माझ्यासाठी खुला झाला. १२वी च्या परीक्षे नंतर मात्र कविताच काय, माझ्या मराठी वाचनालाच पूर्ण-विराम लागला. दोन वर्षांपूर्वी सुरेश भटांची ओळख झाली व मला मराठी वाचता येतं या बद्दल मी देवाचे आभार मानलेत. कुसुमाग्रजांचे 'विशाखा' वाचुन झाले. ग.दिं.च्या कवितात नाहुन झाले. सध्या भाऊसाहेब पाटणकर व विंदांशी गुफ्तगु चालु आहे. या सगळ्या काव्य-प्रवाहात पोहतांना मला कवित मुळीच म्हणजे मुळीच करता येत नाही याचे मात्र फार वाईट वाटते. अहो, साध्या दोन पंक्तीसुद्धा लिहिता येत नाही. 'प्राची' ला 'गच्ची' चे यमक जुळवण्याहुनही वाईट परिस्थिती आहे.

आयुष्यात नवीन अनुभव जरी येत असलेत तरी भावना व शब्दांचे खेळ काही सोपे नाहीत. खर तर तुमच्या-आमच्या सारखच आयुष्य कवि मंडळी कंठत असतात पण सामन्य घटनांकडे असामान्य दृष्टीक्षेपाने ते बघतात. व याच घटनांन सुंदर शब्दांमधे गुंफण्याची अदभुत शक्ति त्यांच्यात असते. लेखकही काही कमी नसतात. खांडेकर त्यांच्या तत्वज्ञानाने मनुष्याला मुळापासुन हलवुन सोडतात. मुन्शी प्रेमचंद यांच्या 'गोदान' मधील गरिबीच्या वर्णनाने अंगावर शहारे येतात. अर्थात कवि हे सर्व रस अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त करतात. चित्रकार याहुन पलीकडची पायरी गाठतात. शब्दांचा मुळीच आधार न घेता ते केवळ रंगांद्वारे भावना प्रगट करतात. २०व्या शतकात छायाचित्रकारांनाही विशेष महत्व प्राप्त झाले आहे. माणसाचा चेहरा अक्षरश: भावनांचा आरसा असतो. कॅमेरा निष्काम भावनेने (आता खर भावना निष्काम कश्या असतील !) माणसाच्या मनातील भावनांचे प्रतिबिंब आपल्या समोर ठेवतो.

या कवितांच्या संदर्भात एक गोष्ट आठवली. कॉलेज मधे असतांना कॅलिफोर्निया विद्यापिठातील संगणक शास्त्राच्या प्राध्यापकाच्या व्याखानाला गेलो होतो. कमीत्-कमी सुचनांद्वारे संगणकाला कश्या गोष्टी समजतील व कसे कमीत्-कमी शब्दांद्वारे तो (संगणक) आपल्या गोष्टी समजावुन देऊ शकेल यावर प्राध्यापक महोदय बोलत होते. त्यांनी एक सुरेख उदाहरण दिले. ऑस्ट्रेलिया जवळच्या समुद्रात एका विशिष्ट जातीचे ऑक्टोपस निवास करतात. खोल समुद्रात जिथे सुर्य प्रकाशाचा अभाव असतो तेथे हे ऑक्टोपस अत्यंत प्रगत पद्धतीने संवाद करतात. आवाज किंवा स्पर्श-ज्ञाना ऐवजी त्यांचे संपूर्ण शरीर स्वयं-प्रकाशाने लखलखते. केवळ सेकंदात ते संवाद पूर्ण करतात. शब्द नाहीत, कविता नाहीत, चेहरे नाहीत की अंग-विक्षेप नाहीत व प्रत्येक वेळेस भावना मात्र शंभर टक्के समोरच्या पर्यंत पोचतातच. प्राध्यापकाच्या मते माणसांना असे जमले तर अनेक गोष्टी सोप्या होतील.

प्राध्यापकाचे म्हणणे बरोबर असेल. भावना प्रगट करण्याची एवढी साधने उपलब्ध असतांनाही गैर-समजुतीच्या रोगाने सर्व समाज ग्रस्त आहेत. ऑक्टोपसच्या पध्दतीने संवाद साधुन जीवन बरेच सुरळीत होइल. पण त्याचा दुष्परिणाम म्हणजे 'माझ तुझ्यावर प्रेम आहे' हे म्हणण्यात व अळणी जेवण्यात काहीच अंतर रहाणार नाही. कवि व लेखक जे आपल्या आयुष्याल अर्थ देतात किंवा चित्रकार जो रंग देतात त्याची सर ऑक्टोपसच्या यांत्रिक पण संपूर्ण संवादाला कधीच यायची नाही.